विविध अवस्थेतील द्राक्ष बागांचे व्यवस्थापन

गेल्या आठवड्यात काही ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस झाला, तर काही ठिकाणी तापमानात पुन्हा वाढ झाल्याचे दिसून येते. सध्या आपल्याकडे रिकटनंतरच्या बागा, खुंट लागवड, खरडछाटणी झालेल्या बागा अशा विविध अवस्थेतील बागा आहेत. या बागेतील व्यवस्थापन करण्याविषयी माहिती घेऊ.
Grape Farming
Grape FarmingAgrowon

१) रिकटनंतरची बाग ः

या बागेमध्ये पूर्वी झालेल्या पावसाचा परिणाम नवीन फुटीच्या वाढीवर दिसून येईल. नुकत्याच झालेल्या पावसामुळे दोन ओळींमधील जागेत पाणी साचले असेल. या भागात ओलावा राहिल्यामुळे बऱ्याच काळापर्यंत वापरात न आलेली अन्नद्रव्ये या वेळी वेलीकडून वापरली जातील. या पावसामुळे जमिनीत खोलपर्यंत पाणी गेलेले असल्यास या वेळी या भागात नवी पांढरी मुळे तयार होतील. ही कार्यक्षम मुळे संजीवकांची निर्मिती करून वेलीला फुटीच्या शेंड्यापर्यंत पुरवठा करतात. परिणामी वेलीत जिबरेलीन्सचे प्रमाण वाढण्यास मदत होते. याचाच अर्थ जास्त पाऊस झालेल्या बागेत वाढीचा जोम जास्त दिसून येतो.

रिकटनंतरच्या बागेत अशा परिस्थितीत सूक्ष्म घड निर्मितीच्या अनुषंगाने वाढ नियंत्रणात ठेवणे तितकेच महत्त्वाचे असते. ज्या बागेत ओलांड्याचा पहिला टप्पा तयार झालेला आहे, त्या ओलांड्यावर काही काड्याही तयार झालेल्या आहेत. (सबकेननंतर सात आठ पाने तयार झालेली असतील.) अशा बागेत याच परिस्थितीचा फायदा घेऊन ओलांड्याचा दुसरा टप्पा तयार करण्यास सुरुवात करता येईल. यासाठी पहिल्या टप्प्यातील तयार झालेल्या काडीवरील शेंडा वाढताना दिसत असल्यास पिंचिंग करून घ्यावे. त्याच सोबत सूक्ष्म घड निर्मितीसाठी आवश्यक संजीवकांची (६ बीए आणि युरासील) फवारणी करावी. ओलांड्याचा दुसरा टप्पा तयार करण्यासाठी शेवटची फूट तारेवर बांधून घ्यावी. या वेळी वातावरणात आर्द्रता जास्त वाढलेली असल्यामुळे ही फूट जोमात वाढेल. तेव्हा पाच ते सहा पानांवर शेंडा खुडून मागील बगलफुटी वाढू द्याव्यात. त्या फुटी चार ते पाच पानांच्या झाल्यावर पुन्हा एकदा खुडून घ्याव्यात. या ठिकाणी सूक्ष्म घड निर्मितीला आवश्यक अशा स्फुरदयुक्त खतांचा वापर तितकाच महत्त्वाचा असेल. ०-५२-३४, ०-९-४६, ०-४०-३७ यांसारख्या खतांचा वापर फायद्याचा राहील. पाऊस न झालेल्या ठिकाणी तापमान वाढलेले असून, आर्द्रताही कमी झाली असेल. परिणामी फुटींची वाढ कमी होईल. अशा बागेत नत्र आणि स्फुरदयुक्त खत (उदा. १२-६१-०) वापरता येईल.

२) खुंट लागवड ः

खुंट लागवड झालेल्या ठिकाणी पाऊस झालेला असल्यास खुंटाची वाढ जोमात होताना दिसेल. रोपाची व्यवस्थित वाढ म्हणजेच वरील कॅनॉपी मिळण्यासाठी मुळांचा विकासही तितकाच महत्त्वाचा असेल. यालाच इंग्रजीमध्ये ‘रूट टू शूट रेशो’ असे म्हटले जाते. सध्याच्या परिस्थितीचा विचार करता या बागेत मुळांचा विकास चांगला होण्याची शक्यता आहे. त्यासाठी नत्र आणि स्फुरदयुक्त खतांचा वापर फायद्याचा राहील.

ज्या भागात पाऊस झालेला नाही, अशा ठिकाणी खुंट रोपाची वाढ नियंत्रणात दिसून येईल. पुरेसे पाणी असलेल्या स्थितीमध्ये ठिबकचे पाणी पडत असलेल्या जागेपासून साधारण एक फूट रुंद ओलावा टिकेल असे पाणी द्यावे. पाण्याचा तुटवडा असलेल्या बागेत एकतर सकाळी किंवा सायंकाळी पाणी द्यावे. ठिबकच्या खाली पाणी पडणाऱ्या ठिकाणी गवत किंवा उसाचे पाचटाचे आच्छादन करून घ्यावे. यामुळे बाष्पीभवनाद्वारे पाणी निघून जाणे रोखता येईल.

३) खरडछाटणी झालेल्या बागा ः

नुकत्याच झालेल्या पावसामुळे या बागेत फुटीच्या वाढीवर चांगले परिणाम दिसतील. तीन ते चार पाने असलेल्या बागेमध्ये पाऊस झालेला असल्यास आता पुढील तीन चार दिवसांत फुटीच्या विरळणीची अवस्था येईल. या वेळी तीन ते चार दिवस पाण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असेल. जास्त पाऊस झालेला असल्यास बागेत वाफसा जास्त काळ (७ ते ८ दिवस) टिकून राहील. अशा बागेत फक्त खते देण्यापुरते पाणी द्यावे. एक वर्षे जुनी बाग असल्यास या नवीन फुटीवर पाने पिवळी पडताना दिसून येतील. फेरस व मॅग्नेशिअमच्या कमतरतेमुळे अशा परिस्थिती निर्माण होईल. यासाठी फेरस सल्फेट एक ग्रॅम प्रति लिटर पाणी व मॅग्नेशिअम सल्फेट दीड ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी.

सबकेन अवस्थेतील बागेत पाऊस झालेला असल्यास सबकेनकरिता शेंडा लवकर मारून घ्यावा. या नंतर बगलफुटीसुद्धा तितक्याच जोमात वाढताना दिसून येतील. जमिनीत पाण्याचा ओलावा आठ दिवसांपर्यंत टिकून राहिल्यास बगलफुटीवर सात पानांच्या होताच पाच पानांवर थांबवाव्यात. या वेळी मात्र स्फुरद आणि पालाशयुक्त खते व संजीवकांची फवारणी महत्त्वाची असेल. वेलीचा जोम पाहून काही फक्त पालाशयुक्त खतांचा वापर फवारणी व जमिनीद्वारे करावा.

सबकेनच्या पुढे गेलेल्या बागेत या वेळी काडी तळातून दुधाळ रंगाची होण्यास सुरुवात झाली असेल. अशा स्थितीमध्ये पाणी नियंत्रणात ठेवून पालाशयुक्त खतांचा वापर केल्यास काडीची परिपक्वता पूर्ण होण्यास मदत होते. याच काडीमध्ये तयार झालेला घड मजबूत होतो. परंतु पाऊस झालेल्या परिस्थितीत काडीची परिपक्वता लांबणीवर जाण्याची शक्यता असेल. काडी दुधाळ रंगापासून खाकी रंगाकडे रुपांतरीत न होता काही काळ हिरवी राहील व पुढे शेंडा वाढलेला दिसेल. काही परिस्थितीत काडीच्या बगलफुटीही वाढलेल्या दिसतील. अशा बागेत बगलफुटी काढणे, शेंडा पिंचिंग करणे व पालाशची उपलब्धता करणे व नत्राचा वापर थांबवणे या घटकांकडे लक्ष द्यावे.

ज्या बागेत पाऊस झालेला नाही, व तापमान वाढलेले आहे, अशा ठिकाणी मोजकेच पाणी देऊन वाढ नियंत्रणात राहील, यासाठी नियोजन करावे. ढगाळ वातावरण असलेल्या परिस्थितीत संजीवकांची फवारणी व स्फुरद, पालाशयुक्त खतांची फवारणी फायद्याची राहील.

डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८

(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com