
शेतकरी ः विलास शिवराम नावळे
गाव ः लोरे क्रमांक २, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग
एकूण क्षेत्र ः ५ एकर
काजू लागवड ः २ एकर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोरे क्रमांक २ (ता. वैभववाडी) येथील पाच एकर जमीन आहे. त्यातील दोन एकरावर खडकाळ जमिनीवर काजू लागवड (Cashew Cultivation) केली आहे. त्यात वेंगुर्ला चार आणि वेंगुर्ला सात या जातींची सुमारे १५० झाडे आहेत. दोन झाडांत साधारण २१ बाय २१ फूट अंतर राखत लागवड केली आहे. उर्वरित क्षेत्रामध्ये भात, कुळीथ, चवळी इत्यादी पिकांची हंगामानुसार लागवड केली जाते.
व्यवस्थापनातील बाबी
साधारण मे महिन्यात काजू हंगाम संपतो. त्यानंतर बागेत पुढील कामकाजास सुरुवात होते.
हंगाम संपल्यानंतर बागेतील पालापाचोळा गोळा करून झाडाच्या बुंध्यात रचला जातो. त्यामुळे उन्हाळ्यात झाडांच्या मुळांना उष्णतेचा त्रास कमी होतो. तसेच पावसाळ्यात पालापाचोळा कुजल्यामुळे झाडांच्या मुळांमध्ये तणदेखील येत नाही.
पाऊस सुरू झाल्यानंतर बागेत तणांची वाढ झपाट्याने होते. हे तण साधारण ६ ते ७ इंचांपर्यंत वाढू दिले जाते. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर संपूर्ण बागेत रोटाव्हेटर मारला जातो. जेणेकरून तण जागेवर गाडले जाऊन कुजेल. बागेत कोणत्याही तणनाशकाचा वापर केला जात नाही. रोटाव्हेटर फिरवल्यामुळे बाग तणमुक्त होते. त्यामुळे वणवा लागण्याची शक्यता कमी होते.
ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमी होण्यास सुरुवात होते. या कालावधीत प्रत्येक झाडाला शेणखत किंवा कंपोस्ट खत झाडाच्या विस्ताराचा अंदाज घेऊन ५ ते ६ किलो प्रमाणे दिले जाते. तसेच वर्षातून ३ वेळा जिवामृताचा वापर केला जातो. बागेत रासायनिक खतांचा कमी वापर करण्यावर भर दिला जातो.
साधारण ऑक्टोबर महिन्यात झाडांना पालवी येण्यास सुरुवात होते. या काळात टी मॉस्किटो बगचा प्रादुर्भाव वाढतो. नियंत्रणासाठी पालवी येण्यास सुरुवात होताच शिफारशीत कीटकनाशकांची पहिली फवारणी घेतली जाते. फवारणीपूर्वी संपूर्ण बागेचे निरीक्षण केले जाते. त्यानंतर फवारणीसाठी कीटकनाशकांची निवड केली जाते.
आगामी नियोजन
सध्या काही झाडांना चांगली पालवी तर काहींना मोहोर येण्याची प्रकिया सुरू झालेली आहे. ऑक्टोबर महिन्यात एक फवारणी घेतली असून संपूर्ण बाग मोहोरल्यानंतर दुसरी फवारणी घेणार आहे.
कीटकनाशकांच्या सरासरी ३ फवारण्या घेतल्या जातात. परंतु सध्या वातावरण सातत्याने बदल होत असल्याने फवारणी वेळापत्रक निश्चित करता येत नाही. काही वेळा ढगाळ वातावरण, अति थंडी तर मध्येच अवकाळी पाऊस अशी स्थिती आहे. त्यामुळे वातावरण बदलानुसार फवारणीचे नियोजन करणे गरजेचे आहे.
झाडांना पालवी आणि मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू असल्याने बागेचे दररोज निरीक्षण करत आहे. या कालावधीत टी मॉस्किटो बग आणि फुलकिड्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे झाडांची पाने, मोहोराचे सातत्याने निरीक्षण केले जाईल.
परिसरातील काजू लागवडीत झाडे मरतुकीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे झाडांचे सातत्याने लक्ष द्यावे लागते.
काढणी
या वर्षी पाऊस लांबल्यामुळे काजू हंगाम लांबण्याची शक्यता आहे. साधारण फेब्रुवारी महिन्यात काजू बी परिपक्व होण्यास सुरुवात होईल. हा हंगाम एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत चालेल असा त्यांचा अंदाज आहे.
दरवर्षी सुरुवातीला वेंगुर्ला ४ झाडांचे काजू परिपक्व होतात. झाडावर पूर्ण परिपक्व होऊन जमिनीवर पडल्यानंतर काजू बी गोळा केले जाते. प्रतवारी करून काजू बीची साठवणूक केली जाते.
दोन एकरांतून साधारण ३०० ते ४०० किलो काजूगर उत्पादन मिळते. विलासराव काजू बीची विक्री करत नाहीत. त्यावर प्रकिया करून काजुगरांची विक्री केली जाते.
- विलास नावळे, ९४२१२६६९४९
(शब्दांकन ः एकनाथ पवार)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.