
राज्याच बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे तर काही ठिकाणी तापमान वाढीमुळे पिकाची पाण्याची गरज वाढली आहे. अशा परिस्थितीत फळपिके, भाजीपाला आणि उन्हाळी पिकातील व्यवस्थानाविषयी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सुचविलेल्या उपाययोजनांचा अवलंब करावा.
रब्बी पिकाची (Rabbi Crop) काढणी झालेल्या शेतात त्वरित खोल नांगरणी करावी. त्यामुळे जमीन तापण्यास मदत होवून किडींचे कोष व बुरशीचा नायनाट होईल. शेतातील काडीकचरा जाळून न टाकता त्याचा सेंद्रिय खत बनविण्यासाठी वापर करावा.
कमाल व किमान तापमानात वाढ झाली असल्यामुळे बाष्पीभवनाचा वाढता वेग पाहून आवश्यकतेनूसार ६ ते ७ दिवसांनी उन्हाळीपिके, भाजीपाला व फळपिकांना ओलिताची सोय करावी.
उन्हाळी भुईमूग, उन्हाळी मूग शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. अशावेळी वाढत्या बाष्पीभवनाच्या वेगाचा पिकावर ताण पडू नये यासाठी आवश्यकतेनूसार ६ ते ७ दिवसांनी ओलिताची व्यवस्था करावी. शक्यतो पाणी सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे.
भुईमुगावरिल टिक्का रोगाच्या नियंत्रणासाठी क्लोरोथॅलोनिल (७५ टक्के डब्लूपी) २० ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल (२५ टक्के प्रवाही इसी) १० मिली किंवा टेब्युकोनॅझोल (२५.९ टक्के ईसी) १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तिव्रतेनूसार पुन्हा १५ दिवसांनी फवारणी करावी.
सध्या उन्हाळी तीळ शेंगा भरण्याच्या अवस्थेत आणि सुर्यफूल दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. अशा वेळी पिकावर पाण्याचा ताण पडू नये यासाठी गरजेनूसार ६ ते ७ दिवसांनी ओलिताची सोय करावी.
सुर्यफुलावर जर तुडतुडे, फुलकीडे, पांढरी माशी यासारख्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झाला असेल तर नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के इसी) २ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
गवार, चवळी, काकडी, दुधी, दोडका, कारली, पालक, मेथी, कोथिंबीर सारख्या भाजीपाल्याची लागवड करावी. उन्हाळी मिरची, वांगे, टोमॅटो च्या ४ ते ६ आठवडे वयाच्या रोपांची लागवड करावी.
तयार आंबा फळांची लगेच तोडणी करुन सुरक्षित ठिकाणी साठणूक करावी किंवा बाजारात विक्री करावी,
टरबुजामध्ये उष्ण हवामानात फळांमध्ये पाण्याचा दाब वाढू शकतो. ज्यामुळे फळे फुटतात. फळांची फुट कमी करण्यासाठी जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी झाडाभोवती काडीकचऱ्याचे आच्छादन करावे.
आंबिया बहारातील संत्रा, मोसंबी, लिंबू झाडावरील चांगल्या फळधारणेसाठी जिथे शक्य आहे तिथे ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावे.
पाण्याची कमतरता असणाऱ्या फळ बागांमध्ये तसेच पाण्याच्या बचतीसाठी उन्हाळी हंगामात सेंद्रिय पदार्थ जसे की, गवत, पालापाचोळा, कुटार, गव्हांडा, तणस यांचा १० सेंमी जाडीचा थर देऊन आच्छादन करावे. किंवा काळ्या रंगाच्या पॉलिथीन पेपरने (१०० मायक्रॉन) आच्छादन केल्यास झाडाजवळ ओलावा टिकून राहण्यास मदत होते.
नविन नाजूक कलमाच्याभोवती कापणी केलेल्या तुऱ्हाट्या, पऱ्हाट्या किवा वाळलेले गवत किंवा हिरव्या शेडनेटचे आच्छादन केल्यास तिव्र उष्ण किरणांपासून बचाव करता येतो.
सीताफळ फळ पिकात सद्य स्थितीत पानझड व सुप्त अवस्थेत गेले आहेत. येणाऱ्या हंगामाकरिता बागेत कुठलिही मशागतीची कामे करु नयेत.
आळ्याची फुलधारणा होऊन फळे गर्भावस्थेत असल्यामुळे बागेमध्ये कोणत्याही प्रकारची मशागत करु नये अन्यथा फळगळ होऊ शकते.
पेरु पिकात मृग बहार घेण्याकरिता बाग मे महिन्यात ताणावर सोडावी. मे महिन्यात छाटणी करावी व ताण सोडताना योग्य पाणी व खत व्यवस्थापन करावे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.