कापूस बियाण्यांचा काळाबाजार वाढणार

एक जूनपूर्वी बियाणे न विकण्याचा आदेश
Cotton Seed
Cotton SeedAgrowon

पुणे ः राज्यात एक जूनपूर्वी एकाही गावात बी.टी. कापूस बियाणे विकता येणार नाही, असे आदेश कृषी विभागाने जारी केल्यामुळे बियाण्यांचा काळाबाजार वाढेल, अशी भीती बियाणे उद्योगाने व्यक्त केली आहे.

सीड्‍स इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (सियाम) या बियाणे उद्योगातील सर्वांत मोठ्या संघटनेने बी.टी. कापूस बियाणे तत्काळ बाजारपेठेत उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यंदा राज्यात पेरा वाढणार असून, बागायती भागात काहीही झाले तरी शेतकरी लवकर (अर्ली) लागवड करतात. त्यासाठी ते परराज्यांतील बियाणेदेखील आणतात. त्यामुळे एक जूनपूर्वी बियाणे विक्रीवरील निर्बंध मागे घेण्याची गरज असल्याचे बियाणे उद्योगाचे म्हणणे आहे.

बियाणे उद्योगातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, यंदाचा खरीप हंगाम कपाशीसाठी चांगला जाण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाने (आयएमडी) यंदा मॉन्सूनचे आगमन लवकर होण्याचा अंदाज दिला आहे. याशिवाय बाजारात कपाशीचे भाव तेजीत आहेत. त्यामुळे शेतकरी यंदा नगदी पिकांमध्ये कपाशीला जास्त पसंती देण्याच्या तयारीत आहेत. मात्र कृषी विभागाच्या निर्बंधामुळे कोणत्याही कापूस बियाणे वितरकाला १५ जूनपूर्वी किरकोळ विक्रेत्याला बियाणे विकता आलेले नाही. तसेच किरकोळ विक्रेत्याला एक जूननंतर बियाणे विक्रीला परवानगी दिली आहे. त्यामुळे जवळपास तीन आठवडे वाया जाणार आहेत.

“कृषी विभागाच्या वेळापत्रकामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झालेली आहे. त्यामुळे बाजारात अवैध मार्गाने कपाशीच्या अप्रमाणित बी.टी. बियाण्यांचा शिरकाव होण्याची शक्यता आहे. तसेच, बियाण्यांचा काळाबाजार होण्यास अनुकूल स्थिती तयार झालेली आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार व प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा वेळीच करण्यासाठी कृषी विभागाने लागू केलेले निर्बंध तातडीने मागे घ्यायला हवेत. आम्ही या घडामोडींबाबत कृषी आयुक्तालयाला कळविले आहे,” अशी माहिती बियाणे उद्योगातील सूत्रांनी दिली.

बोंड अळीच्या प्रादुर्भावास जबाबदार कोण?

एक जूनपूर्वी राज्यात कपाशीचे बियाणे न विकण्याबाबत जारी केलेला आदेश कृषी विभागाने मात्र अद्यापही कायम ठेवला आहे. “विक्रेते किंवा कंपन्या व्यावसायिक अंगाने लवकर बियाणे विकण्यासाठी दबाव आणत आहेत. ही भूमिका त्यांच्यासाठी सोयीची आहे; पण शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला खाईत ढकलणारी आहे. बियाणे विक्री लवकर सुरू केल्यास लागवड लवकर होते. त्यातून गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढतो, हे सिद्ध झालेले आहे. लवकर बियाणे बाजारात आणून शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास जबाबदारी कोण घेईल,” असा सवाल गुणनियंत्रण विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने उपस्थित केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com