
डॉ. सुजाता धुतराज
मृग बागेतील केळी (Banana) गर्भावस्थेत आहेत. सूक्ष्म घडनिर्मिती (Banana Production) व केळफूल बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे. कांदेबाग लागवड (Banana Cultivation) बाल्य अवस्थेत आहे. सध्या काही केळी उत्पादक भागांमध्ये ढगाळ वातावरणाची (Cloudy Weather) स्थिती आहे. केळीच्या वाढीसाठी १६ ते ४० अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते. वातावरणातील तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेले, तर त्याचा केळी वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.
कमी तापमानामुळे होणारे परिणाम
लागवडीवर परिणाम
उतिसंवर्धित रोपे रुजण्यासाठी १६ ते ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमानाची आवश्यकता असते. सध्या बऱ्याच ठिकाणी कांदेबाग लागवड पूर्ण झाली असेल. परंतु लागवडीस उशीर होईल, तसे थंडी वाढल्याने रोपांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.
मुळांवर परिणाम
उतिसवंर्धित रोपांची कांदेबाग लागवडीत कमी तापमानामुळे मुळांची संख्या व लांबी कमी होते. तसेच कमी तापमानामुळे मुळांच्या अन्न व पाणी शोषणाच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो.
पानांवर होणारा परिणाम
केळी झाडाला दर महिन्याला सरासरी ३ ते ४ पाने येतात. थंडीच्या दिवसांत पाने येण्याचा वेग मंदावतो. त्यामुळे प्रति महिना २ ते ३ पाने येतात. कमी तापमानामुळे पाने कमी अंतरावर येतात. पानांचा गुच्छ तयार होतो. त्यामुळे पानांचा फारच कमी भाग सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येतो. परिणामी अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत बाधा निर्माण होते.
लहान रोपांच्या कोवळ्या पानांच्या कडा करपतात. केळीचा पोंगा पिवळा होऊन करपतो.
मोठ्या रोपांच्या पानांवर पिवळसर रंगाचे लांबट चट्टे पडतात. हे चट्टे कालांतराने काळपट तपकिरी होऊन पाने वाळण्यास सुरुवात होते.
मोठ्या रोपांच्या कडासुद्धा थंडीमुळे करपतात. सूर्यप्रकाशाच्या बाजूने पानांचा रंग पिवळा पडतो, तर विरुद्ध बाजूच्या पानांचा रंग हिरवा राहतो.
झाडाच्या वाढीवर होणारा परिणाम
सध्या मृग बाग लागवडीतील केळी गर्भावस्थेत आहेत. कमी तापमानामुळे झाडाची वाढ मंदावते. वाढ कमी झाल्यामुळे केळफूल बाहेर पडण्यास उशीर होतो. परिणामी, केळी निसवण्याचा कालावधी लांबतो. त्यामुळे एकूण उत्पादन खर्च वाढतो.
बुंधा आणि घडावर होणारा परिणाम
कमी तापमानामुळे केळीचा बुंधा व घडाच्या दांड्यावर काळपट तपकिरी चट्टे दिसून येतात. हे चट्टे वाढत जातात आणि घड सटकतो. अचानक वाढलेल्या थंडीमुळे घडांची वाढ मंदावलेली दिसून येते.
फळवाढीवर होणारा परिणाम
घडातील केळीची वाढ फार हळूवार होते. परिणामी, घड पक्व होण्याचा कालावधी ३० ते ४० दिवसांनी वाढतो. त्यामुळे घड कापणीस वेळ लागतो.
उपाययोजना
केळी बागेला पाण्याचा ताण देऊ नये. रात्रीच्या वेळी ठिबक सिंचनाद्वारे १० ते १२ लिटर पाणी प्रति झाड प्रमाणे द्यावे.
बागेमध्ये गव्हाचा किंवा भाताचा किंवा लाकडाचा किंवा मक्याचा भुस्सा यांचा ढीग करून रात्री जाळून धूर करावा. जेणेकरून बागेचे तापमान वाढण्यास मदत होईल.
मुळांच्या कक्षेत चिखल होईल एवढे पाणी देऊ नये. मुळांची कक्षा कायम वाफसा स्थितीत राहील याची काळजी घ्यावी.
केळीची कार्यक्षम पाने कापू नयेत. फक्त रोगग्रस्त पाने कापावीत. सुकलेली पाने बुंध्याभोवती तशीच राहू द्यावीत. त्यामुळे बुंध्याचे थंडीपासून संरक्षण होईल.
प्रति १ हजार झाडांना २० किलो या प्रमाणे युरिया खताची अतिरिक्त मात्रा द्यावी.
करपा रोग नियंत्रण
सध्या बऱ्याच भागांमध्ये ढगाळ वातावरणाची स्थिती आहे. या काळात बागेत करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते.
सुरुवातीला झाडाच्या खालील बाजूच्या ४ ते ५ पानांवर लहान पिवळसर लंबगोलाकार ठिपके पडतात.
ठिपके मोठे होऊन कालांतराने आतील भाग तपकिरी काळपट रंगाचा होतो. रोगाच्या जास्त तीव्रतेमध्ये पाने करपतात.
रासायनिक नियंत्रण (फवारणी ः प्रतिलिटर पाणी)
प्रोपीकोनॅझोल (२५ ईसी) १ मिलि किंवा
कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यूपी) १ ग्रॅम अधिक स्टिकर १ मिलि
या प्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ फवारण्या कराव्यात.
फवारणी नॅपसॅक पंपाद्वारे करावी.
(ॲग्रेस्को शिफारस आहेत.)
- डॉ. सुजाता धुतराज, ७५८८६ १२६३२ (केळी संशोधन केंद्र, नांदेड)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.