
चहाच्या टपरीवर एक कप चहाची किंमत किती हे टपरीवाला ठरवतो.मात्र आपल्या शेतात पिकवलेल्या शेतमालाची किंमत शेतकरी निश्चित करत नाही, असं का?
· त्यासाठी आपल्याला बाजारपेठ म्हणजे काय हे समजून घ्यायला हवं.
· एका चहाच्या टपरीवर एक कटिंग चहा, पाच रुपयाला मिळत असेल.
· येवले चहासाठी एक कपाला दहा रुपये मोजावे लागतील.
· पंचतारांकित हॉटेलात एक कप चहासाठी शंभर रुपये मोजवे लागतात.
टपरी असो की येवले चहा वा पंचतारांकित हॉटेल, प्रत्येकाच्या चहाची चव रोज तीच असते. कारण चहा पावडर, साखर, पाणी, दूध व इतर मसाले कोणते वापरायचे, किती प्रमाणात वापरायचे हे निश्चित असतं. रोज आपण किती कप चहा विकतो, त्यामध्ये किती टक्के वाढ वा घट होऊ शकते हे प्रत्येक विक्रेत्याला माहीत असतं. त्यानुसार तो चहाची सामग्री विकत घेतो. तयार चहा हे औद्योगिक उत्पादन आहे. मागणीनुसार पुरवठा कमी-जास्त करता येतो.
शेतमालाबाबत असं करता येत नाही. एका एकरात कांदा लावला की मागणी कमी-अधिक झाली तरी उत्पादन तेवढंच येतं. फारतर काढणीला थोडा विलंब करता येईल. औद्योगिक उत्पादनात सर्व घटक मानवी नियंत्रणाखाली असतात. सूर्यप्रकाश, आर्द्रता, पाऊस, तापमान, वारा, मातीतला ओलावा, मातीतले सूक्ष्म घटक, कीटक, किडी, अशा अनेक घटकांचा परिणाम शेती उत्पादनावर होतो.
औद्योगिक उत्पादनात निविष्ठांचं प्रमाण निश्चित असतं त्यामुळे उत्पादित मालाचा दर्जा व गुणवत्ताही निश्चित असते. कांदाच्या उत्पादनासाठी बियाणं, खतं, औषधं इत्यादींचं प्रमाण तेच असंल तरीही दर एकरी उत्पादन बदलतं, सर्व कांद्याचा आकार वा गुणवत्ता सारखी नसते. शेतीमालाचा पुरवठा मागणीनुसार कधीही नसतो. कमी वा अधिक असतो. ब्रिटानिया कंपनी ब्रेडचं उत्पादन रोज करते. त्यासाठी लागणारा मैदा त्यांना वर्षातून एकदा घ्यावा लागतो. गव्हाच्या किंमती रोज बदलत असतात पण ब्रेडची किंमत रोज तीच असते.
शेतमालाचा प्रवास नदीसारखा असतो. उगमापाशी नदी छोटी असते, उताराकडे वाहात जाते तेव्हा तिला अनेक ओहोळ, नद्या, नाले येऊन मिळतात, तिचं पात्र मोठं होतं. ती उताराकडे वाहाते. शेतमालाचा प्रवास अधिक किंमतीकडे होतो आणि हा प्रवास करताना त्याची मालकी बदलत जाते.
शेतमालाची खरेदी सामान्यतः चार ठिकाणी होते.
१. शेताच्या बांधावर, शेतकरी-व्यापारी यांच्यातील खरेदी व्यवहार असेंब्ली मार्केटमध्ये होतो.
२. व्यापारी-व्यापारी वा प्रक्रिया उद्योजक वा निर्यातदार यांच्यातला व्यवहार घाऊक बाजारपेठेत होतो.
३. किरकोळ बाजारात सामान्य ग्राहक शेतमालाची खरेदी करतात.
शेताच्या बांधावर मिळणार्या किंमतीपेक्षा, शेतकरी-व्यापारी यांच्यातील व्यवहारात मिळणारी किंमत अधिक असते, याच शेतमालाची घाऊक बाजारपेठेतली किंमत त्याहून अधिक असते. हाच शेतमाल किरकोळ बाजारात पोचतो तेव्हा त्याची किंमत सर्वाधिक असते. शेतमालाचा व्यवसाय हाय व्हॉल्यूम-लो मार्जिनचा समजला जातो. म्हणजे उलाढाल मोठी असते मात्र नफ्याचं प्रमाण कमी असतं. सामान्यतः मागणी व पुरवठा यानुसार शेतमालाची किंमत निश्चित होते.
नाशिवंत शेतमाल
१. फळे व भाज्यांची शेतकर्यांकडून खरेदी दोन ठिकाणी होते. शेताच्या बांधावर आणि शेतकरी—व्यापारी यांच्यातील घासाघीसीने. सामान्यतः कृषी उत्पन्न बाजार समितीत.
२. शेताच्या बांधावर खरेदी करणारा बाजारपेठेतील व्यापार्याचा प्रतिनिधी वा एजंट असतो. अमुक एक भाजी वा फळे यांची आवक किती होणार आहे याबाबत त्याला बाजारपेठेतील व्यापारी माहिती देतो व त्यानुसार तो किंमत ठरवतो.
३. शेतकरी-व्यापारी व्यवहार होणार्या कृषी उत्पन्न बाजारसमितीत विविध भाज्या व फळांची किती आवक झाली आहे, आपण किती माल विकू शकतो याचा अंदाज व्यापारी घेतो त्यानुसार बोली लावतो. सर्वात जास्त बोली, शेतमालाची उच्चांकी किंमत निश्चित करते.
४. घाऊक बाजारपेठेला टर्मिनल मार्केट असंही म्हणतात. या बाजारपेठेतून शेतमाल थेट किरकोळ बाजारपेठेत येतो. उदा. मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती. या बाजारसमितीत शेतकरी शेतमाल घेऊन क्वचित येतात. सामान्यतः या बाजारसमितीत व्यापारी-व्यापारी असा व्यवहार होतो. खरेदी करणारा व्यापारी आपल्याकडील शेतमालाची दर्जा व गुणवत्तेनुसार वर्गवारी करून निर्यातदार, प्रक्रिया उद्योग, किरकोळ विक्रेते यांना शेतमाल विकतो.
टिकाउ शेतमाल
१. धान्ये, डाळी, तेलबिया, कापूस इत्यादी शेतमालाचा यामध्ये समावेश होतो. या शेतमालाची मागणी केवळ स्थानिक नसते तर राज्य व देशपातळीवर असते त्याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही या शेतमालाची खरेदी-विक्री होते. सर्वाधिक उलाढाल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत होते त्यामुळे या शेतमालाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठ निश्चित करते.
२. देशातील मागील वर्षाचा शिल्लक साठा, आयात वा निर्यात, देशाचं आयात-निर्यात धोरण, आयात शुल्क आणि मागणी हे प्रमुख घटक या प्रकारच्या शेतमालाची किंमत निश्चित करतात. उदा. पामतेलावरील आयात करात सरकारने घट केली तर देशातील तेलबियांच्या किंमती कोसळू शकतात.
३. धान्ये, डाळी, तेलबिया, कापूस या प्रकारच्या शेतमालाचं देशांतर्गत उत्पादनाचा अंदाज, मागील वर्षाचा शिल्लक साठा, इतर देशांमधील उत्पादनाचा अंदाज आणि विविध देशांतून असणारी मागणी यानुसार या शेतमालाच्या किंमतींमध्ये चढ-उतार होतात. उदाहरणार्थ जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात चण्याचं उत्पादन बाजारपेठेत येणार तेव्हा किंमती कमी असतात कारण आवक प्रचंड होते. मात्र चण्याच्या किंमती सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात वाढतात कारण पुरवठा कमी होतो.
ध्यानात ठेवायच्या बाबी—
१. बाजारपेठेतील किंमत मागणी-पुरवठा आणि सरकारी धोरण यानुसार ठरते.
२. उत्पादन औद्योगिक असो की शेतमालाचं, उत्पादन खर्चानुसार त्याची किंमत निश्चित होत नाही.
३. उत्पादन खर्च कमी केला तर नफ्यात वाढ होते.
४. शेतमालाच्या उत्पादनाची सर्व जोखीम शेतकर्यावर असते. शेतमालाच्या मार्केटिंगची जोखीमही शेतकर्यावर असते. ही जोखीम करण्यासाठी व्यक्तीगत व सामूहिक पातळीवर प्रयत्न करता येतात, राजकीय पातळीवरही प्रयत्न करावे लागतात.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.