
शेती मग ती बागायती असो किंवा कोरडवाहू चांगल्या उत्पादनासाठी जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म टिकवून ठेवण्यासाठी जमिनीच्या मशागतीला महत्व आहे.
बियांचे अंकुरण, पिकाच्या मुळांची वाढ होण्याकरिता जमिन मोकळी व भुसभुशीत असणे आवश्यक असतं. त्यासाठी पिकाच्या पेरणीपुर्वी जमिन चांगली नांगरली (Ploughing) केली जाते.
खरीप (Kharif) आणि रब्बी (Rabbi Season) पिके घेतल्यानंतर उन्हाळा (Summer Season) सुरु होण्यापूर्वी जमिन नांगरून तापू दिली जाते, या प्रक्रियेला शास्त्रीय भाषेत सॉईल सोलरायझेशन म्हणतात.
पूर्वी बैल नांगराने तर आता ट्रॅक्टरद्वारे एक ते दीड फूट खोल जमिन नांगरली जाते. उन्हाळ्यात ३५ अंश सेल्सियसपेक्षा अधिक तापमान गेले कि १५ से.मी. खोलपर्यंत जमिनीचे तापमान वाढते.
अशा वेळी नांगरट केल्यास जमिनीतील बुरशीजन्य रोग, किडींच्या सुप्तावस्था, कोष नष्ट होतात. त्यामुळे उ्हाळ्यातील जमिनीची खोल नांगरट अतीशय महत्वाची आहे.
आजकाल शेतीची नांगरट करताना चाप्या निघण्याच प्रमाण वाढल आहे. नांगरट करताना जर चाप्या निघण्याचं प्रमाण जास्त असेल तर जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी होत चाललं आहे असं समजाव.
तर चाप्या कमी निघत असतील तर अशा जमिनीचं आरोग्य चांगल आहे असं समजावं. यासाठी जमिनीतील सेंद्रिय कर्बाच प्रमाण तपासण आवश्यक आहे.
पाऊस पडतो तेंव्हा तो कडक जमिनीवरून पटकन वाहून जातो, ओल खोलपर्यंत जात नाही नांगरलेल्या जमिनीत पाणी खोलवर जिरते,त्यामुळे जमिनीतील ओल टिकून राहते.
त्याचा फायदा पिकाच्या वाढीसाठी होतो.जमीन ओली राहिल्याने सेंद्रिय पदार्थांचे विघटन लवकर होते, त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकांना सहज उपलब्ध होतात.
नांगरटीचा उद्देश साध्य होण्यासाठी, पूर्वीचे पीक काढल्याबरोबर लगेच नांगरट करणे फायद्याचे ठरते.
कारण यावेळी जमिनीत ओलावा असल्याने नांगरटीचे काम हलके होते, ढेकळे निघत नाहीत, नांगरट खोलवर होते, पूर्वीच्या पिकाचा पालापाचोळा, काडीकचरा जमिनीत गाडला जातो व जमिनीस सेंद्रिय पदार्थाचा पुरवठा होतो.
पिकांची काढणी झाल्यानंतर म्हणजेच सर्वसाधारणपणे मार्च–एप्रिलमध्ये त्वरित नांगरण्या कराव्यात.
हलक्या जमिनी पीक काढण्याच्या वेळी घट्ट होतात म्हणून एप्रिल किंवा मे महिन्यात वळवाचा पाऊस पडल्यानंतर किंवा पावसाळ्याच्या सुरवातीला पहिला पाऊस पडल्यानंतरच नांगराव्यात.
हंगामात घ्यावयाच्या पिकानुसार, नांगरटीची खोली ठरवावी. सर्वसाधारणपणे ऊस, बटाटा, आले, भाजीपाला अशा बागायती पिकांसाठी जमिनीची १५ ते २० से.मी खोल नांगरट करणे आवश्यक आहे तर ज्वारी, बाजरी, गहू, भुईमुग या पिकांसाठी जमिन १० ते १५ से.मी. खोल नांगरावी.
खोल नांगरटीमुळे पिकांच्या मुळांची योग्य वाढ होऊन वेगवेगळ्या थरातील अन्नद्रव्ये पिकाला उपलब्ध होतात.
जमिनीला भरपूर सूर्यप्रकाश मिळून उष्णता जमिनीस पोषक ठरते. तसेच जमिनीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढते.
याशिवाय जमिनीचा कडक झालेला पृष्ठभाग भुसभूशीत होऊन जमिनीची भौतिक, रासायनिक व जैविक अवस्था सुधारते. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती आम्हाला नक्की कळवा.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.