
Solapur News : जलजीवन मिशन योजनेची कामे प्रलंबित का राहत आहेत, तुम्ही नक्की काम करता की नाही, यापुढे आता तोंडी सांगण्यापेक्षा थेट कागदावर घेत कारवाई करण्याची गरज आहे, अशा शब्दांत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सोमवारी (ता. ८) अधिकारी-कर्मचाऱ्यांना चांगलेच सुनावले.
तसेच पंढरपूर, माढा, करमाळ्याच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांना सातत्याने सांगूनही सुधारणा होत नसल्याने कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेशही देऊन टाकले.
जलजीवन मिशन योजनेच्या कामाची आढावा बैठक जिल्हा परिषदेमध्ये आयोजिण्यात आली होती. त्यात स्वामी यांनी पहिल्यांदाच अशी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसले. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या जलजीवन मिशन योजनेचे कामकाज अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय आहे.
जिल्ह्यामध्ये ८५५ कामांच्या वर्क ऑर्डर दिल्या गेल्या आहेत. निविदाप्रक्रियेमध्ये गोंधळ झाल्याने अनेक तक्रारी समोर आल्या. जिल्ह्यातील काही आमदारांनी जिल्हा नियोजन समितीमध्येही त्यासंबंधी आवाज उठवला.
त्यानंतर आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी अॅक्शन मोडवर आल्याचे चित्र होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादिन शेळकंदे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड यांच्यासह सर्व तालुक्यातील उपअभियंता, कनिष्ठ अभियंता आणि कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते.
सुरुवातीला श्री. कटकधोंड यांनी सर्व तालुकानिहाय सविस्तर असा आढावा घेतला. प्रलंबित असलेल्या कामाबाबत त्यांनीही नाराजी व्यक्त करत कर्मचाऱ्यांची कानउघडणी केली. त्यानंतर कामाची आकडेवारी पाहता मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी उपस्थित सर्व अभियंत्यांना त्यांच्यावर दिलेल्या जबाबदारींची आणि त्याच्या सध्याच्या स्थितीची माहिती घेतली.
पण त्या वेळी नेमकी माहिती येत नसल्याने आणि थातूरमातूर उत्तरे येत राहिल्याने स्वामी चांगलेच आक्रमक झाले. तेव्हा तुम्ही लोक नेमके किती तास काम करता, एवढे काम पेंडिंग का, शाळा अंगणवाड्याला नळजोडण्या वेळेत का होऊ शकत नाहीत.
इतकी मोठी यंत्रणा करते तरी काय, नुसता टाइमपास चालला आहे, कुठेतरी एका कामाला भेट द्यायची आणि दिवसभर पंचायत समितीमध्ये येऊन बसायचे. आता सर्व गटविकास अधिकाऱ्यांनाही नोटिसा काढा. त्यांनी किती जलजीवन मिशनच्या कामांना भेटी दिल्या, किती कामे पूर्ण आहेत, तपासण्या केल्या का, याची माहिती घ्या, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
तसेच सर्वाधिक प्रलंबित कामे असणाऱ्या पंढरपूर, माढा, करमाळ्यातील पाणीपुरवठा विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही नोटिसा बजावण्याचे आदेश त्यांनी दिले.
‘...तर वेतनवाढ रोखू’
जलजीवन मिशनच्या कामात मागे असलेल्या तालुक्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन रोखले जाईल. काम केले तरच मानधन दिले जाईल. तसेच जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखली जाईल. त्याशिवाय तुम्हाला कामाचे गांभीर्य समजणार नाही, अशा शब्दांत स्वामी यांनी थेट कारवाईचे संकेतही दिले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.