
वाढत्या तापमानामुळे पिकासाठी पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीत आहे त्या पाण्याचे योग्य नियोजन करुन पिकाची पाण्याची गरज भागवण्याला प्राधान्य द्यावे. मोसंबी पीक हे पाण्यासाठी संवेदनशिल पीक आहे.
जमिनीतील पाणी बाष्पीभवनाद्वारे, तर झाडातील पाणी पानातून होणाऱ्या उत्सर्जन प्रक्रियेमुळे झपाट्याने कमी होते. अशा परिस्थितीत आच्छादन, मडका सिंचन, ठिबक सिंचनाचा वापर करुन पिकाची पाण्याची गरज भागवता येते.
जमिनीतील ओलावा टिकवून धरण्यासाठी आच्छादनाचा फायदा होतो. आच्छादनासाठी पॉलिथिन फिल्मचा किंवा सेंद्रिय पदार्थांचा वापर करता येतो. शक्य असेल तर ८० ते १०० मायक्रॉन जाडीची फिल्म आच्छादनासाठी वापरावी.
सेंद्रिय आच्छादनामध्ये वाळलेले गवत, लाकडी भुस्सा, उसाचे पाचट, पालापाचोळा, गव्हाचे काड, भाताचे काड, गिरिपुष्प यांचा समावेश होतो. अशा अवशेषांचा फळझाडाच्या आळ्यामध्ये विशेषतः ड्रीपरच्या खाली ४ ते ६ इंच जाडीचा थर द्यावा.
त्या ठिकाणी तंतुमय मुळे पसरलेली असतात. वाळवीचा प्रादुर्भाव होणार नाही, याकडे लक्ष ठेवावे. आवश्यकतेनुसार शिफारशीत दाणेदार कीटकनाशकांचा वापर करता येईल. सेंद्रिय आच्छादनामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.
फळझाडाला पाणीपुरवण्यासाठी मडका सिंचन पद्धतीचा वापर करता येतो. ही पद्धत तुलनेने कमी खर्चिक असून, पाण्याचा कार्यक्षम वापर करणारी आहे. कमी वयाच्या फळझाडासाठी ५ ते ६ लिटर क्षमतेचे, तर मोठ्या झाडासाठी १५ लिटर क्षमतेचे मडके निवडावे. त्याच्या तळाशी लहानसे छिद्र पाडून त्यात कापडाची वात बसवून घ्यावी.
मडक्याचे तोंड जमिनीच्या वर राहील, अशा प्रकारे मडके झाडाच्या बुंध्याजवळ जमिनीत पुरावे. ते पाण्याने भरून मडक्याच्या तोंडावर झाकण ठेवावे. मडक्याच्या सच्छिद्र रचनेमुळे ते पाझरत राहते. त्यातील पाणी हळूहळू पाझरून जमिनीत ओलावा तयार होतो.
त्यामुळे झाडाच्या मुळांना सातत्याने आवश्यकतेप्रमाणे पाण्याचा पुरवठा संथ गतीने होत राहतो. मडके रिकामे झाल्यानंतर पुन्हा भरावे. आंतरमशागतीच्या वेळी मडके फुटणार नाही व शेतामध्ये जनावरांकडून तुडवले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी.
अतिउष्णतेपासून झाडाच्या खोडाचा बचाव करण्यासाठी उन्हाळ्यात व पाण्याचे दुर्भीक्ष असलेल्या काळात मोसंबी खोडास बोर्डो पेस्ट लावणे फायद्याचे ठरू शकते.
१ किलो मोरचूद, १ किलो कळीचा चुना, १० लिटर पाण्यात मिसळून बोर्डो पेस्ट तयार करावी. फळझाडाच्या खोडास बोर्डो पेस्टचा लेप द्यावा. त्यामुळे खोडाचा उष्णतेपासून बचाव होईल.
तापमानातील चढउतारामुळे फळांची गळ होते. यासाठी पाणी योग्य प्रमाणात व वेळेवर देणे महत्त्वाचे आहे. आंबे बहर असेल तर जास्त काळजी घ्यावी.
वातावरणातील बदलामुळे अनेक ठिकाणी झाडांना उशिरा फुले येतात. अनेक ठिकाणी नवीन पालवी आणि फुले लागणे एकाच वेळी होते. त्यासाठी विशेष काळजी घ्यावी.
अनेक शेतकऱ्यांना मोसंबी झाडे फुलांवर असताना फवारणी घेण्याविषयी साशंक असतात. मात्र नवीन पालवी आणि फुलकळ्या, फुलांवर किडीचा प्रादुर्भाव असल्यास पीक संरक्षणाच्या दृष्टीने फवारणी आवश्यक ठरते.
आंबे बहरात या अवस्थेत पाण्यासोबतच अन्नद्रव्येही पुरवणे आवश्यक असते. त्यासाठी एप्रिल महिन्यात सुमारे ७० लिटर, तर मे महिन्यात ८० लिटर पाणी देणे गरजेचे समजावे.
वातावरण बदल आणि त्यातील चढउतार. पाण्याच्या दोन पाळ्यातील अंतर कमी जास्त असणे. पूरक खताच्या मात्रा न देणे. नत्रयुक्त खतांच्या मात्रा कमी देणे.
पाण्याची गरज न जाणताच कमी अधिक पाणी देणे. या सर्व कारणांमुळे मोसंबी बागेत फळगळ होते. फळगळ रोखण्यासाठी प्रति झाड ५०० ग्रॅम युरिया द्यावा. एप्रिलमध्ये ७० लिटर तर मे महिन्यामध्ये ८० लिटर प्रति झाड पाणी द्यावे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.