
यंदा फेब्रुवारी, मार्च महिन्यात वातावरणात बऱ्याच ठिकाणी बदल झाला. काही ठिकाणी वादळी वारे, पाऊस तर काही ठिकाणी गारपिटीमुळे हापूस (Alphanso Mango) आणि केशर आंबा (Keshar Mango) बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
ढगाळ वातावरणामुळे फेब्रुवारीच्या शेवटच्या आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात पारा ४० अंशावर गेल्यामुळे फळगळीचे संकट होते. सकाळी, सायंकाळी ढगाळ वातावरण असल्याचा परिणाम घनदाट आणि मोठी झाडे असलेल्या बागांना बसला.
मोहोरातून फळधारणा होण्यावेळीच तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मोहर कुजणे, काळा पडणे अशा समस्या निर्माण झाल्या.त्याचा परणाम फळधारणेवर झाला.
त्यामुळे यंदा हापूस आंब्याच उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झालीय. गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर दरवर्षी ४० ते ५० पेट्या होणारी आंब्याची आवक ८ ते १० पेट्यांवर आली.
पहिल्या ग्रेडच्या हापूस आंब्याला प्रति पेटी ७०० ते १४०० रुपये भाव मिळाला तर दुसऱ्या ग्रेडच्या हापूस आंब्याला ४०० ते ५०० रुपये भाव मिळाला. पुढील दोन दिवस हवामान विभागाने विदर्भ आणि कोकण भागामध्ये गारपिटीचा इशारा दिलेला आहे.
त्यामुळे हापूस आणि केशर आंबा बागेतील नुकसान टाळण्यासाठी बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी दिलेली माहिती पाहुया.
आंबा हे पीक नैसर्गीक धोक्यांना फार लवकर बळी पडणारे फळ आहे. हापूस आंबे सध्या वाढीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. त्यामुळे काढणीस तयार असलेल्या फळांची काढणी करावी. काढणीसाठी नुतन झेल्याचा वापर करावा.
काढणी सकाळी १० पर्यंत किंवा संध्याकाळी करावी. कारण जास्त तापमानात काढणी केल्यास फळातील सक्याचं प्रमाण वाढतं. काढणीनंतर फळे कार्बेन्डाझिम ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात बुडवून सावलीत वाळवावेत.
त्यामुळे वाहतूकीदरम्यान फळे खराब होणार नाहीत किंवा फळांवर काळ्या बुरशीची वाढ होणार नाही. फळांची वाहतूक कोरुगेटेड बॉक्समधून करावी.
केसर आंबा मार्केटमध्ये येण्यासाठी अजून वेळ आहे. केसर आंबा बागेत फळमाशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रक्षक सापळे लावावेत.
अपक्व फळांची गळ झाली असल्यास त्यांची कैरी म्हणून विक्री करावी. आंबा बागेमध्ये तुडतुडे ही अतिशय नुकसानकारक कीड आहे.
ढगाळ वातावरण तसेच कमाल तापमानात वाढ झाल्यास आंब्यावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव होतो. तुडतुडे पानांवर, तसेच खोडाच्या भेगांमध्ये सुप्तावस्थेत असतात.
पिले व प्रौढ कोवळ्या पालवीमधून, मोहोरामधून तसेच फळांमधून रस शोषून घेतात. परिणामी मोहोर व लहान फळांची गळ होते. पिले तसेच मोठे तुडतुडे शरीरावाटे मधासारखा चिकटपदार्थबाहेर टाकतात.
हा चिकट पदार्थ आंब्याच्या पानावर तसेच झाडाखालील जमिनीवर पडतो. त्यावर काळ्या रंगाच्या कॅप्नोडीयम बुरशीची वाढ होते. पाने काळी पडतात, त्यामुळे झाडाच्या अन्न बनविण्याच्या क्रियेत अडथळा येऊन त्याचा झाडाच्या वाढीवर तसेच फळधारणेवर अनिष्ट परिणाम होतो.
इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के प्रवाही) ०.३ मि.लि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. बागेमध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी १ टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.
पावसानंतर बागेतील भुरी आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विद्राव्य गंधक २ ग्रॅम किंवा डीनोकॅप १ ग्रॅम अधिक कॉपरऑक्सिक्लोराईड २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.