Turmeric Crop Management : हळद पिकातील खत, सिंचन व्यवस्थापन

सध्या हळद पीक शाकीय वाढीच्या अवस्थेत आहे. या काळात खत आणि सिंचनावर विशेष भर देणे आवश्यक असते.
Turmeric Crop Management
Turmeric Crop ManagementAgrowon

सध्या हळद पीक (Turmeric Crop) शाकीय वाढीच्या अवस्थेत आहे. या काळात खत आणि सिंचनावर विशेष भर देणे आवश्यक असते. पावसाचा अंदाज आणि जमिनीतील ओलावा यांचे प्रमाण लक्षात घेऊन सिंचन करावे.

सध्या हळद लागवड होऊन १२० दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. हा काळ हळद पिकाची शाकीय वाढ (४६ ते १५० दिवस) पूर्ण होण्याचा असतो. या अवस्थेमध्ये हळदीला फुटवे येतात. तसेच नऊ महिन्यांच्या कालावधीमध्ये येणाऱ्या एकूण पानांची संख्या आणि उंची निश्‍चित होते. पावसाळी हंगामात हळदीच्या खोडांची आणि फुटव्यांची भरपूर वाढ होते. या काळात वातावरणात २५ ते ३५ अंश सेल्सिअस तापमान असते. या काळात शाकीय वाढीसाठी पोषक वातावरण उपलब्ध असते.

Turmeric Crop Management
Crop Damage : यंदा वऱ्हाडात १०० टक्क्यांवर पाऊस

हळद पिकाच्या योग्य वाढीसाठी आंतरमशागतीची कामे वेळेवर करणे गरजेचे आहे. यामध्ये खत, पाणी व्यवस्थापन, तणनियंत्रण इत्यादी महत्त्वाच्या कामांचा समावेश होतो. तापमान जास्तच कमी झाले तर हळद पिकांवर विविध किडी-रोगांचा प्रादुर्भाव होतो. याचा गड्ड्यांची संख्या आणि आकार यावर परिणाम होण्याची शक्यता असते.

Turmeric Crop Management
Weed Crop : तणनियंत्रणासाठी सोपे अवजार, गवत तलवार

खत व्यवस्थापन ः

- हळद पिकांस हेक्टरी २०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद आणि १०० किलो पालाश देण्याची शिफारस आहे. संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीवेळी आणि नत्राची मात्रा दोन समान हप्त्यांत विभागून दिली जाते. नत्राचा पहिला हप्ता लागवडीनंतर ४५ दिवसांनी आणि दुसरा हप्ता भरणीच्या वेळी (लागवडीनंतर १०५ दिवसांनी) द्यावा.

- अद्याप भरणी करण्याचे राहिलेल्या ठिकाणी तत्काळ मातीची भर द्यावी. या वेळी हेक्टरी २१५ किलो युरिया, तसेच १२.५० किलो फेरस सल्फेट (हिराकस) आणि १० किलो झिंक सल्फेट आणि २ टन निंबोळी किंवा करंजी पेंड याप्रमाणे वापर करावा.

- रासायनिक खते भरणी करताना दिल्यामुळे ती योग्यरीत्या मातीत मिसळली जातात. भरणीमुळे उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

फर्टिगेशन ः

- हळदीच्या अधिक उत्पादनासाठी ठिबक सिंचनातून विद्राव्य खतांचा वापर फायदेशीर ठरतो. माती परीक्षण अहवालानुसार रासायनिक खतांच्या मात्रा ठरवून द्याव्यात.

- जमिनीद्वारे द्यावयाची खतांची मात्रा आणि फर्टिगेशनद्वारे द्यावयाची खतांची मात्रा ही वेगवेगळी आहे. रासायनिक खतांच्या मात्रा शिफारशीत मात्रेपेक्षा कमी अधिक प्रमाणात दिल्यास पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम दिसून येतो.

- फर्टिगेशन करताना प्रामुख्याने युरिया, फॉस्फरिक ॲसिड आणि पांढरे पोटॅश यांचा वापर करावा. फर्टिगेशनला हळद लागवडीनंतर १५ दिवसांनी सुरुवात करावी.

पीक अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन ः

पीकवाढीच्या अवस्था---हळद लागवडीपासूनचा कालावधी---अन्नद्रव्यांची मात्रा (किलो प्रति हेक्टर)

००---००---नत्र---स्फुरद---पालाश---नत्र---स्फुरद---पालाश

लागवड ते उगवण अवस्था---३ ते ४ आठवडे (२ समान हप्ते)---१५---१५---७.५०---७.५०---७.५०---३.७५०

शाकीय वाढ---५ ते १४ आठवडे (१० समान हप्ते)---७५---२२.५---१५---७.५०---२.२५०---१.५००

कंदवाढीची सुरुवात---१५ ते २६ आठवडे (१२ समान हप्ते)---३७.५---२२.५---२२.५---३.१२५---१.८७५---१.८७५

कंद तयार होण्याची अवस्था---२७ ते ३२ आठवडे (६ समान हप्ते)---२२.५---१५---३०---३.७५०---२.५०० ५

एकूण---००---१५०---७५---७५

पाणी व्यवस्थापन ः

- हळद लागवडीत पावसाचे पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पाणी साचून राहिल्यामुळे मुळांना हवा (ऑक्सिजन) घेण्यास अडथळा निर्माण होतो. परिणामी पाने पिवळी निस्तेज होऊन मलूल होतात. त्यासाठी पावसाच्या पाण्याचा तत्काळ निचरा करावा. वाकोज्याची शेवटची सरी कुदळीच्या साह्याने फोडून पाणी शेताबाहेर काढून द्यावे. जमिनीतील उपलब्ध ओलाव्याचा अंदाज घेऊन सिंचन करावे.

- रुंद वरंबा पद्धतीने लागवड असल्यास ठिबक सिंचन पद्धतीचा उपयोग करावा. ठिबक सिंचन पद्धतीमुळे पाण्याचा अपव्यय टाळला जाऊन जमिनीचे जैविक गुणधर्म सुधारण्यास मदत होते. परिणामी, जमिनीमध्ये मुळांजवळ वाफसा लवकर आणि जास्त प्रमाणात तयार होतो. सूक्ष्मजीवांच्या क्रिया सुधारतात, मातीची सच्छिद्रता वाढते, जलधारणक्षमता वाढते. त्यामुळे जमिनीची उत्पादनक्षमता वाढते. परिणामी, अन्नद्रव्यांचे वहन सुलभ होऊन मुळांद्वारे शोषण अधिक होते. सूक्ष्म पाने लवकर मोठी होतात. हळदीतील कुरकुमीनचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

- हळद पिकात उत्पन्नाचा स्रोत जमिनीत वाढणारे कंद असल्यामुळे जमिनीतील मातीचे प्रमाण, सेंद्रिय पदार्थ, हवा आणि पाणी यांचे योग्य संतुलन राखावे. माती ४५ टक्के, सेंद्रिय पदार्थ ५ टक्के, हवा आणि पाणी प्रत्येकी २५ टक्के असे प्रमाण असलेल्या जमिनीत पिकाची वाढ चांगली होते.

- हिवाळ्यामध्ये पाण्याच्या दोन पाळ्यांतील अंतर १२ ते १५ दिवस इतके ठेवावे. हलक्या ते मध्यम जमिनीत पाण्याच्या १३ ते १५ पाळ्या द्याव्यात. पिकास पाणी कमी पडल्यास कंदाची योग्य वाढ होत नाही. प्रक्रियेनंतर अशा हळकुंडांचा रंग फिका पडतो, चमक घटते. परिणामी दर कमी मिळतो.

तण नियंत्रण ः

- हळद पिकामध्ये शेणखताचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागतो. त्यामुळे शेणखताद्वारे तणांचे बी शेतात येते. विविध तणवर्गीय वनस्पती विविध रोग-किडींसाठी यजमान वनस्पती म्हणून कार्य करतात. त्यामुळे हळद पिकावर रोग-किडींचा प्रादुर्भाव लवकर होतो. त्यासाठी तणांचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे आहे.

- लागवडीनंतर ६०, ९० आणि १२० दिवसांच्या अंतराने मजुरांच्या मदतीने निंदणी करावी. हळद उगवणीनंतर तणनाशकांची फवारणी करणे टाळावे. तणनाशकांच्या फवारणीमुळे पिकाच्या शारीरिक क्रियांवर विपरीत परिणाम होतो.

- डॉ. मनोज माळी, ९४०३७ ७३६१४

(प्रभारी अधिकारी, हळद संशोधन योजना, कसबे डिग्रज, जि. सांगली)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com