
दिवसेंदिवस जमिनीची सुपीकता (Soil Fertility) कमी होत चाललेली आहे. कीड रोगांचा (Pest and Diseases) प्रादुर्भाव वाढत असून बी, बियाणे, खते, कीटकनाशकांच्या वाढत्या खर्चाने उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नाही. अनेकदा उत्पादन खर्च जास्त तर त्यातून मिळणारे उत्पन्न कमी अशी स्थिती असते.
रासायनिक खतांवर होणार खर्च हा जास्त असतो. त्याला पर्याय म्हणून जर आपण जैविक खतांचा (Organic Fertilizers) वापर केला तर उत्पादन खर्चातही बचत होते.
सेंद्रिय शेतीमध्ये आवश्यक निविष्ठा स्वतच्या शेतातच किंवा गावातच तयार करता येतात. यापैकी सेंद्रिय शेतीत जिवामृताचा वापर केला जातो. जीवामृताच्या वापराने जमिनीतील जिवाणूंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते.
जिवाणूंची संख्या वाढल्याने हवेतील नत्र शोषून घेण्याचे प्रामाण वाढते. पिकांना नत्र व इतर पूरक अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे शाकीय वाढ जोमदार होते. पीक तजेलदार, टवटवीत व निरोगी दिसून येते.
हे जिवामृत कमी खर्चात घरच्याघऱी कसे तयार करायचे? याविषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.
जीवामृत कसं तयार कराव?
जीवामृत तयार करण्यासाठी २०० लिटर क्षमतेच्या प्लॅस्टिक बॅरल किंवा टाकीमध्ये १७० लिटर स्वच्छ पाणी घ्यावे. त्यात १० किलो शेण, १० लिटर गोमूत्र, २ किलो काळा गूळ, २ किलो बेसन, २ किलो जिवाणू माती किंवा १०० ग्रॅम उपलब्ध संवर्धक मिसळावे.
डावीकडून उजवीकडे दररोज १० ते १५ मिनिटे २ ते ३ वेळा ढवळावे. ७ दिवसात पिकांना देण्यासाठी जीवामृत तयार होते. एका एकराला २०० लिटर जिवामृत पुरेसे होते. जास्त क्षेत्र असल्यास बॅरलची संख्या वाढवावी. किंवा हजार लिटर क्षमतेच्या टाक्यांमध्ये वरील प्रमाण पाचपट करुन मिश्रण तयार करावे.
गोमूत्राची उपलब्धता जास्त असल्यास पाण्याचे प्रमाण कमी करावे. शेतकरी जिवामृत तयार करण्यासाठी विविध प्रमाणात साहित्य वापरतात. ते द्रावण ठेवण्याचे दिवसही वेगवेगळे आहेत. मात्र वरील साहित्य किमान व योग्य प्रमाणात आहेत.
जीवामृताचे गुणधर्म काय आहेत?
चांगल्या जिवामृताचा रंग तांबडा ते काळसर असतो. यात नत्राचे प्रमाण ३ ते ६ टक्क्यांपर्यंत असते.
जिवामृताचा सामू जवळपास आम्लधर्मी असतो. उपयुक्त सुक्ष्म जिवाणूंच्या निरनिराळ्या प्रजातींच्या वाढीसाठी जिवामृत हे उत्कृष्ट अन्नस्त्रोत ठरते.
जिवामृतातील सुक्ष्मजीवाणू हवेतील नत्र शोषून घेतात त्यातील कर्ब आणि नत्राचे गुणोत्तर कमी होते.
जिवामृत द्रवरुपात असल्याने जिवाणूंची संख्या व टिकण्याचा कालावधी वाढतो. जीवामृत जास्तीत जास्त ३० दिवसात वापरावे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.