
फळबागांच्या लागवडीमध्ये (Fruit Crop Cultivation ) जागेची निवड ही अतिशय महत्वाची बाब आहे. फळबाग लागवड दीर्घ मुदतीची, जास्त गुंतवणुकीची असल्यामुळे सुरुवातीला झालेली चूक नंतर भरुन काढता येत नाही. कारण फळझाडांची लागवड ही कायम स्वरुपाची असते.
त्यामुळे जागेची निवड करताना जर चूक झाली तर कालांतराने ती दुरुस्त करणे कठीण होते. म्हणून जमीन आणि हवामानाबरोबरच जागेच्या निवडीबाबतीत विचार करणे गरजेचे आहे.
फळबाग लागवडीच्या नियोजनात जमिनीची निवड, मातीची तपासणी, फळपिकाची निवड, लागवडीचा आराखडा, जातिवंत कलमे, रोपांची निवड, पाण्याची उपलब्धता, बाजारपेठ या सर्व बाबी लक्षात घेऊन नियोजन करणे गरजेचे आहे.
फळबागेकरिता जमीन निवडताना फक्त जमिनीचा पृष्ठभाग पाहून चालत नाही, तर त्याखालील मातीचे काळजीपूर्वक परीक्षण करणे महत्वाचे आहे. त्याकरिता लागवड करण्यापुर्वी ४ -५ ठिकणी १ ते १.५ मीटर खोल खड्डे खोदून मातीचे परिक्षण करावे.
फळझाडांच्या दृष्टीने सर्वसाधारण फळझाडांना कमीत कमी १ मीटर खोलीपर्यंत मुरमाच्या वर येणे उपयोगाचे नसते. फळझाडांकरिता गाळाच्या उत्तम निचऱ्याच्या जमिनी योग्य ठरतात.
फळबागेकरिता उत्तम निचऱ्याची ६.५ ते ७.५ च्या दरम्यान सामू असणारी जमीन निवडावी. जमिनीच्या खोलीनुसार फळपिकांची निवड करावी.
३० ते ४५ सेंमी खोली असणाऱ्या जमिनीत बोर, सीताफळ, काजू या फळझाडांची लागवड करावी. ७.५ सेंमी पेक्षा कमी खोलीच्या जमिनीत कोणतीही फळझाडे लावू नयेत.
४५ ते ९० सेंमी मध्यम खोल जमिनीत पेरु, डाळिंब, अंजीर, पपई ही फळझाडे लावावीत.
आंबा, चिकू, चिंच, जांभूळ, लिंबूवर्गीय फळझाडांना एक मीटरपेक्षा जास्त खोलीच्या जमिनी लागतात. जमीन शक्यतो सपाट असावी.
जमिनीचा उतार २ किंवा ३ टक्क्यांपेक्षा अधिक नसावा. ज्या जमिनीचा उतार १५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्या ठिकाणी टप्पे करुन ठिबक सिंचन पद्धत वापरुन लागवड करावी.
जमिनीचा उतार दक्षिण - पश्चिम दिशेला असल्यास फळझाडांसाठी चांगले असते. कारण अशा ठिकाणी हवा उष्ण व कोरडी राहते.
जमीन निवडल्यानंतर जमिनीची मशागत करुन घ्यावी. मातीचा प्रातिनिधिक नमुना घेऊन तपासणी करावी. त्यानुसार खतांचे नियोजन करावे.
पूर्वमशागतीची कामे झाल्यानंतर एप्रिल - मे मध्ये फळझाडांच्या लागवड अंतराच्या शिफारशीनुसार योग्य लांबी, रुंदीचे खड्डे घेऊन हे खड्डे पोयटा माती, पालापाचोळा, शेणखत, जैविक खते, ट्रायकोडर्मा, सिंगल सुपर फॉस्फेट, शिफारशीत कीडनाशक पावडर यांच्या मिश्रणाने भरुन घ्यावेत.
ज्या जमिनीतून पाण्याचा उत्तम निचरा होत नाही, अशा जागेत कोणतेच फळझाड येत नाही. सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांच्या माहितीसाठी आपण जमिनीस भारी, मध्यम व हलकी असे म्हणतो. त्यानुसार फळझाडांची निवड करावी.
हलक्या जमिनीत पेरु, डाळिंब, कागदी लिंबू, द्राक्ष, पपई, सीताफळ, बोर, आवळा, कवठ, करवंद, चिंच, जांभूळ तर मध्यम जमिनीत आंबा, संत्रा, मोसंबी, संत्रा, मोसंबी, चिकू ाणि भारी उत्तम निचऱ्याच्या जमिनीत केळी हे पीक चांगले येऊ शकतात.
जमिनीतील चुनखडीचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त असेल, तेथे आंबा, पेरु, चिकू, संत्रा, मोसंबी, लिंबू, तत्सम फळांची लागवड करणे टाळावे.
स्त्रोत - महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.