
पुणे येथील आरती (अॅप्रोप्रिएट रुरल टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट) या संस्थेने कमी खर्चाचे हरितगृह (Greenhouse) विकसित केले आहे. भारतातील हवामान लक्षात घेऊन ते तयार करण्यात आलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना स्वस्तात हरितगृह उपलब्ध होऊन पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी मदत होणार आहे.
आजकालचे बरेच शेतकरी संरक्षित शेतीकडे वळले आहेत. प्रतिकूल हवामानात अधिक चांगल्या उत्पादनासाठी शेडनेट, हरितग्रह, पॉलीहाऊस सारखे पर्याय उपलब्ध आहेत. मुख्यतः भाजीपाला व फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात इस्त्राईल किंवा युरोपियन बनावटीचे हरितगृहे बघायला मिळतात. या हरितगृह उभारणीचा एकरी खर्चही प्रचंड असतो. बाह्य वातावरणापेक्षा हरितगृहात उत्पन्न जास्त येण्यामागचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे आतल्या वनस्पतींनी श्वसनाद्वारे बाहेर सोडलेला कार्बन डाय ऑक्साईड वायू आत साठून राहतो. यामुळे हरितगृहातील वातावरणात कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण वाढते. त्यामुळे प्रकाश संश्लेषणाची कार्यक्षमता ही वाढते. जास्त अन्न तयार करू शकल्यामुळे वनस्पतींची वाढ ही जास्त चांगली होते. मात्र प्रचंड भांडवली खर्चामुळे हरितग्रहात उत्पन्न वाढ होऊनही भारतासारख्या देशात शेतकऱ्याला फायदा होण्यापेक्षा नुकसानच होतं. मात्र युरोपात प्रचंड थंडीत किंवा इस्त्राइलसारख्या वाळवंटी प्रदेशात प्रचंड उन्हाळ्यात शेती करायची असल्यास बंदिस्त हरितगृहाला पर्याय नाही.
स्वस्त हरितगृह अधिक फायदेशीर कसे?
भारतात बहुतेक भागांमध्ये पूर्णतः बंदिस्त हरितगृहाची गरजच नाही. आपल्याला हरितगृहाचा फक्त एकच उपयोग आहे आणि तो म्हणजे कार्बन डाय-ऑक्साइड साठवून ठेवणे. यासाठी केवळ चार फुट भिंतीच्या आडोसा पुरेसा आहे. कारण कार्बन डाय-ऑक्साइड हवेपेक्षा जड असल्याने जमिनी लगतच गोळा होतो व जमिनीलगत सर्वत्र पसरतो. या पद्धतीच्या स्वस्त हरितगृहाचा एकरी खर्च ही कमी असतो. पण उत्पन्नातील वाढ मात्र बंदिस्त हरितगृहाइतकीच असते. हे तंत्र शेतीसाठी तसेच रोपवाटिकेसाठी ही अत्यंत फायदेशीर आहे. ज्या प्रकारे कृत्रिम प्रकाशाचा योग्य वापर करून वनस्पतीच्या वाढीचा वेग वाढवता येतो. त्याचप्रमाणे स्वस्त हरितगृहाचा वापर करूनही वनस्पतीची वाढ झपाट्याने घडवून आणता येते.
स्वस्त हरितगृह कसे बनवायचे ?
ज्या ठिकाणी कलमे किंवा रोपे ठेवली आहेत त्या जागेभोवती सुमारे दोन मीटर उंचीचे बांबू उभे करावेत. बांबूच्या आधारे या जागेला चारही बाजूंनी वेढून टाकेल अशा प्रकारे पारदर्शक पांढऱ्या प्लास्टिक कापडाची भिंत उभारावी. प्लास्टिकचे कापड जमिनीला टेकते त्या जागी कापडाच्या दोन्ही बाजूंनी माती चढवून कापड व जमीन यांच्यात फट राहणार नाही याची काळजी घ्यावी. वनस्पतींच्या श्वसनाने निर्माण होणारा कार्बन डाय ऑक्साईड वायू हवेपेक्षा जड असल्याने रात्री जमिनीलगत राहतो. सूर्योदयानंतर रोपे प्रकाश संश्लेषण करू लागतात तेव्हा हा साठलेला वायू वापरला जातो या सोप्या उपायाने रोपांच्या कलमांच्या वाढीत ५० ते १०० % वाढ घडवून आणता येते.
--------------
स्त्रोत ः पुस्तिका- अॅप्रोप्रिएट रुरल टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट (आरती) ने विकसित केलेली तंत्रे
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.