Crop Damage Survey : खानदेशात पीकहानीचे पंचनामे सुरूच

खानदेशात मागील दोन -तीन दिवसात झालेल्या वादळी पाऊस व गारपीटीत सुमारे तीन हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Jalgaon News : खानदेशात मागील दोन -तीन दिवसात झालेल्या वादळी पाऊस व गारपीटीत सुमारे तीन हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. अंतिम अहवाल लवकरच प्राप्त होईल. पंचनामे सुरूच असल्याची माहिती मिळाली.

काही भागात अद्याप शेतकऱ्यांकडे कृषी सहायक व तलाठी पोचलेले नाहीत. फक्त वारा सुसाट होता, पाऊस नुकसान नाही, अशा भूमिकेत कर्मचारी आहेत. यामुळे पंचनामे अपूर्ण आहेत. त्यात रोज पाऊस येत असल्याने पंचनामे सुरूच आहेत.

खानदेशात या आठवड्यात सलग तीन दिवस गारपीट व वादळी पाऊस झाला आहे. यामुळे पीकहानीदेखील वाढली आहे. गुरुवारी (ता.२७) जळगाव जिल्ह्यात जामनेर, पाचोरा, बोदवड भागात पाऊस व गारपीट झाली.

Crop Damage
Groundwater Survey : पेठमध्ये भूजल सर्वेक्षणात त्रुटी; प्रशासनाने काम थांबवले

तसेच चोपडा, धुळ्यातील शिरपूर भागातही पाऊस, वादळ झाल्याची माहिती आहे. यात केळीचे अधिक नुकसान होत आहे. मका, बाजरीलादेखील सर्वत्र फटका बसला आहे. या महिन्यात तीन वेळेस गारपीट व वादळी पाऊस झाला आहे.

त्यात नुकसानीचे वेगवेगळे आकडे आहेत. ४ एप्रिलपासून वादळी पाऊस व गारपीट होत आहे. यामुळे शेतकरी चिंतेत असून, मळणी, काढणीची कामे ठप्प झाल्याची स्थिती आहे.

गुरुवारीदेखील पाऊस झाल्याने नुकसानीचे आखडे आणखी वाढणार आहेत. तसेच पंचनाम्याची प्रक्रिया आणखी लांबली आहे. एकूण नुकसान अहवाल या महिन्यात अनेक महसूल मंडळांकडून प्राप्त झालेला नाही. कारण रोज वेगवेगळ्या भागात कमी व अधिक नुकसान होत आहे. दुसरीकडे कर्मचारी टक्केवारीच्या निकषात पंचनामे टाळत आहेत.

गुरुवारी धुळ्यातही धुळे, शिंदखेडा व शिरपूर भागात मध्यम पाऊस, वादळ किंवा सुसाट वारा, अशी स्थिती होती. शिरपुरात निसावलेल्या केळीची झाडे कोसळली आहेत.

कारण अधिक वजन आणि वारा यामुळे खांब कोलमडले. नंदुरबारातही सातपुडालगत सुसाट वारा व तुरळक पाऊस, अशी स्थिती होती. मोठी हानी नंदुरबारात गुरुवारी पाऊस, वादळात झालेली नाही, अशी माहिती मिळाली.

कृषी कर्मचारी महोत्सवात

कृषी विभागाने धान्य महोत्सव जळगावात शुक्रवारपासून आयोजित केला आहे. त्यात कर्मचारी व्यस्त आहेत. दुसरीकडे नुकसान होत आहे. त्याबाबत कृषी विभाग नामनिराळा दिसत आहे. पंचनामे व इतर कार्यवाहीत कृषी सहायक, मंडळ अधिकारी भाग घेत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

तसेच पालकमंत्री, ग्रामविकास मंत्री बाजार समिती निवडणुकीत रमले आहेत. आपापली ताकद ही मंडळी दाखवित आहे. मतदारांना आपल्याकडे आणणे, फोडाफोडी, आमिष, असा प्रकार सुरू आहे. यामुळे नुकसानीच्या संदर्भात कुणी गांभीर्य घेत नसल्याची स्थिती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com