
Water News : बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात सध्या विहिरींच्या पाण्याची पातळी पूर्णपणे खालावली आहे. शेती सिंचनाच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. पिकांबरोबर चारा पिके ही धोक्यात आली असून जनावरे जगवताना शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.
वास्तविक जिरायत भागाला शेती सिंचनासाठी हक्काचा आधार मिळावा, यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून पुरंदर उपसा सिंचन योजना सुरू केली.
मात्र आत्तापर्यंत ज्या तुलनेत योजनेवर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला आहे, त्या तुलनेमध्ये प्रत्यक्ष लाभार्थी शेतकऱ्यांना त्या प्रमाणात फायदा होत नसल्याची वस्तुस्थिती आहे.
विजेच्या अडचणी, पाईपलाईनमधील तांत्रिक अडचणीमुळे आजही पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पैसे भरूनही वेळेवर पाणी मिळत नसल्याची स्थिती आहे.
लोणी भापकर परिसरातील शेतकरी उपजीविकेसाठी पूर्णपणे शेती आणि शेतीपूरक व्यवसायांवर अवलंबून आहेत.
शेतीसाठी मुबलक पाणी ही मुख्य गरज असून विहिरींना पाणीच नसल्यामुळे व पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी पैसे भरूनही वेळेत मिळत नसल्यामुळे शेती व पशुधन दोन्हीही अडचणींच्या विळख्यात आहेत.
पशुधनाची संख्या जास्त असलेले शेतकरी पर्याय म्हणून बागायती भागातून चारा आणून मुरघासाचा प्रयोग करत आहेत. मात्र यामध्ये उत्पादन खर्च जास्त व उत्पन्न जेमतेम अशी परिस्थिती निर्माण होत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.