
Nashik News : बंगळूर येथील भारतीय फलोत्पादन संशोधन संस्थेशी (Indian Horticulture Research Institute) (आयआयएचआर) संलग्न चेट्टल्ली (कोडगु) येथील केंद्रीय फलोत्पादन प्रायोगिक केंद्राने ‘अर्का कूर्ग रवी’ हा ॲव्होकॅडोचा वाण विकसित केला आहे.
आरोग्यवर्धक म्हणून आहारात व सौंदर्य प्रसाधने उद्योगात या फळाचे महत्त्व आहे. केंद्रातर्फे शेतकऱ्यांना कलम रोपांचे वाटप सुरू झाले आहे. महाराष्ट्रातही प्रायोगिक तत्त्वावर राष्ट्रीय स्तरावरील संस्था व शेतकरी यांच्या पातळीवर या वाणाच्या लागवडीस चालना मिळाली आहे.
लोण्यासारखा स्वाद असलेले ॲव्होकॅडो हे परदेशातील प्रसिद्ध फळ आहे. त्याला ‘लोणी फळ’ म्हणूनही ओळखले जाते. आरोग्यवर्धक व पौष्टिकता यासाठी आहारात वापर, तसेच सौंदर्य प्रसाधने उद्योगातही त्यास मागणी वाढत आहे.
त्वचासंवर्धन उत्पादनांमध्ये त्याचा वापर केला जातो. त्या दृष्टीने बंगळूर येथील भारतीय फलोत्पादन संशोधन संस्थेशी (आयआयएचआर) संलग्न चेट्टल्ली (कोडगु) येथील केंद्रीय फलोत्पादन प्रायोगिक केंद्राने ‘अर्का कूर्ग रवी’ हा ॲव्होकॅडोचा वाण विकसित केला आहे.
२००४ पासून त्याविषयी संशोधन सुरू होते. हा वाण २०२० मध्ये प्रसारित करण्यात आला. लागवड व उत्पादनासंबंधी यशस्वी चाचण्या घेतल्यानंतर जून २०२२ मध्ये तंत्रज्ञान प्रसार व व्यवस्थापन समितीने लागवडीसाठी शिफारस केली.
केंद्रीय फलोत्पादन प्रायोगिक केंद्राचे फळविज्ञान विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. बी. एम. मुरलीधर यांनी याविषयी माहिती दिली.
१९१९ दरम्यान कर्नाटक राज्यातील कूर्ग भागात पर्वतीय प्रदेशात ब्रिटिशांनी ‘ॲव्होकॅडो’ची लागवड केली होती असा संदर्भ आहे. त्यामुळे या भागांत या फळाच्या लागवडीला चालना मिळाली. याच धर्तीवर वाण विकसित करण्यासंबंधी संशोधन झाले.
या वाणाचा प्रसार केंद्रातर्फे करण्यात येत आहे. केंद्राने अलीकडेच शेतकऱ्यांना कलम रोपांचे वाटप करण्यास सुरुवात केली आहे. चालू वर्षी १० हजार रोपांचे वितरण करण्याचा लक्ष्यांक निश्चित केला आहे. त्यापैकी पाच हजार रोपांचे वितरण व विक्री करण्यात आली आहे.
कर्नाटकातील बंगळूर परिसरासह रामनगर, चिकबल्लापूर तसेच केरळ, तमिळनाडू, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथील शेतकरीही कलम रोपे खरेदी करत आहेत.
संशोधित वाणाची वैशिष्ट्ये :
- लागवडीपश्चात तिसऱ्या वर्षात फळधारणा सुरू
- फळांचे वजन ४५० ते ६०० ग्रॅम
- फळातील गराची ‘रिकव्हरी’ ७५ टक्क्यांवर
- इतर फळांच्या तुलनेत बी आकाराने कमी, गर अधिक
- ४० अंश तापमानाखाली लागवड योग्य
महाराष्ट्रात प्रायोगिक लागवडी सुरू
बारामती (पुणे) येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अबायोटिक स्ट्रेस मॅनेजमेंट या संस्थेने २५० रोपे प्रायोगिक तत्त्वावर लागवडीसाठी नेली आहेत. अलीकडे सोलापूर भागातील काही शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्त्वावर लागवडीसाठी १० ते २० कलम रोपे नेली असल्याचे केंद्राने कळविले आहे.
लागवडीपश्चात निरीक्षणांच्या नोंदींनुसार वाणामध्ये तीन वर्षांनंतर प्रति झाड १५ किलो फळे मिळतात. तर व्यावसायिक पद्धतीने ८ वर्षांनंतर ८० किलो उत्पादन मिळू शकते, असे अभ्यासात आढळले आहे.
सुरुवातीच्या काळात झाड सक्षम करून टप्प्याटप्प्याने उत्पादनवाढ करावी, सल्ला देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्त्वावर व शास्त्रज्ञांचा सल्ला घेऊन लागवड करावी. उत्पादनाचे परिणाम तपासून लागवडीचा विस्तार करावा.
एकावेळी मोठ्या क्षेत्रावर लागवड करून नये, अशी माहिती शास्त्रज्ञ डॉ. मुरलीधर बी. एम. यांनी दिली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.