
Jalgaon News : खानदेशात शनिवार (ता. ४)पासून ठिकठिकाणी वादळ, पाऊस व गारपीट सुरू आहे. सोमवारी (ता. ६) सायंकाळी व रात्री धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यांतील अनेक गावांत जोरदार गारपीट व वादळी पाऊस (Garpeet) झाला. यात हजारो हेक्टवरील पिके भूईसपाट (Crop Damage) झाली आहे.
गारपिटीच्या तडाख्यात मोठे वृक्षही सोलले असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. कोट्यवधींची हानी झाली असून, शेतकरी त्राहीमाम करीत आहेत.
धुळ्यातील साक्री तालुक्यात टिटाणे गावात सोमवारी सायंकाळी जोरदार गारपीट झाली. काही क्षणात रस्ते व शेतांत गारांचा खच तयार झाला. वृक्षांनाही गारांनी सोलून काढले. या आपत्तीत साक्री व परिसरात सुमारे पाच हजार हेक्टरवरील पिके पुरती भुईसपाट झाल्याचा अंदाज आहे.
धुळ्यातील धुळे, शिरपूर, शिंदखेडा भागांतही पाऊस व वादळाने कहर केला. यात दादर ज्वारी, गहू, फळपिके, केळी, हरभरा आदी पिकांची मोठी नासाडी झाली आहे. एकट्या धुळे जिल्ह्यात सुमारे १६ ते १७ हजार हेक्टरवरील पिके हातची गेल्याची माहिती आहे.
सलग सुट्ट्यांमुळे प्रशासनाने कुठलीही पंचनामे व इतर कार्यवाही या आपत्तीमध्ये मंगळवार (ता. ७) पर्यंत सुरू केलेली नव्हती. नंदुरबारमधील नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा भागांतही जोरदार गारपीट व वादळाचा पिकांना फटका बसला.
नवापुरातील विसरवाडी, खांडबारा, धडगावमधील सिसा भागांत गारपिटीने मका, ज्वारी व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. नंदुरबारात सुमारे चार हजार हेक्टरवरील पिकांचे ६० ते ७० टक्के नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्यात चोपडा, धरणगाव, अमळनेर, जळगाव, पारोळा, जामनेर, यावल आदी भागांत वादळ व पाऊस झाला. यात गहू, मका आदी पिके आडवी झाली आहेत. चोपडा, जळगाव तालुक्यांत केळीचेही नुकसान झाले आहे.
चोपड्यातील सनपुले, कठोरा, कोळंबा, कुरवेल, तावले, खाचणे, निमगव्हाण आदी भागांत मका, केळी, गव्हाचे मोठे नुकसान झाले. जळगाव तालुक्यात आव्हाणे, खेडी खुर्द, वडनगरी, फुपनगरी, कानळदा, नांद्रा बुद्रुक, नंदगाव, फुपणी, गाढोदे या गिरणा काठावरील गावांतही वादळी पाऊस झाल्याने केळी, मका, फळ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
तसेच धरणगावमधील शिरूड, साळवा, नांदेड, सावखेडा या भागांतही मोठे नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे १५ ते १६ हजार हेक्टरवरील पिकांचे वादळी पावसात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली.
प्रशासन, विमा कंपनीचा बेमालुमपणा
खानदेशात फळ पीकविमा योजनेत ८८ हजार शेतकरी सहभागी झाले आहेत. परंतु या योजनेबाबत तक्रारी, आरोप व शंका यामुळे चौकशी सुरू आहे. अशात केळी व इतर फळपीक उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. पण विमा कंपनी या बाबत दखल घ्यायला तयार नाही.
फळ पीकविमाधारक शेतकऱ्यांच्या तक्रारी स्वीकारून पंचनामे करावेत व तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. दुसरीकडे सलगच्या सुट्ट्यांत प्रशासन आनंद लुटत आहे.
शासनाने या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून माहिती गोळा करावी व शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेचे आत्माराम पाटील (कापडणे, जि. धुळे) यांनी केली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.