
डॉ. स. द. रामटेके, आप्पासो गवळी, अमृता लंगोटे
द्राक्ष बागांमध्ये (Vineyard) अनेक प्रकारच्या विकृती दिसून येत आहेत. त्यामध्ये उकड्या ही एक महत्त्वाची विकृती (Grape Disease) आहे. या वर्षी सर्वच द्राक्ष विभागामध्ये चांगला पाऊस झाला असून, या विकृतीस पोषक असे वातावरण आहे. या वर्षी काही बागामध्ये उकड्या विकृती दिसून आली आहे. अन्य भागांमध्येही ती वाढण्याची जास्त शक्यता आहे.
अशा स्थितीमध्ये उकड्या विकृतीविषयी जाणून वेळीच योग्य त्या उपाययोजना केल्यास विकृतीला काही प्रमाणात रोखणे शक्य होते. रात्रीच्या कमी तापमानामुळे सकाळच्या वेळी जास्त दव पानांवर व मण्यांवर पडत असते. बागेत जास्त आर्द्रता असल्यास द्राक्ष वेली अधिक काळ ओल्या राहतात.
विशेषतः पाने व मणी दुपारपर्यंत ओले राहतात. त्यातच दुपारच्या जास्त तापमानाचा घडांला चटका बसतो. घडातील मणी उकडल्यासारखे दिसतात. यालाच ‘उकड्या’ विकृती असे म्हणतात.
कोणत्या बागांमध्ये उकड्या विकृती दिसून येते?
ही विकृती मण्यांवर ७० ते ८० दिवसांपर्यंत आढळून येते. म्हणजेच मण्यांत पाणी उतरण्याच्या अवस्थेपर्यंत दिसून येते. म्हणूनच या विकृतीपासून बागेचे संरक्षण करण्यासाठी पाण्याचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करावे.
उकड्या या विकृतीची लक्षणे
या विकृतीमध्ये द्राक्षमणी उकडल्यासारखे दिसतात.
मण्यांचा देठ लवकर वाळून जातो.
हात लावल्यानंतर किंवा स्पर्श केल्यानंतर मण्यांची गळ होताना दिसते.
उकड्या विकृती वाढविण्यास कारणीतून मुख्य तीन घटकरात्रीचे तापामन १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहणे.
द्राक्ष बागेमध्ये जास्त सापेक्ष आर्द्रता असणे. ती अधिक काळ (म्हणजेच सकाळपासून दुपारपर्यंत) टिकून राहणे.
दिवसाचे तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असणे.
उकड्या विकृती येण्यास कारणीभूत अन्य घटक
उच्च सापेक्ष आर्द्रता ः ही बागेतील दाट कॅनॉपीमुळे अधिक काळ राहते.
प्रवाही पद्धतीने पाणी देणे (फ्लड इरिगेशन) ः साधारणतः ७० ते ८० दिवसांच्या दरम्यान पाटाने पाणी दिल्यास आर्द्रता वाढते.
जास्त जाडीचे आच्छादन उघडे राहिल्यामुळे बागेमध्ये अधिक काळ आर्द्रता टिकून राहते. हे टाळण्यासाठी आच्छादन कमी जाडीचे ठेवून त्यावर माती टाकणे गरजेचे असते.
ठिबक सिंचनाची लॅटरल्स दोन फुटांपेक्षा अधिक उंचीवर ठेवल्यास आर्द्रता अधिक राहते.
उपाययोजना
अ) उपाययोजनांमध्ये प्रामुख्याने सापेक्ष आर्द्रता कमी करण्यावर भर द्यावा. त्यासाठी
७० ते ८० दिवसांच्या दरम्यान पाटाने पाणी देऊ नये.
ठिबकने पाणी देतानाही बरेच द्राक्ष बागायतदार तीन- चार दिवसांतून एकदा व अधिक प्रमाणात पाणी देतात. त्यामुळे आर्द्रता वाढण्यास मदत होते. असे न करता दररोज दोन वेळा ठिबकच्या साह्याने वीस मिनिटांसाठी पाणी द्यावे. अधिक उंचीवरील ड्रीप लाइन कमी उंचीवर ठेवावी.
कॅनॉपी दाट असणार नाही, याची काळजी घ्यावी. हवा खेळती राहिली पाहिजे.
जास्त जाडीचे आच्छादन करून उघडे ठेवले जाते. त्या ऐवजी कमी जाडीचे आच्छादन करून त्यावर माती घालावी.
ब) मण्यांच्या वाढीच्या अवस्थेमध्ये कोणताही ताण वेलींवर येणार नाही याची दक्षता घ्यावी.
क) अन्नद्रव्यांच्या मात्रा वेळेत व शिफारशीप्रमाणे द्याव्यात.
ड) संजीवकांचा वापर शिफारशीप्रमाणे अधिक प्रमाणात व एकाच वेळी करू नये.
इ) बुरशीनाशकांचा शिफारशीप्रमाणे वापर करावा.
- डॉ. स. द. रामटेके, ९४२२३१३१६६, (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.