
Jalna News : जिल्ह्यातील कडवंची (ता. जालना) शिवारातून समृद्धी महामार्गाच्या खालून ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या सोयीसाठी देण्यात आलेला रस्ता कमी उंचीचा असल्याने शेतीसाठी आवश्यक मोठी यंत्र वाहतुकीसाठी कमालीच्या अडचणी निर्माण होते आहेत.
शेतकऱ्यांना जास्तीचा खर्च करून फेऱ्याने मोठी यंत्रे आपल्या शेतात आणून आपली गरज भागवून घ्यावी लागत आहे. ही अडचण दूर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
शेतकऱ्यांच्या निवेदनानुसार, समृद्धी महामार्ग कडवंची, ता. जालना या गावामधून गेला. या महामार्गासाठी सुपीक जमीनी व द्राक्ष बागा शासनाने संपादित केल्या.
परंतु ग्रामस्थांच्या दळणवळणाच्या सोयीसाठी समृद्धी महामार्गाच्या खालून करण्यात आलेल्या रस्त्याचे कमी उंचीचे काम अडचणीचे झाले आहे. या रस्त्याच्या पुलाची उंची आवशकते पेक्षा कमी- म्हणजे फक्त ११ फूट असल्याने या रस्त्याने जड वाहनाच्या वाहतुकीस अडथळा येतो आहे.
परिसरात द्राक्ष वाहतुकीसाठी अवजड वाहनाची रहदारी चालू असते. तसेच शेतातील कडबा व इतर शेतमालाची वाहतूक, गहु काढणीसाठीचे हार्वेस्टर, ट्रक व मालवाहू वाहनाने करणे अत्यावश्यक बाब आहे.
परंतु समृद्धी मार्गाखालील पुलामधून साधी कडब्याची गाडी पास होत नाही. त्यामुळे शेतमाल व द्राक्ष वाहतूक रस्त्याच्या अडचणीमुळे खोळंबते आहे.
यासंदर्भात निवेदन देऊन दोन वर्ष झाले. परंतु निवेदनाचा आजपर्यंत विचार झालेला नाही. त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या संबंधित सक्षम अधिकाऱ्यामार्फत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून समृद्धी महामार्गाच्या खालून असलेल्या रस्त्याच्या पुलाची उंची वाढविण्याचे काम युद्ध पातळीवर करावी.
शेतकरी ग्रामस्थांची रस्त्याची अडचण कायमस्वरूपी सोडावी अशी मागणी कडवंची येथील शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे. न्याय न मिळाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.