
डॉ. पपिता गौरखेडे
मध्यम काळ्या आणि हलक्या जमिनीची धूप होत आहे. जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत असलेला उपसा आणि सेंद्रिय कर्बाचे (Organic Carbon) प्रमाण कमी होत आहे. यासाठी मृद्संवर्धनाची कामे (बांध-बंदिस्ती) केल्यास माती वाहून जाणार नाही, जमिनीमध्ये पाणी झिरपेल. मृद्संधारणाची कामे शासन पातळीवर होत असतात. परंतु झालेल्या कामांची निगा ठेवणे, हे शेतकऱ्यांचे काम आहे. मृद्संधारणाची कामे होत असताना शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष हजर राहून शेतीचा चढ-उतार, उंच-सखल भाग इत्यादी माहिती संबंधित अधिकाऱ्यांना दिली, तर मृद्संधारण अधिक चांगल्या प्रकारे होईल. मृदसंधारणामुळे मातीचा वरचा थर ज्यामध्ये सेंद्रिय कर्ब आणि उपयोगी जिवाणूंचे प्रमाण सर्वाधिक असते, त्याची जपणूक होते.
सामूचे बिघडते प्रमाण
काळ्या जमिनी अल्कलीधर्मी असून, त्यामध्ये सामूचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. सामू ७.५ च्या वर गेल्यामुळे नत्र, तांबे स्फुरद, बोरॉन, जस्त, लोह व मँगेनीज या अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होते. त्यासाठी जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ च्या दरम्यान ठेवणे आवश्यक आहे. सेंद्रिय खते उदा. शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत इत्यादींचा प्रतिहेक्टरी ५ टन वापर केल्यास सामू नियंत्रणात राहतो. त्याचबरोबर पाण्याचा योग्य निचरा करणे आवश्यक आहे. सामू ८.५ च्या वर असेल, तर प्रतिहेक्टरी ३ टन जिप्समचा वापर आणि योग्य निचऱ्याची व्यवस्था केल्याने जमिनीचे आरोग्य चांगले राहते.
क्षारता
जमिनीतील क्षारतेचे प्रमाण जमिनीस आणि पिकास हानिकारक होईल, इतक्या मर्यादेपर्यंत सध्या तरी पोहोचलेले नाही. परंतु बागायती क्षेत्रामध्ये प्रामुख्याने धरण प्रकल्पाखालील क्षेत्रामध्ये क्षार जास्त प्रमाणात आढळतात. त्यासाठी चर काढून निचऱ्याची व्यवस्था करावी. उसाची मळी, सेंद्रिय खताचा योग्य वापर केल्याने क्षाराचे प्रमाण नियंत्रणात येते.
गाळाची जमीन
मुख्य नद्यांच्या किनारी तयार झालेल्या गाळाच्या जमिनी.
समुद्र किनारी तयार झालेल्या गाळाच्या जमिनी. उदा. ठाणे, रायगड जिल्ह्यातील समुद्रकाठच्या गाळाच्या जमिनी.
या दोन्ही प्रकारच्या जमिनी अधिक सुपीक असतात.
समुद्रकाठाच्या गाळाच्या जमिनी या फळे व भाजीपाला पिकांसाठी उत्कृष्ट असतात.
पर्वतीय व जंगलपट्टीय मृदा
बेसॉल्ट या अग्निजन्य खडकापासून या जमिनीची निर्मिती होते.
नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील पूर्वेकडील डोंगराळ भागात या जमिनी आढळतात.
या जमिनी १२०० ते २००० मि.मी इतक्या जास्त पावसाच्या प्रदेशात तयार होत असल्याने कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम या विद्राव्य क्षारांचे प्रमाण कमी असते.
जमिनीची प्रतिक्रिया उदासीन ते कमी आम्लधर्मी स्वरूपाची असते.
क्षारयुक्त चोपण जमिनीचे प्रकार
खार जमिनी
भरतीमुळे येणाऱ्या खाडीतील पाण्याच्या सततच्या शिरकावामुळे तसेच उन्हाळ्यातील बाष्पीभवनामुळे समुद्रकाठी किंवा खाडी किनारी अशा प्रकारच्या जमिनी तयार होतात. यामध्ये प्रामुख्याने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे जिल्ह्यांचा समावेश होतो.
क्षारयुक्त चोपण आणि चोपण जमिनी
दिर्घकाळ जास्त पाणी दिल्याने जमिनीतील पाण्याची पातळी वाढते.
क्षारयुक्त पाणी दिल्याने अशा जमिनी तयार होतात.
सोडियम क्षांराचा अधिक संचय झाल्यामुळे या जमिनी तयार होतात. या जमिनी पिकांच्या दृष्टीने हानिकारक असतात.
या जमिनीच्या लागवडीपूर्वी भूसुधारके वापरून जमिनीचा सामू कमी करणे आवश्यक असते. जिप्सम, गंधक व आर्यन पायराईट ही भूसुधारके वापरावीत.
चांगले आरोग्य असलेली जमीन
जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ दरम्यान असावा.
क्षारांचे प्रमाण कमी असावे.
सेंद्रिय कर्ब एक टक्क्यापेक्षा जास्त असावे
चुनखडीचे प्रमाण पाच टक्क्यांपेक्षा कमी असावे.
पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी.
क्षारयुक्त किंवा चोपण नसलेली जमीन असावी.
योग्य त्या सर्व अन्नद्रव्यांचा समतोलपणे पुरवठा करणारी जमीन असावी.
पाणी आणि हवेचे योग्य प्रमाण असणारी जमीन असावी.
भरपूर जिवाणूंनी युक्त असलेली जमीन असावी.
- डॉ. पपिता गौरखेडे, ८००७७४५६६६
(कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.