Maharashtra Budget Session 2023 : विधानसभेत अवकाळी पाऊस, कांदा खरेदीवरून खडाजंगी

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधी आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
Maharashtra Budget Session 2023
Maharashtra Budget Session 2023Agrowon

बाळासाहेब पाटील

Mumbai News : ‘नाफेड’मार्फत (Nafed) बाजारात बंद असलेली कांदा खरेदी, अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे झालेल्या नुकसानीच्या मुद्द्यावरून विधानसभेत जोरदार खडाजंगी झाली. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी या मागणीसाठी आक्रमक झालेल्या विरोधकांनी सभात्याग केला.

तर शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर विरोधक मगरीचे अश्रू ढाळत आहेत. त्यांना केवळ राजकारण करायचे आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी केली. तसेच आम्ही शेतकऱ्यांना मदत करणार आहोत, असे आश्‍वासन दिले.

दरम्यान, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधी आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. विधानसभेचे कामकाज सुरू होताच, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चर्चेला सुरुवात केली.

कामकाज बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर चर्चा करावी, अशी मागणी केली. राज्यात विविध भागांत अवकाळी पाऊस, गारपिटीने उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा, गहू, हरभरा, सोयाबीन, मका, तूर, केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे, तरी नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या, अशी मागणी त्यांनी केली.

Maharashtra Budget Session 2023
Pawar-Fadnvis Politics : पवार-फडणवीस यांच्यात निर्णय स्थगितीवरून खडाजंगी

आंबा, काजू, द्राक्षे, केळी, संत्रा,‍ लिंबू, पपई, कलिंगड यांसारख्या अनेक फळपिकांबरोबरच हरभरा, तूर, मका, वाल, चवळी, पावटा व पालेभाज्यांचेही नुकसान झाले आहे. पाऊस आणि विजेमुळे जनावरे मृत झाली आहेत, या शेतकऱ्यांना तातडीच्या मदत करा, अशी मागणी पवार यांनी केली.

छगन भुजबळ यांनीही कांदा खरेदी आणि अवकाळी पावसाचा मुद्दा उपस्थित केला. मात्र या विषयावर स्थगन प्रस्ताव आले आहेत. त्या वेळी यावर चर्चा करू असे सांगून अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रश्‍नोत्तराचा तास पुकारला.

शेतकरी संकटात असताना धुळवड खेळता ः पवार

प्रश्‍नोत्तराच्या तासानंतर स्थगन प्रस्ताव नाकारत अध्यक्ष नार्वेकर यांनी या विषयावर बोलण्याची विरोधकांना संधी दिली. या वेळी अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, ‘‘अवकाळी पावसाने शेती नष्ट झाली असताना काही जण धुळवड साजरी करत होते.

कांद्याची खरेदी सुरू झाली असे सांगितले जात आहे. मात्र ‘नाफेड’कडून खरेदी सुरू झाली आहे, असे सांगत सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. जर कांदा खरेदी सुरू झाली असेल तर ती कुठे झाली? हेही सांगा.

लहरी निसर्गाने शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे, तर दुसरीकडे सरकारच्या संवेदना बोथट झाल्याने शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. आता सरकारने केवळ ‘बघू’, ‘करू’ असे आश्‍वासन न देता कृतीतून काम केले पाहिजे.’’

राजकारण करू नका : नाना पटोले

काँग्रेसचे नाना पटोले यांनी या विषयावर राजकारण करू नये असे आवाहन करत, मागील सरकारने काय केले आणि आता काय करू असे सांगत बसू नका. पहिल्या दिवशीपासून विरोधी पक्ष भूमिका मांडत आहे. कांदा प्रश्‍नात सरकारने लक्ष घातलेले नाही.

गारपिटीमुळे कांद्याचे नुकसान झाले आहे. कांदा ठेवायला जागा नाही. उभे आणि निघालेले पीकही खराब झाले आहे. कापूस, गहू, हरभरा, फळबागा, भाजीपाला खराब झाला आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती भयावह असताना दुसरीकडे धुळवड सुरू होती.

कडे शेतकऱ्याच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत. भयावह परिस्थिती असताना ज्यांना धुळवड खेळायची त्यांनी जरूर खेळावी, पण टोलवाटोलवी करू नये.’ भाजपच्या जयकुमार रावळ यांनी या चर्चेदरम्यान हरकतीच्या मुद्द्याद्वारे चर्चेला समर्थन देत विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील नुकसानीकडे लक्ष वेधत तत्काळ पंचनाम्यांचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली.

कापूस कोंडीमुळे २३६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या : भुजबळ

कापूस कोंडीमुळे यंदा २३६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तसेच मुक्ताईनगरमध्येही एका शेतकऱ्याने तसा प्रयत्न झाला. एका शेतकऱ्याने शेतीमालाला भाव मिळत नसल्याने राष्ट्रपतींना पत्र लिहून रोटावेटर फिरविण्यासाठी अनुदान मागितले. एका गावातील नागरिकांनी गाव विकायचा आहे, असे सांगितले.

आता अवकाळी पावसाने गहू, द्राक्षाच्या बागा उखडून गेल्या आहेत. त्यावरील भांडवली खर्च वाया गेला. त्या बागा उभ्या करण्यासाठी खर्च करावा लागेल. द्राक्षांच्या बागासाठी घेण्यात येणारे कर्ज कुठून फेडायचे असा प्रश्न आहे. गुजरात आपल्यापेक्षा लहान राज्य आहे.

तेथील कांदा उत्पादन आपल्या तुलनेत कमी आहे. तरीही तेथे ३५० कोटी अनुदान, वाहतूक आणि निर्यात अनुदान दिले आहे. आम्ही आठवड्यापासून प्रश्‍न मांडतोय तरीही लक्ष दिले जात नाही. नाफेडच्या कंपन्या मार्केटमध्ये उतरून बोली लावत नाहीत. ते बाहेरची खरेदी करत आहेत. त्यांना ताबडतोब अनुदान द्यावे लागेल.

गुजरात सरकार देऊ शकते, तर महाराष्ट्र सरकार का देऊ शकत नाही? जयंत पाटील यांनीही या प्रश्‍नावर सरकार काय करते ते कळले पाहिजे असे सांगत चर्चेची मागणी केली. मात्र अध्यक्षांनी पुढील कामकाज पुकारल्याने विरोधक आक्रमक झाले. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.

Maharashtra Budget Session 2023
Jammu Kashmir Election : जम्मू-काश्‍मीरमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे

विरोधकांचे मगरीचे अश्रू : फडणवीस

विरोधी पक्षांचे अश्रू मगरीचे आहेत. त्यांना राजकारण करायचे आहे. त्यांच्या काळातील कर्जमाफीतील अनुदानाचे पैसे दिले नाहीत. शेतकऱ्यांना ६० हजार कोटी रुपये आम्ही दिले. अवकाळीचे पंचनामे करायचे आदेश दिले आहेत.

पंचनामे करून त्या शेतकऱ्यांना पैसे देऊ, ‘नाफेड’ची खरेदी सुरू आहे. हे सगळे सुरू असतानाही विरोधक राजकारण करत आहेत. हे शेतकऱ्यांच्या बाजूने नाहीत.

हे शेतकऱ्यांच्या बाजूचे असते तर त्यांनी पैसै दिले असते. यांचे मगरीचे अश्रू आहेत. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या, कांदा उत्पादक, अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com