
आंबा
-वाढीची अवस्था
१) खताची मात्रा दिलेल्या हापूस आंबा बागेमध्ये पॅक्लोब्युट्राझोलची आळवणी करावी. हापूस आंब्यामध्ये वर्षाआड फळे धरण्याचा गुणधर्म १० वर्षांनंतर प्रकर्षाने दिसून येतो. यासाठी पूर्ण वाढलेल्या (१० वर्षांवरील) हापूस आंब्याला दरवर्षी नियमित फळे धरण्यासाठी हे वाढ नियंत्रक उपयोगी ठरते.
-हे वाढनियंत्रक देण्यापूर्वी झाडाभोवती असलेले तण काढून टाकावे. तणनाशक वापरावयाचे असल्यास ग्लायफोसेट तणनाशक ५ मि.लि. अधिक युरिया १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे गवताच्या पानांवर फवारणी करावी. या काळात पावसाची किमान ५ ते ६ तास उघडीप मिळाली पाहिजे. (टीप : ग्लायफोसेट अनिवडक गटातील तणनाशक असल्याने झाडावर पडणार नाही याची दक्षता घ्यावी. तणनाशक फवारणी केलेल्या बागेमध्ये जनावरे चारण्यास सोडू नयेत.)
- झाडाच्या विस्ताराचा पूर्व-पश्चिम व दक्षिण-उत्तर व्यास मोजून त्याची सरासरी काढावी. विस्ताराच्या प्रति मीटर व्यासासाठी ३ मि.लि. या प्रमाणात पॅक्लोब्युट्राझोलची मात्रा पावसाची तीव्रता कमी असताना द्यावी.
-पॅक्लोब्युट्राझोलची आवश्यक मात्रा ३ ते ५ लिटर पाण्यात मिसळून झाडाच्या बुंध्याभोवती विस्ताराच्या निम्म्या अंतरावर १० ते १२ सें.मी. खोल असे सम अंतरावर २५ ते ३० खड्डे करावेत. त्यात द्रावण समप्रमाणात ओतावे, नंतर खड्डे मातीने बुजवून टाकावे.
२) ढगाळ व दमट वातावरणामुळे, आंब्याच्या नवीन येणाऱ्या पालवीवर शेंडे पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. त्यासाठी पालवीचे निरीक्षण करावे. नवीन लागवडीमध्ये प्रादुर्भाव दिसून येत असल्यास कीडग्रस्त शेंडे, काड्या काढून अळीसह नष्ट कराव्यात. पावसाची किमान ५ ते ६ तास उघडीप मिळेल असे पाहून शेंडा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.लि. किंवा क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २.५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
फवारणी द्रावणामध्ये स्टिकर (चिकटणारा पदार्थ) आणि स्प्रेडर मिसळावे.
भाजीपाला पिके
-वाढीची अवस्था
-वांगी, मिरची, टोमेटो पिकावर तुडतुडे, पांढरी माशी व मावा रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो. प्रादुर्भाव दिसून येत असल्यास नियंत्रणासाठी, डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १.५ मि.लि. किंवा इमिडाक्लोप्रिड (१७.८ टक्के प्रवाही) ०.३ मि.लि. किंवा थायोमेथॉक्झाम (२५ टक्के डब्ल्यूजी) ०.२ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
वेलवर्गीय पिके
-वाढीची ते फुलोरा अवस्था
-लागवडीनंतर एक महिन्यांनी नत्र खताची दुसरी मात्रा प्रति वेल युरिया १० ग्रॅम पावसाची तीव्रता कमी असताना द्यावी. नत्राची मात्रा देतेवेळी गवत काढून बुंध्याजवळची माती भुसभुशीत करून पिकांना मातीची भर द्यावी.
-वेलवर्गीय भाजीपाला फळांवर फळमाशीचा प्रादूर्भाव दिसून येतो. फळमाशीच्या नियंत्रणासाठी पिकामध्ये ‘क्यू ल्युअर’ रक्षक सापळे प्रति एकरी २ या प्रमाणे मंडपात जमिनीपासून १ ते २ फूट उंचीवर राहील अशा प्रकारे लावावेत. सापळ्यात ठेवलेले आमिष ६ ते ७ आठवडे चांगल्या प्रकारे चालते.
संपर्क ः ०२३५८- २८२३८७/ ८१४९४६७४०१
(ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.