
उन्हाळ्यात तापमानात वाढ झाल्यामुळे जमिनीचे आणि वनस्पतीतील बाष्पीभवनाचे प्रमाण (Evaporation Rate) वाढते. जमिनीतील पाण्याची पातळी (Water Level) कमी होऊन पिकांचीही पाण्याची गरज (Water Requirement) वाढते.
त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याचे योग्य नियोजन करुन पिकांना योग्य प्रमाणात पाणी द्यावे लागते. यामध्ये आच्छादन, मटका सिंचन, फळझाडांची छाटणी, ठिबक सिंचन, बाष्पोत्सर्जनाचा वापर अशा तंत्राचा अवलंब केला जातो.
यापैकी कमी क्षेत्रावरिल फळबागेमध्ये मटका सिंचनाचा (Mataka Irrigation) वापर करता येतो. पाण्याचा कार्यक्षमरीत्या वापर होणाऱ्या या पद्धतीत कमी वयाच्या फळझाडांसाठी ५ ते ६ लिटर क्षमतेचे व मोठ्या फळझाडांसाठी १५ लिटर क्षमतेचे मडके निवडावे.
त्यासाठी तळाशी लहानसे छिद्र पाडून त्यात कापडाची चिंधी बसवून मडक्याचे तोंड जमिनीच्या वर राहील अशा बेताने मडके झाडाच्या बुंध्याजवळ जमिनीत गाडावे.
हे मडके पाण्याने भरुन झाकावे. मडक्याच्या सच्छिद्र रचनेमुळे ते पाझरते व त्यातील पाणी हळूहळू पसरुन जमिनीत ओलावा तयार होतो, त्यामुळे झाडाच्या मुळांना सातत्याने आवश्यकते एवढा पाण्याचा पुरवठा होऊ शकतो. मडके रिकामे झाल्यानंतर पुन्हा भरावे.
वाढत्या तापमानामुळे झाडांवरील पानांमधून पाण्याचे उत्सर्जन होत असते. पानांमधील पर्नरंध्रे पाणी बाहेर टाकत असतात, त्यामुळे झाडाची छाटणी करुन झाडाचा आकार मर्यादित ठेवावा. त्यामुळे पर्णभार कमी होऊन बाष्पीभवनाचा वेग मंदावतो.
झाडे जगण्यास मदत होते. पानांच्या पर्नरंध्रातून होणारे पाण्याचे उत्सर्जन कमी करण्यासाठी ८ टक्के केओलीन म्हणजेच ८०० ग्रॅम केओलीन १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. त्यामुळे झाडाचे तापमान कमी होते आणि झाडाची ताण सहन करण्याची क्षमता वाढते. आणि कमीत कमी पाण्यामध्ये सुद्धा झाड तग धरुन राहते.
फळबागांमध्ये खोडाभोवती मातीचा थर दिल्यास बाष्पीभवनामुळे होणारे नुकसान टाळता येते. मातीचा थर आच्छादनाप्रमाणे काम करतो. झाडावरील पानांची संख्या कमी करावी म्हणजेच ३० टक्के पानोळ्याची छाटणी करावी.
ज्या फळबागा फळावर असतील परंतु पाणी कमी प्रमाणात उपलब्ध असल्यास अशा वेळी फळांची संख्या कमी केल्याने देखील झाडांना पाण्याची गरज कमी पडते.
प्रखर सुर्यप्रकाश फळझाडाच्या खोडावर पडून झाडाला ईजा पोहचू नये यासाठी झाडाच्या खोडाला गवत अथवा बारदाना सुतळीच्या साहाय्याने खोडाच्या संपूर्ण भागावर घट्ट बांधावा.यामुळे खोडाचे प्रखर सुर्यप्रकाशापासून संरक्षण होऊ शकते.
याशिवाय झाडाच्या खोडाला १ टक्का बोर्डोपेस्ट लावल्याने खोडावर पडणारा सुर्यप्रकाश परावर्तीत होऊ झाडाचे उन्हापासून संरक्षण होते व होणारे नुकसान टाळता येते.
फळबागेत अशा उपाययोजना केल्यास काही प्रमाणात पाण्याचा ताण कमी करता येतो आणि कमी पाण्यातही फळबाग वाचविता येते.
संदर्भ - वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.