Solapur Sugar Mill Election : करमाळा तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बागल गटाच्या विरोधात दाखल करण्यात आलेले मातब्बरांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत. त्यामुळे मकाई सहकारी साखर कारखान्याचा बिनविरोध निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
विशेष म्हणजे बागलांची मकाई कारखान्यावर चौथ्यांदा सत्ता येणार आहे, त्याची फक्त औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.
मकाई सहकारी साखर कारखान्याच्या १७ जागांसाठी ७५ उमेदवार अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ३९ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत, तर ३६ उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत, असे निवडणूक निर्णय अधिकारी सोपान टोंपे यांनी सांगितले.
स्थापनेपासून मकाई कारखान्यावर बागल गटाची एकहाती सत्ता राहिली आहे. मकाई कारखाना सध्या आर्थिक अडचणीतून जात आहे, अशा परिस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती.
या निवडणुकीत विरोधी गटाकडून प्रा. रामदास झोळ यांनी सुरुवातीपासूनच मकाई बचाव समितीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटचे दिवशी मोहिते पाटील समर्थक सविताराजे भोसले यांनी पॅनेल उभा करत उमेदवार अर्ज दाखल केले होते.
त्यांच्या एन्ट्रीमुळे मकाईची निवडणूक प्रक्रिया रंगतदार झाली होती. बागल विरोधात ज्यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत, त्यांच्याकडे आदिनाथ कारखान्याचा शेअर्स अपूर्ण असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे.
हा आक्षेप ग्राह्य धरून निवडणूक निर्णय अधिकारी टोंपे यांनी बागल विरोधातील अर्ज बाद ठरविले आहेत. त्यांनी वैध आणि अवैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. बाद झालेल्या यादीमध्ये मोहिते पाटील समर्थक सविताराजे भोसले, रामदास झोळ, माया झोळ, गणेश चौधरी या मातब्बरांसह अन्य उमेदवारांचा समावेश आहे.
...म्हणून विरोधकांचे अर्ज बाद
पाच गळीत हंगामापैकी तीन गळीत हंगामात मकाई साखर कारखान्याला ऊस न घालणे, जातीचा दाखला नसणे, उमेदवार, अनुमोदक, सूचक एकाच मतदारसंघातील नसणे, मतदार यादीत नाव नसणे, या मुद्द्यांच्या आधारे बागल विरोधकांचे उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी टोंपे यांनी अवैध ठरवले आहेत.
मात्र चर्चा असलेल्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची वाढीव शेअर्स रक्कम व इतर देणे बाकी या मुद्द्यांच्या आधारे एकही उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आलेला नाही.
बागल मैदानात नाहीत
तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे बागल विरोधी गटाचे सर्व अर्ज बाद झाले. तरी स्वतः कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल, बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांनी मात्र निवडणुकी आधीच त्यांच्याकडे असलेल्या थकबाकीमुळे आणि पुढे येणाऱ्या संभाव्या तांत्रिक अडचणीमुळे या निवडणुकीतून बाजूला होत आपल्या कार्यकर्त्यांना संधी दिली.
तसेच विरोधी गटाला गाफिल ठेवत आपल्या गटाकडे पुन्हा सत्ता मिळवण्याचा बागल यश मिळवले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.