
Pune News : उरात धडकी भरवणारा बेलाग लिंगाणा किल्ला दोरखंडाशिवाय केवळ ११ मिनिटात चढून गेलेला युवा शेतकरी तानाजी मोतीराम केकरे याने अवघ्या ३ तास १२ मिनिटात अलंग, मदन, कुलंग (एएमके) सर करीत राज्याला अचंबित केले आहे. त्याच्या रूपाने आता सह्याद्रीच्या कुशीत नव्या तानाजीचा उदय झाल्याची भावना गिरीप्रेमींची झाली आहे.
कळसूबाई पर्वतरांगेत आंबेवाडी गावात शेतकरी वडील मोतीराम केकरे व आई विठाबाई यांच्यासोबतच तानाजीही शेतीत राबतो. तो कला पदवीधर असून शास्त्रशुद्ध पर्वतारोहण कला शिकला आहे. इसवी सन १६७० मध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांनी सिंहगडाचा कातळकडा चढून तुंबळ युद्धात अजरामर पराक्रम केला. याच नरवीराला आंबेवाडीचा तानाजी आदर्श मानतो.
“माझा मावस भाऊ कैलास केकरे हा ‘एएमके’मध्ये गाइडचे काम करतो. मी दहावीत असताना एके दिवशी तो मला मदतनीस म्हणून ‘एएमके’च्या मोहिमेत घेऊन गेला. तेव्हा दोन दिवसाच्या या मोहिमेतून मला १००० रुपये पगार मिळाला.
ते पैसे मी आईच्या हाती दिले. तिने ते शेती कामासाठी वापरले. मला रोजगाराचा मार्ग सापडल्याने त्यानंतर गाइड म्हणून मी एका वर्षात दहावेळा ‘एमएमके’ सर केले,” असे तानाजीने सांगितले.
“ शेती सांभाळून बैलघाटातील २५० फुटावर पर्वतारोहण मोहिमेचे २०१९ मध्ये मी पहिल्यांदा नेतृत्व केले. त्यावेळी सारे शेतकरी माझ्या कौतुकासाठी एकत्र आले. त्यानंतर मी मागे वळून पाहिले नाही. २५० फुटाचा वजीर, ४५० फुटाचा वानरलिंगी, ३५० फुटी नागफणी असे सुळके सहज सर केले.
महाराष्ट्र रेंजर्स (पुणे) प्रस्तरारोहण संस्थेचा मी सदस्य झाल्यावर तेथून मला अमूल्य मदत मिळत गेली. त्यांनीच ११ मिनिटात लिंगाणा सर करण्यासाठी मला प्रोत्साहन दिले. दोर न वापरता मी पळत पळत लिंगाणा चढून गेलो. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून माझ्यावर आनंदाचा वर्षाव झाला,” असे तानाजी अभिमानाने सांगतो.
एमएमके सर करण्यासाठी सामान्य पर्यटकांना दोन दिवस लागतात. मात्र, दोन गिर्यारोहकांनी कमी वेळेत एएमके सर केले आहेत. एकाने साडेसात तासात तर दुसऱ्याने साडेचार तासात एमएमके सर केले होते.
मात्र, तानाजीने केवळ तीन तास १२ बारा मिनिटात एएमके मोहीम पूर्ण केली. लिंगाणा चढाईनंतरचा हा दुसरा विक्रम राज्याला अवाक् करणारा ठरला आहे. तानाजीची चार एकरांची शेती आहे. ती सांभाळून आता सह्याद्रीमधील विविध गिरीशिखरे कमी वेळेत सर करण्याचा तानाजीचा निर्धार आहे. (संपर्क ८६२४९१५६१०)
पर्वतारोहणाचे घेतले उच्च शिक्षण
माउंट अबू येथील एसव्हीआयएम संस्थेत २०१७ मध्ये तानाजीने आधुनिक पर्वतारोहणाचे धडे घेतले. तेथे १५० विद्यार्थ्यांमध्ये २५ सेकंदात ४५ फुटी प्रस्तरारोहण केले. प्रशिक्षणात प्रथम येत सुवर्णपदक घेऊन तो गावी परतला. विशेष म्हणजे शेतकऱ्यांकडून उसने पैसे घेत तानाजीने पर्वतारोहणाचे मूलभूत व उच्च शिक्षण घेतले आहे.
‘माझ्या साहसाकडे शासनाचे दुर्लक्ष’
‘‘शेती करीत पर्वतारोहणाची ही कला सतत विक्रमी पद्धतीने चालू ठेवणे माझ्यासाठी अवघड आहे. तरीही मी हे आव्हान पेलले आहे. देशातील इतर खेळांमध्ये विक्रम करणाऱ्यांचे कौतुक होते. त्यांना मदत मिळते. मात्र, माझ्याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. प्रस्तरारोहणासाठी प्रत्येक जण बूट वापरतात. ते खर्चिक असल्यामुळे मी घेतलेले नाहीत. त्यामुळे मी पायात काहीही न घालता मी पर्वतारोहण करतो,’’ असे तानाजीने सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.