
Washim District : वनोजा गावशिवारात (Vanoja Village) पाण्याची तशी कायम टंचाई असते. वीस ते २५ वर्षांपूर्वी पिण्याच्या पाण्याचाही अडचण उन्हाळ्यात जाणवायची. आता मात्र फळशेतीच्या (Fruit Agricultural) माध्यमातून गावात कायापालट झालेला दिसून येतो.
शिवारात जलसंधारणाची (Jalsandharan) कामे झाली आहेत. आज बारमाही सिंचन होईल एवढे पाणी नाही. मात्र उपलब्ध पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर करीत येथील शेतकरी फळबाग लागवडीत आघाडी घेत आहेत.
दहा वर्षांत शिवारात संत्रा बागांची संख्या वाढत असून, त्याखालील क्षेत्र दोन हजार एकरांपर्यंत पोहोचले आहे. काही शेतकऱ्यांनी सीताफळ, लिंबू लागवडही केली आहे. गावातील अल्पभूधारकही फळशेतीतून चांगले पैसे मिळवत आहेत.
पुरुषोत्तम राऊत यांची अवघी दोन एकर बाग आहे. यंदा त्यांनी व्यापाऱ्याला १८ लाखांत बाग दिली. गेल्या हंगामातही त्यांनी काही लाखांचे उत्पन्न मिळवले.
काटेकोर नियोजन व व्यवस्थापनाआधारे त्यांनी ‘मॉडेल’ बाग उभारली आहे. असे अनेक प्रयोगशील शेतकरी गावात तयार होत आहेत. तरुणपिढी शेतीत उतरत आहे.
वनोजा गाव- दृष्टिक्षेपात शेती
-सुमारे सहा हजार लोकसंख्या.
-भौगोलिक क्षेत्र- २५५० हेक्टर, पैकी फळबाग- ८१० हेक्टर
-जमीन हलक्या ते मध्यम स्वरूपाची. त्यात संत्रा (नागपुरी वाण), सीताफळ, लिंबू लागवड, हरभरा, गहू यांसारखी आंतरपिके.
-शंभर टक्के ठिबक सिंचन. सामूहिक शेततळी. प्रत्येकाकडे विहीर असून, पावसाळ्यात त्यातील पाणी शेततळ्यात साठवून ठेवण्यात येते. वनोजा पाझर तलाव तसेच पूर्वेकडे सोनल प्रकल्पाचा प्रमुख कालवा आहे. त्याचा फायदा होतो. एकूण शेततळी ३२
-जलसंधारण कामे- २१ नाला खोलीकरण, २४ सिमेंट प्लग, ६ गट ढाळीचे बांध.
-कृषी विभागाकडून फळबाग, शेततळे, सिंचन साहित्यासाठी पाठबळ.
-२३१ हेक्टरवर रोहयोअंतर्गत लागवड. ३६ हेक्टर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड.
उत्पादन व विक्री व्यवस्था
पूर्वी गावातील शेतकऱ्यांकडे संत्रा उत्पादकता एकरी ८ टनांपर्यंत होती. आता सुधारित तंत्र व एकमेकांच्या चर्चेतून उत्तर शोधत ती १२, १५ टनांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या तीन वर्षांत फळांना सरासरी ३५ ते ५० रुपये प्रति किलो दर मिळाला आहे.
व्यापारी गावात येऊन थेट खरेदी करतात हा माल बहुतांश केरळ तसेच दक्षिणेकडील अन्य राज्यांत जातो.
काही शेतकऱ्यांनी गेल्या हंगामात स्वतः हैदराबाद, बंगळूर, मुंबई, नागपूर येथे विक्री केली. देशातील वैभवशाली मानला जात असलेला समृद्धी महामार्ग गावाला लागूनच गेल्याने येत्या काळात संत्रा उत्पादकांना त्याची मोठी मदत होऊ शकणार आहे.
अर्थकारण उंचावले
संत्रा शेतीतून गावात आठ ते १० कोटी रुपयांची उलाढाल होत असावी. अर्थकारण उंचावल्याने गावाचा चेहरामोहरा बदलणे शक्य झाले आहे.
शेतकऱ्यांनी बांधलेली आखीव-रेखीव घरे पाहण्यास मिळतात. सर्वत्र सिमेंट काँक्रीटचे रस्ते, सांडपाणी नाल्या बांधलेल्या दिसतात. चौकांचे सौंदर्यीकरण झाले आहे. पहिली इयत्तेपासून ते पदवीपर्यंतच्या शिक्षणाची सोय गावातच आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.