Sindhudurag News : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार वाऱ्याचा काजू पिकाला तडाखा बसला आहे. काजू (kaju Nuksan) बीसह काही ठिकाणी झाडेदेखील उन्मळून पडली.
डोंगरपायथ्याशी असलेल्या गावांतील काजू बागांचे (Cashews Orchard) मोठे नुकसान झाले आहे. वाऱ्यामुळे नुकसान होण्याचा गेल्या पंधरा दिवसांतील दुसरा प्रकार आहे.
जिल्ह्याच्या काही भागांत गेल्या काही दिवसांपासून जोरदार वारे वाहत आहेत. पूर्वपट्ट्यातील डोंगरपायथ्याशी असलेल्या गावांमध्ये वाऱ्याचा वेग अधिक आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून पहाटेच्या सुमारास जोरदार वारे वाहत आहेत.
या वाऱ्यांमुळे काजू पिकाचे मोठे नुकसान होत आहे. काही भागांत काजूचे नुकतेच उत्पादन सुरू झाले आहे तर काही भागांत कोवळी बी झाडांवर आहे. जोरदार वाऱ्यामुळे कोवळे बी गळून पडले आहे. याशिवाय मोहरदेखील गळला आहे.
एवढेच नव्हे तर ज्या भागात वारे झाले त्या भागातील काजूची झाडेदेखील उन्मळून, मोडून पडली आहेत.
वैभववाडी तालुक्यातील करूळ, नावळे, खांबाळे, आर्चिणे, अरूळे, निमअरूळे, सांगुळवाडी, कुंभवडे, भुईबावडा, ऐनारी, सडुरे या गावांतील काजू बागांना मोठा फटका बसला आहे. याशिवाय कणकवली तालुक्यातील फोंडा, घोणसरी, हरकुळ, नाटळ, भिरवंडे या भागांतदेखील मोठे नुकसान झाले आहे.
यापूर्वी ३ आणि ५ फेब्रुवारी या कालावधीतदेखील जोरदार वाऱ्यामुळे जिल्ह्यात काजू पिकाचे नुकसान झाले होते. त्यानंतर आता पुन्हा जोरदार वाऱ्याचा तडाखा बसल्यामुळे काजूच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. सततच्या वाऱ्यामुळे काजू बागायतदार संकटात सापडला आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.