
Bhandara News : मॉन्सून पूर्व तयारीचा आढावा घेताना या कालावधीत अचानक उद्भविणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला आळा घालण्यासाठी प्रत्येक विभागाची जबाबदारी महत्त्वाची आहे. मॉन्सून कालावधीतील संभाव्य धोका लक्षात घेता सर्व विभागांनी समन्वयाने नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मॉन्सूनपूर्व परिस्थितीची आढावा बैठक नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आली होती, या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी सुनील विंचणकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व विविध विभागाचे अधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होते.
अप्पर जिल्हाधिकारी विंचणकर म्हणाले, की मॉन्सून पूर्व कालावधीत सर्व विभागांनी नैसर्गिक आपत्तीचे नियोजन करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात नदीकाठावरील गावे पूर परिस्थितीने बाधित होतात व पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील गावांचा संपर्क तुटतो या गावांमध्ये संभाव्य पूर परिस्थतीमध्ये नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी जागा शोधून ठेवाव्यात.
उंच जागा, पर्यायी मार्ग, राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था व औषध साठा उपलब्ध ठेवावा. यासाठी उपविभागीय अधिकारी यांनी गावांना भेट देऊन पाहणी करावी.
प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधोपचार व्हावा यासाठी आरोग्य विभागाने नियोजन करावे. पावसाळ्यापूर्वी नगरपरिषद, नगरपंचायत व ग्रामपंचायतीने आपल्या क्षेत्रातील नाले, नाली साफसफाईची कामे करावी. सोबतच पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करावे. नॅशनल हायवेमुळे नैसर्गिक पाण्याचा निचरा होत नाही.
नैसर्गिक पाण्याचा निचरा होण्यासाठी पाणी साचलेल्या ठिकाणचे मार्ग मोकळे करण्यात यावे. गोसेखूर्द प्रकल्पाचे पाणी पातळीवर विशेष लक्ष देवून संजय सरोवर व बावनथडी प्रकल्प यांच्याशी संपर्कात राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.