Environment : पैशांची भाषा आणि झाडांचे संवर्धन

पर्यावरणाचा (Environment) समतोल राखण्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून झाडं (Tree) लावा, झाडं जगवा हे आवाहन आपण ऐकत आलोय. पण ही वृक्षतोड (Tree Cut) थांबावी म्हणून केलेल्या आवाहनांचा किती परिणाम झाला किंवा होतोय, हे आपल्याला याची देही याची डोळा बघायला मिळत.
Environment
EnvironmentAgrowon

पर्यावरणाचा (Environment) समतोल राखण्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून झाडं (Tree) लावा, झाडं जगवा हे आवाहन आपण ऐकत आलोय. पण ही वृक्षतोड (Tree Cut) थांबावी म्हणून केलेल्या आवाहनांचा किती परिणाम झाला किंवा होतोय, हे आपल्याला याची देही याची डोळा बघायला मिळत.

आता शहरीकरण असो वा डांबरीकरण इथं वृक्षांची सर्रास कत्तल होताना आपल्याला दिसते. पण शेतीत सुद्धा असंच होत. म्हणजे जे आपल्या गरजेच आहे ते जगवायच आणि बाकीचं छाटून टाकायचं. म्हणजे शेतकरी सुद्धा त्याला जे हवंय ते झाड ठेवतो आणि बाकीची छाटून टाकतो...याची काही उदाहरणच आपण बघू

उपयोगिता हे झाड तोडण्याच्या मागचं एक मोठं कारण आहे. आता ते कसं? तर आपल्याला समृद्ध अशी निसर्गसंवर्धनाची परंपरा लाभली होती. ग्रामीण व आदिवासी भागात, जमिनीवर पाय ठेवताना आधी नमस्कार केला जायचा. मी तुझ्यावर पाय ठेवणार आहे, त्यामुळे मला अपराधी वाटत आहे. पण त्याशिवाय मला पर्याय नाही, म्हणून मी तुला आधी नमन करतोय, ही कृतज्ञतेची भावना प्रत्येक कृतीत असायची.

त्याकाळी स्थानिक वैद्य किंवा जाणकार औषधासाठी झाडाची मुळी, पाने काढताना ठरावीक वेळा पाळायचे. त्या झाडाजवळ थोडे तांदूळ ठेवायचे. आजही काही लोकांचे कुलदैवत असते तसे कुलझाड आहे. म्हणजे कडूनिंब ज्या कुटुंबांचे कुलझाड आहे ते कधीच ते झाड तोडत नाहीत. ज्या झाडांपासून औषधे मिळायची, ती झाडे जाणकार राखून ठेवत, त्यांचे संवर्धन करत. आजही ज्यांना झाडांचा औषधी वापर ठाऊक आहे असे गावकरी त्या झाडांची आपल्या बांधावर लागवड करतात.

या समृद्ध निसर्गसंवर्धन परंपरेतील एक उत्कृष्ट परंपरा म्हणजे देवराई. देवराई म्हणजे पूर्वीच्या काळातील राखीव वनक्षेत्र. या देवाच्या नावाने जंगल राखलेले असायचं. इथून कुणीही कधीही वाळकी काटकी सुद्धा उचलायची नाही, असा शिरस्ता. एखादा विशिष्ट आकाराचा दगड किंवा कोरलेला लाकडी आकार म्हणजे देव. हे देव असेच उघडे-वाघडे झाडाखाली मांडलेले असायचे. यांना कोणतही छप्पर लागत नसायच ना धूपबत्ती. पण तरीही हा देव या राईचा राखणदार असायचा. लोकांना येथून काहीही नेताना त्याचा धाक असायचा. वर्षानुवर्ष मानवी हस्तक्षेप नसल्यामुळे या ठिकाणी झाडे रुजायची, वाढायची.

पुढ काळ बदलला. जुनी माणसे गेली. मूळ संवर्धनाची परंपरा विसरून इथल्या गावकऱ्यांना प्रगतीची स्वप्न पडू लागली. मग झाडाखालचा देव ऐपतीप्रमाणे मातीच्या कौलारू मंदिरात किंवा पक्क्या सिमेंटच्या मंदिरात आला. ज्या झाडाने त्या देवाला इतके दिवस निवारा दिलेला असेल त्याच झाडाला काढून जागा मोकळी केली गेली.

मंदिर बनले तर सभामंडप हवा म्हणून अजून झाडे तोडली गेली. आणि कुणीकुणी शक्कल लढवून येथे बाहेरून आणून शोभेची फुलझाडे लावली. देवराईची आता बाग बनली. पुढे औषधासाठी इतरत्र उपलब्ध नसलेल्या पण देवराईत असलेल्या झाडांची साल काढली जाऊ लागली. हळूहळू धाक गेला. आता देव फक्त गावजत्रा-उत्सवापुरता उरला. एका समृद्ध निसर्गसंवर्धन परंपरेचा अज्ञानामुळे विनाश झाला. सोने फेकून देऊन आम्ही चिंधी सांभाळत बसलो.

झाडं तोडण्याचं हे एवढंच उदाहरण पुरेसं नाहीये. घरातली खाणारी चार तोंड वाढल्यावर डोंगरउतारावर भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त जमीन तयार करून भातशेतीच क्षेत्र वाढवतो.

त्यासाठी बऱ्याचदा डोंगरभागात वाढणाऱ्या करवंदीचा बळी दिला जातो. करवंदीची झुडुप डोंगरउतारावर मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यांच्यामुळे मातीच संवर्धन होत. या भागात प्रचंड पडणाऱ्या पावसाला अंगावर झेलत करवंदी मातीची धूप कमी करतात. शिवाय उन्हाळ्यात गोड रसदार फळे देतात. कच्या करवंदाचे लोणचे, चटणी, भाजी केली जाते.

आता इतक असूनही करवंदाची झुडूप, शेती वाढवण्यासाठी आणि घरातील जळणासाठी मोठ्या प्रमाणात तोडली गेली. जर गावातल्या कोणाला आपण विचारलं की बाबांनो करवंदीचा वापर अन्न म्हणून होतो, तरी का तोडतात ही झाड? तर उत्तर मिळत, करवंदीच्या भरपूर जाळ्या आमच्या रानात आहेत. म्हणजे त्यांच्या वापरासाठी भरपूर झाडे आहेत त्यांच्याकडे.

त्यामुळे बाकी ‘एक्स्ट्रा’ असलेली झाड तोडली तरी त्यांना चालणार असतं. आता एवढंच नाही तर राबणीच्या हंगामात सह्याद्रीच्या डोंगरपट्ट्यात भाताच पीक घेतलं जातं. भातरोपांची नर्सरी तयार करण्याची त्यांची विशिष्ट पद्धत आहे. त्याला राबणी म्हणतात. नर्सरीची जागा आधी भरपूर पालापाचोळा, झाडांच्या फांद्या टाकून भाजून घेतली जाते. त्यासाठी शेताजवळ काही जुनी झाड राखून ठेवली जातात. शिशिरात या झाडांची नैसर्गिक पानगळ सुरु होते, त्याआधीच या झाडांचे शेंडे छाटून राबाची जागा तयार केली जाते.

ज्या भागात अगदी २०-३० वर्षांपूर्वी गर्द झाडांची वनराई होती त्या भागात आज मोठ्या प्रमाणावर झाड तोडलेली दिसतात. राबणीसाठी लागणारी झाड, फळ मिळतात म्हणून राखलेली आंब्यासारखी झाड, विविध अवजारे किंवा घरासाठी लाकडाचा उपयोग होतो म्हणून राखलेली जांभूळ, निलगिरी किंवा बाभळीसारखी झाडे या उघड्या बोडक्या डोंगरावर तुम्हाला पाहायला मिळतात.

आता या झाड तोडण्यावर उपाय तो काय ?

तर या एक्स्ट्रा असलेल्या झाडांपासून जर यांना चार पैसे मिळवता आले तर लोक झाड तोडणार नाहीत. जंगलातल्या झाडांपासून उत्पन्न मिळाल तर ही झाडे राखली जाऊ शकतील.

उदाहरण म्हणून आपण कारवंदीच घेऊ. वृक्षसंवर्धन करणाऱ्या काही संस्थांनी त्या भात पट्ट्यात करवंदीच्या वापराचा प्रयोग सुरु केला. करवंद कच्ची असताना तेथील महिलांनी ते गोळा केले, त्यापासून लोणचे बनवले. पिकलेल्या करवंदांचा सरबत, जाम बनवला. आता करवंदे मोठ्या प्रमाणत मिळवण्यासाठी महिलांना दिवसभर फिराव लागल, उंच डोंगरावर जाव लागल. आधी भरपूर वाटणारे करवंद आता कमी पडू लागले. परिणामी पुढच्या वर्षी करवंदाची झाडं तोडण आपोआप थांबल.

या झाडांचा उपयोग जसा वाढेल अगदी तशीच त्या झाडांची कत्तल थांबेल. शेवटी झाडांमुळे जंगल आहे. जंगल असेल तर प्राणीसृष्टी, कीटकसृष्टी राहील. आणि हे सर्व असतील तरच मानव राहील, हे वास्तव आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com