
शेतकरी - अतुल मधुकर पाटील
गाव - केऱ्हाळे बुद्रूक, ता.रावेर, जि.जळगाव
एकूण क्षेत्र - ५० एकर
केळीखालील क्षेत्र - २१ एकर
माझी केऱ्हाळे बुद्रूक, पिंप्री, मंगरूळ (ता.रावेर, जि. जळगाव) येथे भोकर व अभोळा नदीच्या लाभक्षेत्रात ५० एकर जमीन आहे. दोन विहिरी, पाच कूपनलिका आहेत. केळी प्रमुख पीक आहे. त्यात नवती केळी (Banana Orchard) आहे. गेल्या जूनमध्ये साडेआठ हजार केळी रोपे आणि जुलैमध्ये नऊ हजार केळी रोपांची लागवड (Banana Cultivation) केली आहे.
ऑगस्टमध्येही १५ हजार रोप लागवड केलेली आहे. लागवडीसाठी उतिसंवर्धित रोपांचा उपयोग केला आहे. बेवडासाठी तूर, हळद (Turmeric) ही पिकेही घेतो. पीक फेरपालटीवर भर आहे. जमीन मध्यम, पाण्याचा निचरा करणारी आहे. या दृष्टीनेच सर्व बाबींचे नियोजन केले आहे. निर्यातक्षम केळी उत्पादनावर माझा भर आहे.
लागवड सहा बाय पाच फूट आणि साडेपाच फूट व पाच फूट अंतरात गादी वाफा पद्धतीने केली आहे. जळगाव केळी संशोधन केंद्रातील प्रभारी प्रमुख डॉ.गणेश देशमुख यांचे मार्गदर्शन मला मिळाले आहे. माती परिक्षण अहवाल आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनुसार खत आणि पाण्याचे नियोजन मी करतो.
व्यवस्थापनातील बाबी ः
सध्या बाग सव्वा सहा महिन्यांची झाली आहे. यंदा थंडी जास्त प्रमाणात आहे. ही बाब लक्षात घेता एक हजार झाडांना १२ किलो एवढे अमोनिअम सल्फेट व १० किलो पोटॅश ड्रीपमधून दिले. थंडीमध्ये या खतांमुळे बागेच्या वाढीवर परिणाम होत नाही. आठ दिवसातून एकदा पोटॅश व अमोनिअम सल्फेट दिले. तसेच एक हजार झाडांना आठ किलो युरिया, मॅग्नेशिअम तीन किलो व त्यात सूक्ष्मअन्नद्रव्य एक लिटर प्रति एक हजार झाडांना आठ दिवसात दोनदा दिले.
डिकंपोस्टींग स्लरीतून पीएसबी व केएसबी यांचे मिश्रण आठ हजार झाडांना प्रत्येकी चार लिटर याप्रमाणे ड्रीपमधून दिले.
थंडीचा काळ असल्याने शक्य त्या वेळेस किंवा अधिकाधिक वेळेस रात्रीच्या वेळेस बागेचे सिंचन केले. मागील वेळेसही बांध स्वच्छ केले होते, बांधानजीक जे अवशेष होते, त्यांचा जाळ बागेभोवती केला. शेकोटीमुळे बागेला ऊब मिळाली.
करपा रोगाची समस्या काहीशी दिसत होती, नियंत्रणासाठी बुरशीनाशकांची फवारणी २० दिवसात एकदा घेतली. बागेत काही ठिकाणी तण दिसत होते. ही बाब लक्षात घेऊन तणनियंत्रणाचे काम करून घेतले.
अनेकदा बांधावरच्या झाडांना कमी माती लागते. झाडाभोवती मातीची चांगली भर लागते. त्यासाठी बांधावर जी झाडे आहेत, त्यांना मातीची भर घातली.
या काळात दोनदा फुटवे कापून घेतले. फुटव्यांची वाढ बागेला अडथळा ठरते. त्यासंबंधी ही कार्यवाही केली.
बागेसाठी थंडीचा काळ संवेदनशील असतो, बागेत काय समस्या येत आहेत, याचे निरीक्षण तज्ज्ञांकरवी करून घेतले. त्यांचा निष्कर्ष, मत जाणून घेऊन, व्यवस्थापनावर भर दिला. बागा स्वच्छ राखण्यावर भर दिला. कारण बागेत काही रोगग्रस्त अवशेषांमुळे रोगाच्या प्रादुर्भावाची भीती असते.
पुढील १५ दिवसातील नियोजन ः
बागेत पुढेही एकदा करपा रोगासंबंधी बुरशीनाशकांची फवारणी घ्यावी लागेल. कारण पुढील काळही थंडीचा आहे. जानेवारीत अनेकदा करपा रोग आटोक्याबाहेर जाण्याची भीती असते.
पिकाच्या गरजेनुसार आवश्यकता लक्षात घेऊन निंबोळी पेंड व सेंद्रिय घटकयुक्त खते देणार आहे.
थंडी असल्याने बागेला अधिकाधिक दिवस रात्री पाण्याची पाळी दिली जाईल. सिंचन व्यवस्थापन महत्त्वाचे असते. यामुळे पाण्याची मात्रा नियंत्रित व निर्देशानुसार राखली जाईल.
बागेतील फुटवे कापून घेणार आहे. फुटवे सतत वाढत असतात. त्यांना नियंत्रित ठेवणे आवश्यक असते. कारण पुढे बागेत निसवण सुरू होईल.
पुढील महिन्यात निसवण सुरू होणार आहे, हा काळ संवेदनशील असल्याने विद्राव्य खतांसह सरळ खते व मिश्र खतांची मात्रा दिली जाईल. त्यात पोटॅश, ०.५२.३४, पोटॅशिअम शोनाईट व ०.०.५० यांचा वापर करणार आहे. बागेच्या पाहणीसाठी तज्ज्ञांना बोलावणार आहे.
वन्यप्राणी नुकसान करण्याची भीती निसवणीच्या काळातही असते. तसेच ठिबकचे नुकसानही हे प्राणी अनेकदा करतात. यासंबंधी बागेत सातत्याने पाहणी करणे आवश्यक असते.
बागेत थंडीचा परिणाम अधिक जाणवल्यास थंडीपासून संरक्षणासाठी बागेभोवती हिरवी सहा फूट एवढी उंच शेड नेट बांधणार आहे. बागेच्या पश्चिम व दक्षिण भागात या शेडनेट लावण्याचे नियोजन सुरू आहे.
अतुल पाटील, ९८२२४५१६२१
(वेळ ः सायंकाळी सहा ते नऊ )
(शब्दांकन ः चंद्रकांत जाधव)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.