
Parbhani News : शेतीमालावर आधारित प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून मूल्यवर्धन होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. जीवनमानाचा दर्जा सुधारेल.
त्यादृष्टीने जास्ती जास्त शेतकऱ्यांनी पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा (Prime Minister's Food Processing Industries Scheme) लाभ घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे (Collector Dr. Pratap Kale) यांनी केले.
कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या पंतप्रधान सूक्ष्म अन्न योजनेच्या जिल्ह्यातील प्रचारासाठी तीन चित्र रथ तयार करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात या चित्ररथास सोमवारी (ता. १३) डॉ. काळे यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला.
जिल्हा कृषी उपसंचालक तथा स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी बळिराम कच्छवे, भारतीय स्टेट बँकेचे मुख्य व्यवस्थापक शशी रंजन नारायण उपस्थित होते.
डॉ. काळे म्हणाले, की या योजनेअंतर्गत वैयक्तिक अन्न प्रक्रिया उद्योगासाठी ५० टक्के, तर बचत गटांमार्फत केल्या जाणाऱ्या उद्योगांसाठी ३५ टक्के अनुदान मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ उत्पादनावरच न थांबता शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योजक बनावे.
कच्छवे म्हणाले, की शेतीमालावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारणी व्हावी हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या अंतर्गत जिल्ह्यात १८२ उद्योग उभारणीचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी ४०० प्रस्ताव आले. त्यापैकी २९ प्रस्ताव मंजूर केले, तर १०० प्रस्ताव प्रक्रियेत आहेत.
उर्वरित प्रस्ताव नाकारण्यात आले आहेत. या योजनेत बेकरी, तेलघाणा, दाळ प्रक्रिया, गूळ आदी उद्योग शेतकरी, शेतमजूर महिला, शेतकरी गट, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना सहभागी होऊन उभारता येऊ शकतात.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.