शेतकरी : केशव मालोजी थोरात
गाव : मु.पो. माळीनगर (गट नं.२), ता. माळशिरस, जि. सोलापूर
एकूण शेती : १५ एकर
डाळिंब : सव्वा एकर
सोलापूर जिल्ह्यातील माळीनगर (ता. माळशिरस) येथे केशव थोरात यांची १५ एकर शेती आहे. नीरा कालव्यासह विहीर, बोअर व शेततळे असे पाण्याचा शाश्वत स्रोत आहेत. त्यामुळे बहुतांश बागायती पिकाकडे माझा अधिक कल आहे.
सध्या केळी, आले, ऊस, कांदा ही पिके आहेत. पाण्याची उपलब्धता असूनही क्षेत्रामध्ये ठिबकद्वारे पाणी दिले जाते. डाळिंब दीड एकर असून, त्याचे निर्यातक्षम सरासरी १० ते १५ टन उत्पादन घेतो. त्यासाठी रासायनिक, सेंद्रिय व जैविक खतांचा एकात्मिक वापर केला जातो.
व्यवस्थापनातील ठळक बाबी
१) सध्या आंबे बहर धरला आहे.
२) डाळिंब फळे काढल्यानंतर सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठीची कामांवर भर दिला जातो. विशेषतः शेणखत देण्यापूर्वी ते चांगले कुजवून त्यामध्ये ट्रायकोडर्मा व सुडोमोनसची प्रक्रिया करून जमिनीत दिले जाते.
३) शिफारशीप्रमाणे शेणखत, रासायनिक खते देऊन घेतो. त्यामुळे झाडामध्ये व काडीमध्ये अन्नद्रव्याची चांगली साठवण होते.
४) मे आणि ऑक्टोंबर महिन्यात झाडाच्या बुडाला गेरू आणि बोर्डो पेस्ट लावली जाते.
५) छाटणी करताना खोडावर दुपारचा सूर्यप्रकाश पडेल, अशा पद्धतीने छाटणी केली जाते.
६) छाटणीसाठी वापरल्या जाणाऱ्या कात्र्या प्रत्येक वेळी निर्जंतुक करून घेतल्या जातात.
७) डाळिंब बागेत पावसाळ्यात तेलकट डाग वाढू नये म्हणून अतिरिक्त फवारण्या टाळल्या जातात.
८) फळ हिरव्या रंगाचे झाले, की फळाला कागद लावला जातो. त्यामुळे फळाचे उन्हाच्या चटक्यापासून संरक्षण होते. फळाला एकसारखा रंग येऊन चकाकी येते. कीड-रोगापासून काही प्रमाणात बचाव होतो.
९) पावसाळ्यामध्ये सतत पाऊस चालू असल्यास फवारणीपेक्षा बुरशीनाशकाच्या (सल्फर, कॉपर) डस्टिंग घेतली जाते.
१०) अन्नद्रव्य व्यवस्थापनावर भर दिल्याने झाडे सक्षम व ताकदवान राहिल्याने तेलकट डाग रोगापासून बचाव होतो.
मागील दहा दिवसांतील कामे
-सध्या आंबे बहर धरला आहे.
-बाग आता सेटिंग अवस्थेत आहे.
-मागील १५ दिवसांतील पावसाळी वातावरणामुळे बुरशीनाशकाची फवारणी घेतली आहे.
-मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी केली आहे. तसेच ड्रीपमधूनही ते दिले आहे.
-थ्रीप्स व मावा किडीसाठी कीटकनाशकाची फवारणी घेतली आहे.
-मागच्याच आठवड्यात नवीन आलेले ‘वॉटर शूट’ काढून घेतले.
-सध्या ऊन्हाची तीव्रता वाढते आहे. त्यामुळे वाफसा पाहून दर दोन दिवसाआड पाणी देतो आहे.
पुढील वीस दिवसांतील नियोजित कामे :
-ठिबकद्वारे शिफारशीनुसार खते दिली जातील.
-सध्या वातावरणात सातत्याने बदल होत आहे. त्यात आवश्यकतेनुसार कीटकनाशक व बुरशीनाशकांच्या फवारणी घेणार आहे.
-बागेमध्ये नवीन तगारे व फुटवे आलेली काढून घेणार आहे.
-गवत कापून घेऊन बाग स्वच्छ ठेवण्याचे नियोजन आहे.
-खोडाचे फुटवेही काढून घेण्याचे काम करणार आहे.
-त्याशिवाय डाळिंबाच्या खोडांना खोडकिड्यांचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून खोडावर कीटकनाशक फवारून घेणार आहे.
-तापमान वाढायला लागल्यामुळे आवश्यकतेनुसार बाग वाफसा स्थितीमध्ये ठेवण्यासाठी पाण्याचे प्रमाण वाढवत न्यावे लागेल. त्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहे.
संपर्क : केशव थोरात, ८००७२६५७७८
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.