Organic Fertilizer : सेंद्रिय खतासाठी ताग लागवड फायदेशीर

जमिनीतील सेंद्रिय खतांचे (Organic Fertilizer) प्रमाण कायम ठेवण्यासाठी तागाचे पीक (Jute Cultivation) गाडणे गरजेचे आहे. कमी कालावधीत जलद वाढणारे आणि भरपूर पाला देणारे हे पीक आहे. तसेच द्विदल वर्गातील असल्याने वातावरणातील नत्र कमी कालावधीत घेण्याची क्षमता या पिकात असल्याने नत्र जमिनीत स्थिर होण्यास मदत होते.
Jute Cultivation
Jute CultivationAgrowon

आडसाली उसाचे (Sugarcane Production) एकरी १०० ते १२५ टन उत्पादन घेण्यासाठी जमिनीमध्ये वरच्या एक फुटात सेंद्रिय कर्बाचे (Organic Carbon) प्रमाण १ टक्क्यापेक्षा जास्त असावे. अशा जमिनीची सेंद्रिय खतामुळे सुपीकता (Soil Fertility) वाढवून जमिनीतील सूक्ष्म जिवाणूंची संख्या वाढते. जिवाणू कार्यक्षम राहण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा पुरवठा आणि सेंद्रिय कर्बाचे हे प्रमाण राखता आले पाहिजे. ऊस लागवड करताना अगोदरच्या उसाचे हेक्टरी ७.५ ते १० टन पाचट जमिनीत कट्टी करून गाडावे. पाचटाच्या माध्यमातून हेक्टरी ३ ते ४ हजार किलो सेंद्रिय कर्ब उपलब्ध होतो. आपला प्रदेश उष्ण कटिबंधात असल्याने जे काही सेंद्रिय पदार्थ जमिनीत आहेत त्याचे विघटन होण्याचा वेग जास्त आहे. त्यामुळे सेंद्रिय कर्बाचाही ऱ्हास होतो. हे प्रमाण कायम ठेवणे किंवा वाढविण्यासाठी लवकर कुजणारे, मध्यम वेळ घेणारे आणि उशिरा कुजणारी सेंद्रिय खत वापरल्यास कर्बाचे प्रमाण शाश्‍वत ठेवता येते.

शेणखताऐवजी ऊस लागण करण्यापूर्वी ३ महिने अगोदर हिरवळीचे पीक म्हणून तागाची लागवड केल्यास हेक्टरी २५ ते ३० टन बायोमास मिळतो. दीड महिन्यात ताग ७ फूट उंचीपेक्षा जास्त वाढतो. हा ताग गाडल्यानंतर त्यापासून हेक्टरी १२५ ते १३५ किलो नत्राची मात्रा मिळू शकते. म्हणजेच शेणखताला पूरक पर्याय आपल्याकडे आहे. ऊस उत्पादन वाढीमध्ये जमिनीतील सेंद्रिय कर्ब आणि सुपीकतेचा मोठा वाटा आहे. ज्यामुळे जैविक, भौतिक आणि रासायनिक गुणधर्म बदलेले आहेत. ऊस संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर गेली चार वर्षे ताग पिकानंतर २५ हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड करून खताचा हप्ता २५ टक्क्यांनी कमी करून अपेक्षित ऊस उत्पादन मिळाले आहे.

जमीन घट्ट होण्याची कारणे ः

१) सातत्याने ऊस लागवड केल्याने जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण आणि उपलब्ध पालाशचे प्रमाण कमी होऊन जमिनीचा पोत ढासळत आहे.

२) पाण्याच्या अनिर्बंध वापरामुळे जमिनी क्षारयुक्त व कठीण बनत चालल्या आहेत. या जमिनीत उसाची मुळे खोलवर जाण्यास अडथळे येतात. ही मुळे वरच्या थरात राहिल्याने ऊस पडण्याचे प्रमाण वाढते. जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मांवर अनिष्ट परिणाम होऊन ऊस उत्पादन कमी होऊ लागले आहे.

३) उसाचे क्षेत्र ओले असताना त्याची यंत्राच्या साह्याने तोडणी आणि ऊस वाहतूक होत असल्याने जमिनी घट्ट होत आहेत. माती घट्ट झाल्याने मुळांच्या वाढीवर परिणाम होतो. त्यामुळे पुरेसे अन्नद्रव्य न मिळाल्याने उसाला अपेक्षित फूट न झाल्याने ऊस संख्या कमी होते.

४) सातत्याने ऊस लागवड आणि रासायनिक खतांचा अमर्यादित वापर होत असल्याने जमिनीचा पोत ढासळत आहे. जमिनीचा पोत सुधारल्याशिवाय उसाला अपेक्षित फुटवा फुटत नाही. ऊस पिकाची अन्नद्रव्यांची गरज मोठी आहे. त्याकरिता जमिनीच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

हिरवळीच्या खतासाठी ताग फायदेशीर ः

१) सेंद्रिय खतासाठी शेणखत, हिरवळीचे खत, गांडुळ खत, प्रेसमड कंपोस्ट खत, पाचट कंपोस्ट, कोंबडी खत, लेंडी खत, पेंडी वापरणे आणि शेतात शेळी, मेंढी बसविणे असे पर्याय आहेत. या सर्वांमध्ये अत्यावश्यक अन्नद्रव्याने संपन्न असलेला तागाचा हिरवळीच्या खतासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.

२) जमिनीतील सेंद्रिय खतांचे प्रमाण कायम ठेवण्यासाठी तागाचे पीक गाडणे गरजेचे आहे. गेली चार वर्षे मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव या ठिकाणी उसाच्या अगोदर तागाचे पीक घेतल्याने

हमखास उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. कमी कालावधीत जलद वाढणारे आणि भरपूर पाला देणारे पीक आहे. द्विदल वर्गातील असल्याने वातावरणातील नत्र कमी कालावधीत घेण्याची क्षमता या पिकात असल्याने नत्र जमिनीत स्थिर होण्यास मदत होते.

३) तागाच्या फांद्या कोवळ्या आणि लुसलुशीत असल्याने, तंतुमय पदार्थांचे प्रमाण कमी असल्याने कुजण्याची प्रक्रिया जलद होते. पिकांची मुळे खोलवर जात असल्याने जमिनीच्या खालच्या थरातील अन्नद्रव्य शोषून घेतली जातात आणि पीक गाडल्यानंतर वरच्या थरात मिसळली जातात.

४) दीड महिन्याच्या कालावधीत विशेषतः नत्रयुक्त अन्नद्रव्य उपलब्ध होतात. उसाच्या पिकाला फुटवे फुटणे व वाढीच्या काळात हमखास हे अन्नद्रव्य उपयोगी ठरते. जास्तीत जास्त अन्नद्रव्य थोडयाच कालावधीत तागानंतरच्या पिकाला उपलब्ध होते. त्याकरिता आडसाली ऊस घेण्यापूर्वी जमिनीमध्ये हिरवळीचे खतासाठी तागाचे पीक घ्यावे.

५) तागाच्या पिकापासून हेक्टरी ३० टनांपेक्षा जास्त बायोमास मिळत असल्याने त्याच्यासाठी विशेष उत्पादन तंत्र वापरण्याची गरज नाही. जमिनीतील अन्नद्रव्य, हयुमस, फल्वीक अ‍ॅसीड, सेंद्रिय कर्ब आणि नत्र वाढविण्यासाठी तागाचा फायदा होतो. याचबरोबरीने कर्बाचे प्रमाण राखण्यासाठी निंबोळी पेंड, पीक फेरपालट, आंतरपीक, जमिनीत ओलावा आणि सेंद्रिय खते उपयुक्त ठरत आहेत.

तागाची लागवड ः

१) रोटाव्हेटरने पाचटाची कुट्टी केल्यानंतर त्याला पाणी द्यावे. तसेच जिवाणू खते वापरून पाचट कुजवून घ्यावे. त्यानंतर जमिनीत रोटाव्हेटरने मिसळून द्यावे. त्यानंतर ताग पेरावा. पाण्याचा तुटवडा असल्यास मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी करून सुरुवातीच्या पावसाळ्याचा उगवणीला फायदा होतो.

२) पेरणीसाठी एकरी २५ ते ३० किलो बियाणे वापरावे. फोकून देण्यासाठी २५ टक्के बियाणे जास्त लागते. फोकून दिल्यानंतर फणपाळीने झाकून द्यावे आणि पावसाच्या ओलीवर वाढवून द्यावे. हलक्या व मध्यम जमिनीत उसासाठी सरी पाडून सरीच्या दोन्ही बाजूंना तागाची पेरणी करतात आणि हा ताग नंतर गाडून सरीचा वरंबा आणि वरंब्याची सरी केली जाते.

Jute Cultivation
ताग पॅकिंगचा  नियम कागदावरच

ताग गाडण्याचे तंत्र ः

१) तागाचे पीक पेरणीनंतर पावसाळ्यात ५५ दिवसांनी, हिवाळ्यात ६० दिवसांनी आणि उन्हाळ्यात ६५ दिवसांनी गाडावे. माती आड करणे, मातीने झाकून जाईल एवढ्याच खोलीवर गाडणे त्यामुळे विघटनाची प्रक्रिया लवकर सुरू होते आणि पिकातील अन्नद्रव्य तत्काळ उसाला उपलब्ध होतात.

२) गाडल्यानंतर पाऊस झाल्यास १५ दिवसांत ताग कुजून जातो. अपरिपक्व ताग कितीही खोल गाडला तरी कुजतो. परंतु गाडण्यास उशीर झाल्यास त्या तागाला कमी खोलीवरच गाडले पाहिजे. कोरडे हवामान असल्यास जास्त खोल गाडावे. ओलावा कमी असल्यास ताग गाडण्यापूर्वी १५ दिवस अगोदर पाणी द्यावे. हलक्या व मध्यम जमिनीत खोल गाडावे, खोल जमिनीत वरचेवर गाडावे.

३) फुले दिसण्याच्या अवस्थेत पिकामध्ये नत्राचे प्रमाण, प्रथिने आणि विद्राव्य पदार्थ अधिक असतात. पिकाच्या वाढीबरोबर नत्राची उपलब्धता ६० दिवसापर्यंत उच्च पातळीवर असते. त्यानंतर तागाच्या पिकातील नत्राचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे.

४) योग्य वेळी गाडल्यास सेंद्रिय पदार्थ आणि नत्र अधिक उपलब्ध होतो. तागाचे पीक हिरवे लुसलुशीत असताना किंवा फुले दिसताच ६ ते ८ आठवड्यांत शेतात मूलस्थानी नांगरटीद्वारे गाडावा. गाडल्यानंतर कुजण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा. गाडण्यास उशीर झाल्यास कुजण्याची प्रक्रिया विलंबाने होते. कुजण्यासाठी पुरेसा ओलावा आणि तापमान असल्यास ३ ते ४ आठवड्यांत कुजण्याची प्रक्रिया पूर्ण होते.

५) हिरवळीचे पीक ऊस घेण्यापूर्वी १.५ महिना अगोदर जमिनीत गाडावे. साधारणपणे ३० टन सेंद्रिय ताग २ महिन्यांत उपलब्ध होतो.

६) उसाबरोबर पेरलेले तागाचे पीक बाळबांधणीच्या वेळी जमिनीत गाडावे. कोरड्या जमिनीत हलके पाणी देऊन वाफसा आल्याबरोबर हिरवळीचे पीक नांगराच्या साह्याने जमिनीत गाडावे. पीक नांगरताना गाडण्याची खोली १० ते १५ सें.मी. असावी.

Jute Cultivation
ताग मिल बंद का पडत आहेत?

उशिरा ताग गाडण्याचा परिणाम ः

१) गाडण्यास १५ ते २० दिवसांचा उशीर झाल्यास तागाच्या पिकातील तंतुमय पदार्थ, कठीण तंतुमय धागे, काष्ट तंतू, कार्बन ः नत्र प्रमाण वाढते. नत्राचे प्रमाण कमी होते. पेशीभित्तिकेच्या मजबुतीमुळे ताग कुजण्यास विलंब होतो. तंतुमय पदार्थ विघटन करण्यास सूक्ष्मजीवांना कठीण जाते आणि कुजण्यास विलंब होतो.

२) उशिरा ताग गाडल्यास कार्बन वाढत असला तरी त्याबरोबर नत्र कमी होत जातो. त्यामुळे या वाढलेल्या कर्बाचा कुजण्यासाठी आणि नंतरच्या उसाच्या पिकाला अपेक्षित फायदा होत नाही. उशिरा ताग गाडल्याने पॉलीफिनॉल रसायनाचे प्रमाण वाढल्याने जिवाणूंच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. त्याचप्रमाणे धाग्यांची संख्या आणि प्रमाण वाढल्याने खत म्हणून फायदा कमी होतो.

३) ज्या जमिनीत कॅल्शिअम आणि पोटॅश कमी आहे, त्या ठिकाणी तागाचे पीक ६० दिवसांत गाडावे.

ताग गाडल्याचे फायदे ः

१) सेंद्रिय पदार्थ, अन्नद्रव्यात वाढ ः

१) हिरवळीच्या खतासाठी ताग घेतल्याने जमिनीतील सेंद्रिय पदार्थ आणि अत्यावश्यक अन्नद्रव्यांमध्ये वाढ होत आहे. जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण आणि सूक्ष्म जिवाणूंची संख्या वाढून कार्यक्षमता वाढते.

२) तागाच्या पिकाच्या मुळावरील गाठीमध्ये असलेले रायझोबियम जिवाणू हवेतील नायट्रोजन घेतात. नंतरच्या पिकाला जिवाणू नत्र हे नायट्रेट आणि अमोनियमच्या अवस्थेत उपलब्ध करून देतात. उसाच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळात नायट्रेट-नायट्रोजनचा वापर जास्त होतो.

३) तागाचे पीक जमिनीतील खालच्या थरातील अन्नद्रव्य शोषून घेते. पीक गाडल्यानंतर वरच्या थरात ही अन्नद्रव्ये मिसळतात. ही उसाला उपलब्ध होतात.

४) जमिनीचे भौतिक व जैविक गुणधर्म टिकवण्यासाठी ऊस घेण्यापूर्वी तागाचे पीक जमिनीत गाडल्याने रासायनिक खतांची सुद्धा उपलब्धता वाढल्याचे दिसून आले. सेंद्रिय पदार्थामुळे सूक्ष्म जिवाणू, गांडुळे, विकरे व सेंद्रिय आम्ले यांचे जमिनीतील प्रमाण वाढल्याने उसाची चांगली वाढ होते. नत्रयुक्त खतांचे स्थिरीकरण झाल्याने निचऱ्यावाटे ऱ्हास होण्याचे प्रमाण कमी होते.

हिरवळीच्या पिकामधून सेंद्रिय खताची उपलब्धता

हिरवळीचे पीक ----शुष्क तागामध्ये अन्नद्रव्यांचे प्रमाण (टक्के) ---हेक्टरी तागाचे उत्पादन टन ---हेक्टरी उपलब्ध होणारा नत्र

------------नत्र ---स्फुरद ---पालाश ------ ओला --- वाळलेला

ताग ---२.३० ---०.५० ---१.८० ---३०.६ ---५.८१४ ---१३४

धैंचा ---३.५० ---०.६० ---१.२० ---२३.२ ---३.७१२ ---१३०

२) सेंद्रिय कर्ब ः

१) हिरवळीच्या खतामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.१० पासून १.४० टक्क्यांपर्यंत वाढल्याचे आढळून आले आहेत. सेंद्रिय पदार्थाच्या एकूण वजनाच्या ५८ ते ६० टक्के सेंद्रिय कर्ब मिळतो. उरलेल्या ४० टक्क्यांमध्ये इतर अत्यावश्यक अन्नद्रव्ये मिळतात.

२) जमिनीत १ टक्का कार्बनसाठी १ हेक्टर जमिनीत वरच्या १ फुटात ४२ टन सेंद्रिय कर्ब असला पाहिजे. त्यासाठी ७२ टन सेंद्रिय पदार्थ वेगवेगळ्या सेंद्रिय खतांच्या माध्यमातून जमिनीमध्ये ऊस लागवडीपूर्वी मिसळून देणे आवश्यक आहे.

३) मातीची रचना ः

१) ताग कुजण्याच्या प्रक्रियेत आम्ल वाढल्याने मातीच्या कणांची रचना व जडण-घडण, बदलून हे कण एकमेकांना चिकटून राहतात. त्यामुळे जमिनीत हवेची सच्छिद्रता वाढते. माती कणांची रचना बदलून जमिनीतील हवेचे प्रमाण आणि निचरा वाढल्याचे दिसून आले आहे. मातीच्या रचनेत सुयोग्य बदल होतात. जमिनीत हवा खेळती राहिल्याने हवेचे प्रमाण आणि पाण्याचे प्रमाण १७ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले. समस्यायुक्त जमिनीचा सामू सुद्धा कमी झाला.

२) अन्नद्रव्यांची उपलब्धता व सेंद्रिय कर्बाची पातळी वाढल्याने तागानंतरच्या ऊस संख्येत आणि उत्पादनात हमखास वाढ झाल्याचे दिसून आले. जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता वाढते.

३) सेंद्रिय खत वापरल्यास शेतात गांडुळांची नैसर्गिकरीत्या मोठ्या प्रमाणात वाढ होते. मातीच्या रचनेत बदल झाल्याने जमिनीत हवेचे प्रमाण वाढून उसाच्या मुळ्या खोलवर शिरतात. त्यामुळे ऊस पिकाला पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता तयार होते. मुळ्या खोलवर गेल्याने ऊस पडण्याचे प्रमाण कमी होते.

४) भौतिक गुणधर्मात बदल ः

१) पाणी मुरण्याचा वेग वाढतो. धूप कमी होते, जमिनीत तागामुळे हयुमस वाढल्याने त्याच्या वजनाच्या ९० टक्के पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. विशेषतः मध्यम जमिनीमध्ये हा अनुभव स्पष्टपणे दिसून येतो. जमिनीतील पाणी मुरण्याचा वेग तासाला २.८ सेंमी. वरून ३.९ सेंमी., जमिनीतील पाणी धारणक्षमता हेक्टरी ५.५ सेंमी. आणि द्रावक वाहकता तासाला १.० सेंमी. वाढली आहे.

२) मातीच्या कणांची रचना ५.४० टक्क्याने वाढली आहे. जमिनीची घनता १५.२६ टक्क्याने कमी झाल्याचे दिसून आले. जमिनीतील ऑक्सिजन पातळी वाढल्याने स्फुरद, पालाश आणि गंधक ही अन्नद्रव्ये ऊस पिकाला ग्रहण करता येतात.

५) रासायनिक गुणधर्मात बदल ः

१) रासायनिक खतांबरोबर हिरवळीच्या खताच्या वापरामुळे उसामध्ये नत्र, स्फुरद, पालाश अन्नद्रव्य घेण्याची प्रक्रिया ऊस पानांमध्ये वाढल्याचे आढळून आले आहे. त्याचबरोबर एकूण नत्र, स्फुरद, पालाश आणि गंधक उपलब्ध होतो. त्याचबरोबर दुय्यम अन्नद्रव्य कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम वाढत असल्याचे आढळून आले आहे.

२) सूक्ष्म अन्नद्रव्यात लोह वाढल्याचे दिसून आले. उसाला नियमितपणे वाढीच्या काळात नत्राचा पुरवठा होतो. फॉस्फरस अन्नद्रव्याचा वापर ३९ टक्क्यांनी वाढला आहे.

६) जैविक गुणधर्मात वाढ ः

१) जमिनीतील जिवाणू आणि सूक्ष्मजीवांना अन्नद्रव्यांची उपलब्धता होते. जिवाणूंची संख्या तागाचे पीक मातीआड केल्याबरोबर वाढत जाते. सेंद्रिय खाद्य मिळाल्याने त्यांची संख्या आणि कार्यक्षमता वाढते. सेंद्रिय व रासायनिक खते पिकास उपलब्ध करून देण्याचे काम जिवाणू करतात. या तंत्राने जमीन सुपीक होते. जमिनीतील अन्नद्रव्य पिकाला घेता येतील अशा अवस्थेत बदल करण्याचे काम जिवाणू करतात.

२) मायकोरायझा बुरशीचा संख्येत वाढ झाल्याने मातीचे कण चिकटून राहतात. जमिनीतील जिवाणूंची संख्या वाढल्याने रासायनिक खते, कीडनाशकांच्या अवशेषांचा परिणाम कमी जाणवला. जमिनीद्वारे प्रसारित होणाऱ्या रोगांचे प्रमाण कमी होऊन उसामध्ये रोग प्रतिकारक्षमता वाढत आहे.

७) नत्र स्थिरीकरण ः

१) रासायनिक खतावाटे दिलेल्या नत्र निचऱ्याद्वारे वाहून जातो. पण तागामुळे उपलब्ध झालेले नत्र मातीच्या कणांना घट्ट धरून राहतो. तागाचे पीक हिरवळीच्या खतासाठी घेतल्याने नत्राचे स्थिरीकरण होते. २) सुरवातीच्या ऊस वाढीच्या काळात विशेषतः ऊस ३ ते ६ महिन्याचे असताना नत्राचा जवळपास ४० ते ६० टक्के पुरेपूर वापर झाल्याने उसाला चांगले फुटवे फुटून संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले.

३) हिरवळीची पिके नत्र खताला चांगला पर्याय ठरू पाहत आहे. कार्बनःनत्र प्रमाण कमी असल्याने (१६ः१) जैविक प्रक्रियेमुळे नत्राचा रासायनिक खतांसारखा फायदा होतो. त्यामुळे तागाची कुजण्याची प्रक्रिया लवकर होते आणि त्यातील नत्र, स्फुरद आणि पालाश यांचा पुनर्वापर होतो. अन्नद्रव्यांचा निचरा होण्यास प्रतिबंध होत आहे. हिरवळीचे खत वापरल्याने जमिनीत नत्राचे स्थिरीकरण झाले. त्यामुळे उसाला तुरा येण्याचे प्रमाण कमी झाले.

८) तणनियंत्रण ः

१) हिरवळीच्या पिकांद्वारे वाढीच्या अवस्थेत आणि कुजण्याच्या प्रक्रियेत विशिष्ट रसायने जमिनीत सोडली जातात. त्यामुळे तणांच्या उगवणीवर परिणाम होऊन त्यांचे नैसर्गिकरीत्या नियंत्रण होते.

२) या तंत्राने पाडेगाव संशोधन केंद्रातील ५० एकर क्षेत्रातील हरळी व लव्हाळा पिकाचे नियंत्रण करणे नैसर्गिकरीत्या शक्य झाले. जमिनीद्वारे प्रसारित होणाऱ्या रोगांचे प्रमाण कमी होऊन उसामध्ये रोग प्रतिकारक्षमता वाढत असल्याचे आढळून आले.

९) क्षारयुक्त जमिनीवर परिणाम ः

१) समस्यायुक्त जमिनीचा सामू कमी होतो. अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. सेंद्रिय कर्बाची वृद्धी होते. ऊस लागवड, ईएसपी १५ टक्क्यांपेक्षा कमी, क्षारांचे प्रमाण मीटरमध्ये १.१ डेसीसायमन पेक्षा कमी, पाण्यातील ईसी ०.५ पेक्षा कमी झाल्याने उत्पादनात घट होत नाही.

२) पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण जास्त असल्यास उसाला पुरेसे पाणी आणि अन्नद्रव्य घेण्यास अडथळा निर्माण होतो. त्याचप्रमाणे सोडियमचे प्रमाण जास्त असल्यास पोटॅश आणि मॅग्नेशिअम अत्यंत कमी उपलब्ध होतात. जमिनीचा सामू ८ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास ऊस वाढ आणि फुटव्यांवर परिणाम होतो.

तागाचे उत्पादन ः

१) ताग गाडल्यानंतर दुसरे पीक ३५ ते ४५ दिवसांनी घ्यावे. कुजण्यासाठी ४ ते ६ आठवडे लागतात. गाडण्यास उशीर केल्यास कुजण्यास वेळ लागतो. कुजण्याची प्रक्रिया प्रामुख्याने हवामान आणि पीक अवस्थेवर अवलंबून असते.

२) साधारणपणे ३० टनांपर्यंत सेंद्रिय खत तागामुळे उपलब्ध होतात. त्याचप्रमाणे १३४ किलोपर्यंत नत्र, २० ते २५ किलो स्फुरद आणि ४० ते ६५ किलो पालाश या अन्नद्रव्यांची भर पडते.

३) ऊस पिकात तागाचे पीक आंतरपीक म्हणून घेतल्यास उत्पादनामध्ये ८ टनांनी वाढ होते. जलदगतीने वाढणारे, कडधान्याच्या गटातील, कमी कालावधीचे, हे पीक सेंद्रिय खतासाठी वापरणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.

फेरपालटीनंतर ऊस उत्पादन ः

१) हिरवळीच्या खताच्या वापराने ऊस उत्पादनात ५७ टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली. शेणखतासाठी लागणारा हेक्टरी एक लाख रुपयांचा खर्च वाचतो.

२) ऊस फुटवा, उंची आणि हिरवेगारपणा वाढतो. हिरवळीच्या खताच्या वापराने ऊस उत्पादनात ५७ टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली आहे.

३) उसाच्या एकरी १०० ते १२५ टन अधिक उत्पादनासाठी जमिनीत हिरवळीचे खत, प्रेसमड किंवा पाचट कंपोस्ट आणि गांडूळ खत हे १ः१: ०.५ या प्रमाणात मिसळल्यास कार्बनचा साठा वाढणार आहे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते.

संपर्क ः डॉ. भरत रासकर, ८७८८१०१३६७

(ऊस विशेषज्ञ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com