
Seed Bank : सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या कडधान्ये आणि भाजीपाल्याच्या देशी बियाणांच्या विक्रीतून (Desi Seed Bank) मसला खुर्द (ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) येथील कृषिसखी मंडळ या महिला बचत गटाने (Women's self-help group) देशी बियाणे बँक तयार केली आहे.
देशी बियाण्यांच्या संवर्धन आणि प्रसाराबरोबरच त्यांनी बियाण्यांच्या उत्पादनात चांगलाच हातखंडा निर्माण केला आहे. त्यांच्या या प्रयत्नांना उमेद अभियान आणि तुळजापूरच्या कृषी विज्ञान केंद्राची साथ मिळाल्याने आज उस्मानाबादच नव्हे, तर राज्यातील विविध भागांत त्यांच्या देशी बियाण्यांचा लौकिक वाढला आहे.
सोलापूर-तुळजापूर महामार्गावर सांगवी (मार्डी) गावापासून आत चार किलोमीटरवर मसला खुर्द हे गाव आहे. या गावात भाजीपाला आणि फळपिकांकडे शेतकऱ्यांचा ओढा अधिक आहे.
विशेषतः भेंडी, सिमला मिरची, हिरवी मिरची यासह खरबूज, कलिंगड, द्राक्ष यांसारखी पिके या भागात दिसतात. साधारण २००९ मध्ये गावामध्ये ‘स्वयंम शिक्षण प्रयोग’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी विविध व्यावसायिक प्रशिक्षणासह अन्य उपक्रम सुरू झाले.
या गावातील महिला शेतकरी सौ. शैलजा नरवडे यांनी काही महिलांना एकत्रित करत सहभाग घेतला. त्यानंतर स्वतःबरोबर त्यांनी अन्य महिलांचाही आत्मविश्वास वाढवला. त्यातूनच सौ. नरवडे यांनी कृषिसखी मंडळ हा वीस महिलांचा बचत गट स्थापन केला.
त्या स्वतः अध्यक्ष झाल्या, तर पार्वती नरवडे सचिव आणि जयश्री नरवडे, सीना भालेकर, अनिता खानापुरे, संगीता खानापुरे, छाया खराडे, उज्वला इंगळे, लक्ष्मी झाडबुके, मनीषा ठोंबरे, मनीषा इंगळे, इंदूबाई खराडे, सुरेखा घाडगे, साराबी सय्यद, कविता नरवडे, मनीषा नरवडे, प्रियांका नरवडे, इर्शाद सय्यद, सारिका नरवडे, श्यामल गौड या अन्य महिलांचा त्यात समावेश केला.
महिला गटाने बचत आणि छोटे-छोटे व्यवसाय करत त्यांची प्रगती सुरू झाली. २०१० च्या दरम्यान महिला गटाचा तुळजापूर येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांशी संपर्क झाला. कृषी विज्ञान केंद्राच्या विषय विशेषज्ञ सौ. वर्षा मरिवाळीकर यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले.
याचबरोबरीने ‘उमेद’ अभियानच्या प्रांजल शिंदे, अभिजित पांढरे, गुरू भांगे, कृषी विभागाचे महेश तीर्थकर, शिंदे, स्वयंम शिक्षण प्रयोगाच्या नसीम शेख यांनी महिला गटाला मदत केली. आज देशी बियाणे उत्पादक म्हणून कृषिसखीचा स्वतंत्र ब्रॅण्ड तयार झाला आहे.
प्रामुख्याने सेंद्रिय पद्धतीने देशी बियाणे संवर्धन हा या संकल्पनेचा उद्देश असल्याने बियाणे उत्पादनासाठी गटातील प्रत्येक महिलेला काही पिके ठरवून दिलेली आहेत. त्याप्रमाणे वर्षभर सेंद्रिय पद्धतीचे ३३ प्रकारचे देशी बियाणे तयार केली जातात.
त्यानंतर त्या बियाण्यांची गटाकडून एकत्रित खरेदी केली जाते. बाजारातील दरानुसार विक्री केली जाते.
त्यानंतर पुढे सर्व बियाण्यांची पॅकिंग, ब्रॅण्डिंग सर्व महिला मिळून करतात, त्यानंतर गटामार्फत त्याची विक्री झाल्यानंतर त्यातील नफाही पुन्हा याच महिलांमध्ये वाटून घेतला जातो. सुरुवातीला ५० क्विंटलपासून सुरुवात झालेल्या बियाण्यांची विक्री आज तीन टनांपर्यंत पोहोचली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.