
डॉ.आशिष माइती, डॉ.दिबाकर घोष, युवराज शिंदे
डाळिंब पिकाची प्रामुख्याने लागवड (Pomegranate Cultivation) असणाऱ्या मुरमाड आणि उथळ जमिनीच्या वैशिष्ट्यपूर्ण खनिज रचनेमुळे मुख्य पोषण तत्त्वाची फॉस्फरस आणि पोटॅशियम यांची कमतरता आढळून येते. सामान्यतः जमिनीतील अन्नद्रव्यांची (Nutrients) उणीव भरून काढण्यासाठी आणि पीक उत्पादनास पोषक जमिनी तयार करण्यासाठी काही रासायनिक स्वरूपातील फॉस्फेटयुक्त आणि पोटॅशयुक्त खते (Fertilizer) वापरली जातात.
ज्या वेळी जमिनीत विद्राव्य फॉस्फेटयुक्त खत वापरले जाते तेव्हा ते सहजपणे न विरघळणाऱ्या कॅल्शिअम, अॅल्युमिनियम आणि लोह यांच्या अवशेषांमध्ये रूपांतरित होते. त्याचप्रमाणे पोटॅशयुक्त खतांच्या बाबतीतही असेच आहे. चिकणमातीयुक्त (२:१) जमिनीमध्ये या खतांचा वापर केल्यास ती न विरघळणाऱ्या स्वरूपात जमिनीमध्ये स्थिर होतात.
परिणामी, अपेक्षित पीक उत्पादन मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विद्राव्य फॉस्फेटयुक्त आणि पोटॅशयुक्त खतांचा वापर केला जातो. डाळिंब बागेतील फॉस्फेटयुक्त आणि पोटॅशयुक्त खतांचा अति प्रमाणातील वापरामुळे त्यातील मूलद्रव्ये (फॉस्फरस आणि पोटॅशियम) यांचे जमिनीमध्ये स्थिरीकरण मोठ्या होते. त्यांना अनुपलब्ध स्वरूप प्राप्त होते.
बायो मिनरल खतांचे महत्त्व
खनिजे आणि उपयुक्त सूक्ष्म जीवाणू या दोन्हींचा समावेश असलेल्या खताच्या सुधारित प्रकाराला बायो मिनरल खत म्हणतात. सद्यस्थितीमध्ये फॉस्फेट आणि पोटॅश यांचे विघटन करणाऱ्या सूक्ष्म जीवाणूचा रॉक फॉस्फेट सोबत केलेला वापर हा शिफारसीत खतांच्या वापराने मिळणाऱ्या उत्पादनाच्या तुलनेमध्ये अधिक दिसून येतो. असे असून देखील डाळिंब उत्पादकांकडून या तंत्रज्ञानाला फारशी लोकप्रियता मिळाली नाही.
याचे मुख्य कारण म्हणजे फॉस्फेट आणि पोटाशयुक्त खनिज सामग्रीची उपलब्धता तसेच त्यासाठी आवश्यक सूक्ष्मजीव शोधणे आणि त्यांना एकत्रित करून त्यांचा वापर सुलभ करणारे तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते. याच कारणामुळे सामान्यपणे विघटनशील नसणाऱ्या फॉस्फरस आणि पोटॅश या पोषण तत्त्वांचे विघटन करणारे सूक्ष्मजीव शोधण्याच्या संकल्पनेने या फॉस्फेट आणि पोटॅशियम पूरक बायो-मिनरल खत निर्मितीस चालना मिळाली.
सजीव जेव्हा स्वतःच्या विकासासाठी ऊर्जा निर्माण करून खर्च करतात त्यावेळी त्यामधील सूक्ष्म जैविक हालचाली वेगाने कार्यरत असतात. हाच प्रत्येक सजीवाच्या जगण्याचा केंद्रबिंदू आहे. वनस्पतीमध्ये प्रजनन कालावधी समाप्त झाल्यानंतर आवश्यक पोषक द्रव्ये मिळविण्यासाठी जास्त ऊर्जा खर्च करण्याची त्यांना आवश्यकता भासत नाही.
त्यामुळे अशा वेळी त्या वनस्पतीच्या मुळांचा विकास होत नाही किंवा त्यामधून स्रवणारे आवश्यक पोषक घटक तयार होत नाही. याचा परिणाम म्हणजे त्यांची अन्नद्रव्याची देवाणघेवाण क्षमता तसेच त्यांचे वनस्पतीद्वारे होणारे शोषण आणि फायटोकेमिकल अभिक्रिया यामध्ये कमालीची घट होते. त्याचा परिणाम वनस्पतींचे आरोग्य आणि रोग प्रतिकारशक्ती यावर होतो.
आग्नेय ऑस्ट्रेलियातील सेंद्रिय पद्धत आणि पारंपारिक पद्धतींतर्गत उत्पादित गव्हाच्या तुलनेत असे आढळून आले की, पारंपारिक उत्पादन पद्धतीमध्ये पीक उत्पादनवाढीसाठी केवळ फॉस्फेटयुक्त खतांचा वापर वाढला नाही तर झिंक या अन्नद्रव्याचे शोषण देखील कमी झाले. याउलट पीक उत्पादन पद्धतीमध्ये बायो मिनरल खताचा वापर केल्याने ही पोषक द्रव्ये पिकाच्या वाढीस उपलब्ध झाली तसेच त्यांचे शोषण वाढविण्याच्यादृष्टीने आवश्यक सूक्ष्म-जैविक प्रक्रिया वाढीस फायदेशीर ठरली.
ज्यावेळी फॉस्फेट आणि पोटॅश विघटन करणारे सूक्ष्मजीव जमिनीमध्ये सोडले जातात त्यावेळी त्या अन्नद्रव्यांचे झाडांमधील शोषणसुद्धा वाढीस लागलेले दिसून येते. हे सूक्ष्मजीव झाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी दृष्टीने चयापचय प्रक्रियेद्वारे हानिकारक बुरशीची वाढ रोखण्यासाठी फायटोकेमिकल्स तयार करण्यासाठी वनस्पतींना उत्तेजित करतात.
बायोमिनरलमुळे जमीन, परिसंस्थेच्या कार्यामध्ये घडणारे महत्त्वपूर्ण बदल
मातीमध्ये असणारा सेंद्रिय कर्ब हा सेंद्रिय कार्बन, नायट्रोजन (९० ते ९५ टक्के जमिनीतील नत्र), फॉस्फरस (४० टक्के जमिनीतील फॉस्फरस ) आणि सल्फर (जमिनीतील सल्फर ९० टक्के) यांच्यापासून बनलेला असतो.
कालानुरूप जमिनीमध्ये विविध अंतर्गत क्रियाद्वारे जसे की, वनस्पतींमार्फत होणारे शोषण आणि त्यांचे जमा होणारे अवशेष, त्यांचे सूक्ष्मजीवांकडून होणारे विघटन आणि जमिनीतील सेंद्रिय कर्ब तयार करणे याद्वारे जमिनीत पोषक तत्त्वे पुर्नर्निमित केली जात असल्याने, अशा जमिनीमध्ये अतिरिक्त नत्रयुक्त आणि फॉस्फरसयुक्त खतांची गरज कमी होते. तसेच रॉक फॉस्फेट पावडरद्वारे (पोटॅशियम फेल्डस्पार, मायकास इ.) पोटॅशियमचा पुरवठा होऊन त्याची उपलब्धता सूक्ष्मजीवाणूच्या क्रियाकलापांद्वारे होते. परिणामी रासायनिक खतांवरील अवलंबत्व कमी होते.
मातीतील कार्बनचे प्रमाण वाढल्याने मातीची कटायन वहन क्षमता सुधारते, जमिनीची पोषक द्रव्ये साठवण्याची क्षमता वाढीस लागते.
जमिनीतील सेंद्रिय पदार्थाच्या प्रत्येक एक ग्रॅम सोबतच तिची वनस्पतींना पाणी उपलब्ध करून देण्याची क्षमता देखील १ ते १० ग्रॅम ने वाढते. पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही सेंद्रिय पदार्थाचे भौतिक गुणधर्म आणि संरचना या दोन्हीमुळे असते. जमिनीतील सेंद्रिय कार्बन मातीची भौतिक संरचना आणि पोत सुधारण्याबरोबर मातीचा हवेशीरपणा आणि मुळांच्या वाढीस पोषक वातावरण तसेच मातीचा चिकटपणा कमी करतात. जमिनीची धूप कमी करण्यास मदत करतात. काही उपयुक्त बुरशी या वनस्पतीची दुष्काळाशी प्रतिकार करण्याची क्षमता वाढवतात.
खनिजांचा योग्य वापर महत्वाचा
दीर्घकालीन जैव-भूवैज्ञानिक उत्क्रांतीमध्ये तसेच भूपृष्ठावरील असंख्य भू-रासायनिक प्रक्रियांमध्ये सूक्ष्मजीव महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. वातावरणाचा खडकावर होणारा परिणाम, त्यापासून होणारी मातीची निर्मिती आणि तिची उत्क्रांती प्रक्रिया यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मातीच्या गुणवत्तेवर तसेच त्यावरील वनस्पती आणि जैव घटकांच्या निर्मितीवर मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे भूपृष्ठावरील वनस्पतींची वाढ ही त्या मातीतील सूक्ष्मजीव आणि खनिजे यांच्या प्रक्रियेद्वारे निर्माण होणाऱ्या पोषक घटकांवर अवलंबून असते.
अनेक खनिजांचे विघटन हे सूक्ष्मजीवांच्या नैसर्गिक चयापचय क्रियांमुळे होऊन, ती परिसंस्थेमधील अस्तिवात असणाऱ्या अजैविक घटकांसह एकत्रितपणे वनस्पतींच्या वाढीस पोषक ठरतात. अशाप्रकारे, निसर्गतः उपलब्ध असणाऱ्या खनिजांची विघटन प्रक्रिया काही रासायनिक घटकांद्वारे (रॉक फॉस्फेट, फेल्डस्पार इ.) वाढविल्याने त्यांचा मातीच्या आरोग्यावर अत्यंत सकारात्मक प्रभाव पडत असतो. परिणामी तिची सुपीकता वाढविण्याबरोबरच कोणत्याही नुकसानी शिवाय पर्यावरण संरक्षणाचे उद्दिष्ट प्राप्त केले जाऊ शकते. रॉक फॉस्फेट पावडर युक्त खते ही सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी पोषक वातावरणाची निर्मिती करतात. यामुळे उपलब्ध खनिजांच्या संरचनेमध्ये आणि आकारामानामध्ये बदल होतो.
विविध प्रकारची खनिजे ही वेगवेगळ्या प्रकारच्या सूक्ष्मजीवांच्या समुदायाच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार करतात. त्यातील पोषक घटक असणारी ही खनिजे अशा सूक्ष्मजीवांच्या क्रियेला मदत करतात.
खनिजयुक्त रॉक फॉस्फेट पावडरचे वेगवेगळ्या स्वरूपातील मिश्रण मातीमध्ये मिसळल्याने त्याचा जमिनीतील सूक्ष्म जीवाणूंच्या वाढीवर मोठा प्रभाव पडत असतो. त्यामुळे खनिजांची पोषण क्षमता दुपटीने वाढीस लागल्याचे सिद्ध झाले आहे. या पद्धतीने वनस्पतीसाठी आवश्यक पोषक घटकांच्या उपलब्धतेबरोबरच जमिनीत उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार होते. त्यामुळे उत्पादनवाढीबरोबरच वनस्पतीमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढीस लागते.
- युवराज शिंदे, ९४०५८७६५११
(डॉ.आशिष माइती, डॉ.दिबाकर घोष हे भारतीय पाणी व्यवस्थापन संस्था,भुवनेश्वर,ओदिशा आणि युवराज शिंदे राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर येथे कार्यरत आहेत.)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.