
Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील अनेक भागात गुरुवारी (ता. ४) व शुक्रवारी (ता. ५) अवकाळी पावसाचे आक्रमण सुरूच होते. अनेक ठिकाणी झालेल्या जोरदार पावसाने शेतांना तळ्याचे स्वरूप आल्याचे चित्र पाहायला मिळाले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण शहरासह तालुक्यातील अनेक भागात गुरुवारी दुपारनंतर पावसाची हजेरी लागली. वैजापूर शहर व ग्रामीण भागातही अवकाळी पाऊस बरसला. कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी परिसरात सायंकाळी साडेचार नंतर जोरदार पाऊस झाला.
कन्नड तालुक्यातीलच नागापूर परिसरात गुरुवारी दुपारी दोन वाजता वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने शेतातून पाणी वाहून निघाले. नाल्यांना पाणी आले होते. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नागापूर सर्कलमधील परिसरातील मका गहू, कपाशीचे फरदड पिकांचे ठिकठिकाणी नुकसान झाले.
सद्यःस्थितीत, मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण होत असल्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके अवकाळी पावसामुळे वाया जातील या भीतीमुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. शासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
धाराशिव जिल्ह्यातील जेवळी परिसरात गेल्या आठ दिवसापासून दिवसाआड पाऊस होत आहे. गुरुवारी (ता. ४) रात्री साडेदहा ते साडेअकरा या काळात एक तासभर मेघगर्जनेसह दमदार पाऊस झाला.
या पावसाने गावातील रस्त्यावर पाणी वाहिले असून शेतात सकल भागात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. यापूर्वी एप्रिल, मे महिन्यात एवढा पाऊस कधी झाला नव्हता. या आठ दिवसात झालेल्या वादळी पावसाने शिवारात वीजेचे खांब, झाडे उन्मळून पडले असून कडब्याच्या गंजी विस्कटल्या आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.