
Vasai Water News : हवामान बदलामुळे पावसाची शाश्वती देता येत नाही. ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरू आहे. अशातच जिल्ह्यातील धरणांचा जलसाठादेखील खालावत आहे. सूर्या धामणी धरणात केवळ ३४ टक्के पाणी शिल्लक आहे. पावसाचे लवकर आगमन झाले नाही, तर पाणीटंचाईसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
सूर्या धामणी, कवडास बंधारा, वांद्रे माध्यम पाणी प्रकल्प, उसगाव आणि पेल्हार धरणातून जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याचे पाणी वितरित होते; परंतु कडाक्याच्या उन्हामुळे धरणातील जलसाठा कमी होत आहे.
याचा परिणाम म्हणजे वसई विरार महापालिकेने पाण्याचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. वेळापत्रकानुसार पाणी वितरित केले जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणीबाणी निर्माण होण्याची भीती आहे.
उसगावमधून २० आणि पेल्हार धरणातून १० एमएलडी पाणी मिळते; मात्र या धरणात गाळ न काढल्याने पातळी घटली आहे. लोकसंख्येच्या तुलनेत जलस्रोत कमी झाल्याने पाण्याची तूट मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच पाणी मिळत नसल्याने टॅंकरचा आधार घ्यावा लागतो.
एमएमआरडीएने सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पूर्ण केली आहे; परंतु यातील पाणी मे महिन्याच्या अखेरीस येणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात धरणातून मिळणारे पाणीदेखील कमी असल्याने जलसंकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नागरिकांच्या समस्या कायम
पालघर जिल्ह्यात सिंचन व पिण्यासाठी धरणातून पाणीपुरवठा होतो; मात्र पाण्याची पातळी खालावू लागली आहे. काही वेळा पाणीपुरवठा हा जलवाहिनी गळती, वीजपुरवठा खंडित होत असल्याने बंद ठेवण्यात येत असतो.
एकीकडे उन्हाची झळ नागरिकांना पोहचत असताना पाणी भरपूर प्या, असे आवाहन प्रशासन करत असले, तरी पाणी अनियमित, कमी दाबाने मिळत असल्याने पंचाईत झाली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.