
हवामान अंदाजानूसार जुलै महिन्यात शेवटचा आठवडा वगळता प्रत्येक आठवड्यात चांगला पाऊस झाला. सध्या पावसाने उघडीप दिेलेली आहे. बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे तर जमिनीतील ओलावा वाढलेला आहे. मराठवाडयात दिनांक ५ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरी पेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. दिनांक ६ ऑगस्ट रोजी नांदेड, हिंगोली, परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने पाऊस झाल्यानंतर शेतात साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
कापूस, (Cotton) तूर, मूग, उडीद, मका (Maize), सोयाबीन (Soybean), भुईमूग, भाजीपाला आणि फळपिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. पावसाची उघडीप असतानाच पिकावर किडनाशकाची फवारणी करावी. यासोबतच इतर पीक व्यवस्थापनासाठी परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने पुढील सल्ला दिला आहे.
बागायती कपाशीसाठी प्रति हेक्टरी नत्र खताची दूसरी मात्रा ६० किलो तर कोरडवाहू कपाशीसाठी ३६ किलो द्यावी. १०० ग्रॅम १९:१९:१९ किंवा यूरिया २०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रसशोषण करणाऱ्या म्हणजेच मावा, तुडतुडे यासारख्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास व्यवस्थापनासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा र्व्हीटीसीलीयम लेकॅनी ४० ग्रॅम किंवा ॲसिटामाप्रिड (२० टक्के) ६० ग्रॅम किंवा डायमिथोएट (३० टक्के) २६० मिली प्रति एकर फवारणी करावी.
मूग आणि उडीद पिकात मावा किडीचा प्रादुर्भाव झाल्यास व्यवस्थापनासाठी डायमिथोएट १३ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मका पिकाची पेरणी करून एक महिना झाला असल्यास प्रति हेक्टरी ७५ किलो नत्र खताची मात्रा द्यावी.
कसे कराल फळपिकांचे व्यवस्थापन
- केळी, द्राक्ष, सीताफळ बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. नविन लागवड केलेल्या केळी बागेत १३:००:४५ २०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- सिताफळ बागेत पिठया ढेकूण किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास निंबोळी तेल ५० मिली किंवा व्हर्टिसीलीयम लेकॅनी या जैविक बुरशी ची ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
भाजीपाला पिके
मिरची, वांगी आणि भेंडी पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन (५ टक्के) + फेनप्रोपाथ्रीन (१५ टक्के) १० मीली किंवा डायमेथोएट (३० टक्के) १३ मीली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.
पशुधन व्यवस्थापन
पावसाळ्यात जनावरांसाठी मोठ्या प्रमाणात हिरवे गवत उपलब्ध असते. कुरणावर चरताना जनावरांच्या खाण्यात विषारी वनस्पती उदा. निळी फुली, माठ किंवा काटेमाठ खाण्यामध्ये आल्यास विषबाधा होते. माठ/काटेमाठ खाण्यात आल्यास त्यातील नायट्रेटची विषबाधा होऊन श्वसन संस्थेवर परिणाम होऊन जनावर दगाऊ शकते. निळीफुली ही वनस्पती जनावरांनी खाल्ल्यास किडणीवर परिणाम होतो म्हणून अशा वनस्पती जनावरांच्या खाण्यात येणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.