मराठवाड्यातील काही भागात दरवर्षी वेळ अमावस्या (Vel Amavasya) मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी शेतात जाऊन पूजा केली जाते. प्रामुख्याने कर्नाटकातील काही तालुके, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, सोलापूर जिल्ह्यातील काही तालुके या भागात वेळ अमावस्या साजरी केली जाते. मुळात कर्नाटक मध्ये ‘येळ’ म्हणजेच सात. आणि जूनपासून येणारी सातवी अमावस्या म्हणजे 'येळवस'. याचाच अपभ्रंश होऊन ‘वेळ अमावस्या’असे नाव पडले असावे.
या दिवशी शेतात कडब्याची कोप तयार करून त्यावर शाल पांघरली जाते. या कोपीमध्ये दगडाचे ५ पांडव बनवले जातात, लक्ष्मी तयार केली जाते व त्यांची पूजा केली जाते. पांढऱ्या चुन्याने मातीचे मडके रंगवून त्यामध्ये कणकेचा दिवा ठेवला जातो. या मडक्याला मोरवा असे म्हणतात. पुजा करुन आरती झाल्यानंतर बनवलेले अंबिल आणि उंडे एकत्र करून रबी हंगामातील जी पीक आहेत त्यावर शेतभर हे शिंपडलं जातं. शेतात पीकं चांगली पिकू दे , पिकांना चांगला बाजार भाव मिळू दे यासाठी प्रार्थना केली जाते.
आशाप्रकारे भूमातेला धन्यवाद दिला जातो, अशी प्रथा आहे. यानंतर मित्र परिवारासह निसर्गरम्य वातावरणात अंबील, उंडे, खीर, गुळशेंगदाण्याच्या पोळ्यां चा आस्वाद घेतला जातो. या पदार्थांबरोबरच विविध रानमेव्याचा आस्वाद घेतला जातो. दिवसभर रानात भटकणे ढाळे, पेरु, ऊस, बोरं इ. रानमेवा चाखण्याचा आनंद घेतला जातो. या दिवशी शहरात सहसा शुकशुकाट दिसतो, कारण सर्व मंडळी आपापल्या शेताकडे जातात.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.