
Alibag News : खरिपात तयार झालेल्या धान्याची विक्री ३१ जानेवारीपर्यंतच करावी, अशी अट राज्य शासनाने घातली होती. या मुदतीत भाताची अपेक्षित विक्री होऊ न शकल्याने शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवण्यात आली;
परंतु अद्यापही पंधरा टक्के शेतकऱ्यांना धान्य विकता आलेले नाही. बुधवारी मुदत संपल्याने धान्याची कशी विक्री करावी, या विवंचनेत भात उत्पादक शेतकरी (Rice Producer farmers) पडले आहेत.
आधारभूत खरेदी योजनेंतर्गत या वर्षी शासनाने दिलेला इष्टांक पूर्ण झालेला नाही. आतापर्यंत फक्त ५ लाख २६ हजार क्विंटल भाताची विक्री शेतकऱ्यांना करता आली आहे. गतवर्षीपेक्षा ही सरासरी कमी आहे.
यापूर्वी खरीप हंगामातील धान्याची एप्रिल महिन्यापर्यंत हमीभावाने शेतकऱ्यांना विक्री करता येत होती. सवडीप्रमाणे मळणी केलेल्या धान्याची खरेदी-विक्री केंद्रांवर उशिरापर्यंत आवक सुरू असायची;
मात्र, मार्केटिंग फेडरेशनच्या नव्या नियमांची कल्पना नसलेले शेतकरी आता अडचणीत सापडले आहेत. यामुळे मुदत वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
जिल्ह्यात भात खरेदीसाठी ३९ खरेदी केंद्रे १ डिसेंबर रोजी सुरू करण्याचे आदेश दिले होते. खरीप हंगामात भात ३१ जानेवारीपर्यंत विकण्याची मुदत दिली होती.
मात्र काही भात खरेदी-विक्री केंद्र उशिराने सुरू झाल्याने तसेच ऑनलाइन खरेदीची पूर्तता करण्यात येणाऱ्या अडचणींमुळे शेतकऱ्यांना वेळीच भाताची विक्री करता आलेली नाही.
मुदतवाढीची मागणी
हमी भावाने भाताची विक्री करता यावी, यासाठी दुसऱ्यांना मुदतवाढीची मागणी शेतकरी करीत आहे. या संदर्भातील पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. मुदतवाढ मिळाल्यास कमी झालेल्या भात खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमध्ये वाढ होईल.
याचा फायदा स्थानिक शेतकऱ्यांनाही होईल. याबाबत प्रस्ताव पाठवण्याची तयारी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने दाखवली आहे.
अल्पभूधारक शेतकरी वंचित
यंदाच्या खरिपासाठी राज्य शासनाने सर्वसाधारण भातपिकासाठी २०४० रुपये मोबदला जाहीर केला आहे. त्याचबरोबर प्रतिहेक्टरी १५ हजार बोनसही जाहीर केले; मात्र, जिल्ह्यात हेक्टरमध्ये भात पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण कमी आहे.
ज्यांच्याकडे एक हेक्टरपेक्षा जास्त लागवडीखाली क्षेत्र आहे, त्यांनाच याचा लाभ योग्य प्रमाणात मिळू शकतो. तर भाताची विक्री करूनही अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात क्षुल्लक रक्कम जमा होण्याची शक्यता आहे.
ऑनलाइनचा फटका
शेतकऱ्यांनी भात खरेदी-विक्री केंद्रावर जाऊन नाव नोंदणी न करणे, कागदपत्रांची पूर्तता न करणे, ई-भातपिकाची नोंदणी नसणे अशा अनेक कारणांमुळे आजही अनेक अल्पशिक्षित शेतकरी भाताची विक्री करू शकलेले नाहीत.
जिल्ह्यातील भात पिकाचे प्रमाण वाढूनही हमी भावात विकण्याचे प्रमाण वाढलेले नाही. ही सर्व प्रक्रिया लहान शेतकऱ्यांना न परवडणारी असल्याने ते भाग घेत नसल्याचे दिसून येत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.