
Solapur News : ‘‘पाणी समस्येवर मात करण्यासाठी जलसंधारण महत्त्वाचे आहे. शासनाने वेगवेगळ्या अभियानाच्या माध्यमातून दुष्काळी तालुक्यातील तलाव, विहिरी, नद्या, पुनरुज्जीवित केल्या आहेत. गावे टँकरमुक्त केली आहेत.
एकरूख हा ब्रिटिशांच्या काळातील तलाव गाळमुक्त केला, तर साठणाऱ्या पाण्यातून हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येईल आणि जलसंधारणाच्या माध्यमातून परिसरातील गावे समृद्ध होतील,’’ असे मत प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी व्यक्त केले.
राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्या वतीने ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ या अभियानाचा प्रारंभ उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डीजवळ एकरूख तलाव येथे प्रभारी जिल्हाधिकारी ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता दयासागर दामा, कार्यकारी अभियंता पंडित भोसले, भारतीय जैन संघटनेचे केतन शहा, शिवराज संस्थेचे अध्यक्ष अविनाश मार्तंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ठोंबरे म्हणाले, ‘‘या अभियानांतर्गत जिल्ह्यात १२२ ठिकाणी हे अभियान राबविले जाईल. यासाठी १६ सामाजिक संस्थांची नियुक्त केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून तलावातून गाळ काढून शेतकऱ्यांना मोफत दिला जाईल.
माजी सैनिक, विधवा. अंध, अपंग यांच्यासाठी वाहतुकीसह मोफत गाळ दिला जाईल. ज्या सामाजिक संस्थांना हे गाळ काढण्याचे काम दिले आहे. त्यांना ३५ घनमीटर प्रमाणे ३७ हजारांचे अनुदान दिले जाईल.’’
‘‘मार्डीतील शिवराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे गाळ काढण्यास प्रारंभ झाला. संस्थेने दोन जेसीबी, चार हायवा तयार ठेवले आहेत. परिसरातील २४ शेतकऱ्यांनी गाळ घेऊन जाण्यासाठी नोंदणी केली आहे,’’ अशी माहिती मार्तंडे यांनी दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.