
Chandarpur Agriculture News : सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासोबतच त्या माध्यमातून जमिनीचा कर्ब वाढविणे व त्यातून रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढीचा उद्देश साधणे यासाठी पुढाकार घेत चंद्रपूर जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने ‘उकिरडामुक्त गाव, खतयुक्त शिवार’ अभियानाची घोषणा करण्यात आली आहे. ‘महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने’तून याकरिता निधी देण्याचे प्रस्तावीत आहे.
या संदर्भाने जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी माहिती दिली. त्यानुसार, जिल्ह्यात १८३६ गावे व ६० हजार शेतकरी सभासद आहेत. खरीप हंगामात रासायनिक खतांचा वापर होतो. जिल्ह्याची ५४९ कोटी रुपयांची उलाढाल रासायनिक खतांवर होते.
मात्र जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी झाल्याने रासायनिक खतांची अपेक्षित परिणामकारकता साधता येत नाही. त्यासोबतच गावांतील खतांच्या ढिगांमुळे आरोग्यविषयक प्रश्नही निर्माण होतात. त्यामुळेच प्रशासनाने नॅडेप कंपोस्ट करून त्याच्या शेतीतील वापराला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रत्येक गावात ५० नॅडेप खड्डे करायचे. हे तीनदा भरले आणि तीनदा उपसले गेल्यास सात ते आठ टन कंपोस्ट खत मिळेल. एकूण सहा लाख टन कंपोस्ट खत जिल्हाभरात तयार होईल. त्याचा वापर शेतीत झाल्यास जमिनीचा कर्ब सुधारेल. पीएसबी, ऍझॅटोबॅक्टर याचे मिश्रण करता येईल. त्यातून कंपोस्ट खताची परिणामकारकता वाढेल.
नॅडेपचे असे आहे महत्त्व...
उकिरड्यात गवताचे बी असते. परिणामी ते थेट शेतात वापरल्यास शेतात तणाचा प्रादुर्भाव वाढतो. नॅडेपमध्ये तापमानात वाढ होत असल्याने गवताचे बी तग धरत नाही. उकिरड्यात खाली अधिक कुजलेले, मधात कमी प्रमाणात आणि वरच्या बाजूला सर्वात कमी कुजलेले राहते. त्यामुळे खताचा अपेक्षित परिणाम मिळत नाही, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.