
Sangli Water News : ताकारी उपसा जलसिंचन योजनेचे (Takari Jalsinchan Yojana Sangli) यंदाचे पहिले उन्हाळी आवर्तन बुधवारपासून (ता. १५) सुरू करण्याची पूर्वतयारी झाली असून अनुषंगिक कामे झाली आहेत.
त्यामुळे पाणी (Water) ठरलेल्या तारखेला निश्चित सुरू करणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी दिली.
यापूर्वीचे ‘ताकारी’चे यंदाचे पहिले आवर्तन ६ डिसेंबर ते १४ जानेवारीअखेर ४० दिवस सुरू होते. त्या वेळचे पाणी मुख्य कालव्याच्या १४४ किलोमीटरपर्यंत सोनी-भोसे (ता. मिरज) येथे पोहोचल्यानंतर बंद केले होते. त्या पाण्याने लाभक्षेत्रातील पिकांना चांगलाच दिलासा दिला होता;
मात्र सध्याचा वाढलेला कडक उन्हाळा, अस्तरीकरणामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे कमी झालेले प्रमाण, शिवाय सिंचनक्षेत्रासाठी होणारा प्रचंड पाणीउपसा या कारणाने जलस्रोत आटले आणि टंचाई निर्माण झाली आहे.
शेतीला पाणी कमी पडू लागल्याने सोडण्याची मागणी होत होती. त्यांस अनुसरून पाटबंधारे विभागाने पाणी तत्काळ सोडण्याचे नियोजन केले आहे.
ताकारी योजनेच्या दोन्ही टप्प्यांवरील देखभाल-दुरुस्तीची कामे उरकली आहेत. वीजपुरवठा जोडण्यात आला आहे. साटपेवाडी बंधाऱ्यात पाणी अडविण्यास सुरुवात केली आहे.
पाणीउपसा करण्यासाठी दोन्ही ठिकाणचे प्रत्येकी १२ पंप सुस्थितीत तयार ठेवले आहेत. त्यामुळे ‘ताकारी’चे पहिले उन्हाळी आवर्तन बुधवारपासून (ता. १५) सुरू होणार आहे.
ऐन उन्हाळ्यात या पाण्याचा लाभ बारमाही बागाईत शेतीसह उन्हाळी पिकांना होणार आहे. तसेच कडेगाव, खानापूर, पलूस आणि तासगाव तालुक्यातील बऱ्याच गावांच्या पाणीपुरवठा योजनांचा प्रश्न मिटणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.