
नाशिक म्हणजे द्राक्षांची भूमी (Grape Farm) हे महाराष्ट्राला पाठ झालेलं वाक्य आहे. द्राक्ष शेती म्हणलं की नाशिकबरोबर (Nashik) सांगलीचंही नाव डोळ्यांसमोर येतं. परंतु विदर्भातही काही ठिकाणी द्राक्षशेती केली जाते. विदर्भाचं नाव ऐकून साहजिकच कानावर आणि डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. विदर्भात द्राक्षशेती करायचा प्रयॊग केला होता राज्याचे ११ वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांनी.
स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्राची जडणघडण करण्यात यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्यासोबत वसंतराव नाईक यांचाही मोलाचा वाटा राहिला. वसंतराव फुलसिंग नाईक हे विदर्भाच्या पुसद तालुक्यातील रहिवासी. १९५२ साली झालेल्या पहिल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीत ते पुसदचे आमदार झाले. नाईक आमदार म्हणून कार्यरत असताना विदर्भ हा मध्य प्रांताचा भाग होता. १९५६ साली त्यांना पहिल्यांदा मध्यप्रदेशात महसूल उपमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. तर एप्रिल १९५७ ते १९६० दरम्यान त्यांनी कृषिमंत्री म्हणून काम केलं.
दरम्यानच्या काळात वसंतराव नाईक यांनी कृषिविषयक अभ्यासासाठी चीन, जपान, सिंगापूर, श्रीलंका आदी देशात दौरे केले. परदेशातील संकरित वाणांची त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ओळख करून दिली. चिकू, द्राक्षे, केळी, संत्री, लिंबू, मोसंबी आदी फळपिकांवर संशोधन करून विदर्भातील शेतकऱ्यांना फळपिकांकडे आकर्षित केलं.
वसंतराव नाईक मुख्यमंत्री असतानाच्या काळात विदर्भातील द्राक्षशेती इतक्या जोमात होती की, पुसद भागात द्राक्षांच्या मोठमोठ्या घसांच्या फळभारामुळे द्राक्षवेलींचे लोखंडी मांडव वाकलेले असायचे असं म्हटलं जायचं.
केवळ अन्नधान्य पिकांमध्येच नव्हे तर फळपिकांतही संकराचा वापर करण्यासाठी वसंतराव नाईकांनी प्रोत्साहन दिले होते. महाराष्ट्रात नाशिक भागात द्राक्षाचं उत्पादन व्हायचं. परंतु नाईकांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिल्यामुळे पश्चिम विदर्भात द्राक्षाची बागायत मोठ्या प्रमाणात होऊ लागली. तसेच पुसद सारख्या भागात शेतकऱ्यांनी द्राक्षाची बाग फुलवली. विदर्भातील द्राक्षशेती विषयीची त्यांची ‘कम्युनिझमचा पराभव ग्रेपीझमने करू' ही घोषणा खूपच प्रसिद्ध झाली होती.
अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. गोपालकृष्णन हे 'किंग ऑफ ग्रेप्स' म्हणून त्यावेळी प्रसिद्ध होते. द्राक्ष तज्ज्ञ म्हणून त्यांचा मोठा लौकिक होता. विदर्भात द्राक्षशेती फुलवण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. अनाबेशाही नावाच्या अतिशय उत्तम प्रतीच्या द्राक्षाचे वाण वापरण्यात आले. परिणामी शेतकऱ्यांना त्या काळात अर्ध्या एकरात खर्च वजा जाता जवळजवळ ५० हजार रुपये शिल्लक राहू लागले. कर्जात जन्मलेला, आयुष्य कर्जात काढलेला आणि आपल्या मुलाबाळांसाठी कर्जाचा वारसा सोसलेला महाराष्ट्राचा शेतकरी ओलिताखाली शेती करू लागला. दुबार पिकं घेतल्यामुळे कर्जमुक्त होऊ लागला, त्याच्या जीवनात समृद्धी आली, त्याची पोरंबाळं शिकू लागली.
वसंतराव नाईकांमुळे हे शक्य झालं होतं. त्यांच्या शेतीविषयक कार्याचे कौतुक तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केलं होतं. शिवाय नाईकांनी महाराष्ट्रात राबविलेली रोजगार हमी योजना देशभरात राबविली गेली. त्यांनी १९५२ ते १९७९ या २७ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत शेती विषयक अनेक महत्वपूर्ण योजना राबविल्या. त्यांच्या कृषी विषयक कार्याची दखल घेऊन दरवर्षी १ जुलै हा त्यांचा जन्मदिन महाराष्ट्रात कृषिदिन म्हणून साजरा केला जातो.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.