Vineyard Management : कमी तापमानामुळे उद्‍भविणाऱ्या समस्यांवरील उपाययोजना

सध्याच्या वातावरणाचा विचार करता दिवसाचे तापमान वाढत असून, रात्रीच्या तापमानात बऱ्यापैकी घट होताना दिसून येते. आपल्याकडे वेगवेगळ्या वाढीच्या अवस्थेत असलेल्या द्राक्ष बागेत या वातावरणाचा परिणाम कसा होतो व त्यावरील उपाययोजनांची माहिती घेऊ.
Vineyard Management
Vineyard ManagementAgrowon

मण्याचा आकार लहान राहणे

बऱ्याच वेळा द्राक्ष बागेत (Vineyard) कमी तापमानामध्ये (Low Temperature) घडाचा आकार वाढत नसल्याचे दिसून येते. मण्यात पाणी उतरण्यापूर्वीच्या अवस्थेतील बागेत जर तापमानात घट झालेली असल्यास पुढील काळात मण्याचा आकार वाढण्याची शक्यता कमी असते.

किमान तापमान १५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असल्यास द्राक्षवेलीमध्ये शरीरशास्त्रीय हालचालींचा वेग संतुलित राहतो. म्हणजेच ही प्रक्रिया सुरू आहे, त्याचा परिणाम मण्याचा आकार वाढण्यावर होतो. मात्र तापमान कमी असल्यास याच वेलीचा शरीरशास्त्रीय हालचालींचा वेग मंदावतो. या वेळी होत असलेली पेशींची वाढ कमी होते. त्याचे परिणामी मण्याचा आकार कमी राहतो.

सुरुवातीच्या काळात जर पाऊस जास्त झालेला असेल आणि बोदामधील कार्य करणारी मुळे तांबडी किंवा काळी पडलेली असल्यास अशा स्थितीतही घडाच्या विकासासाठी आवश्यक असलेली पांढरी मुळे तयार होण्याचे प्रमाण जवळपास शून्य होते. यामुळे जमिनीत कितीही चांगल्या प्रकारची खते आणि पाणी दिले तरी त्याचा उपयोग वेल करून घेऊ शकत नाही. यामुळे मण्याचा आकार वाढणे थांबते.

Vineyard Management
Grape : अतिथंडीचे द्राक्ष बागेवरील दुष्परिणाम

वर दिलेल्या दोन्ही परिस्थितीपैकी आपल्या बागेत सध्या याचा ताळमेळ कोठे बसतो, हे पाहून बागेतील कार्यवाही करणे गरजेचे असेल. बागेत मुळे कार्य करण्यासाठी सहा ते आठ मि.मी. आकाराच्या अवस्थेत एकदा बोद एकतर कुळवून घ्यावा किंवा बोदाच्या बाजूने छोटी चारी घ्यावी. ज्यामुळे नवीन पांढरी व कार्यक्षम मुळे सहा ते सात दिवसांत तयार होऊन खत व पाण्याचा पुरवठा सुरळीत राहील. घडाच्या विकासात अडचणी निर्माण होणार नाहीत. पांढरी मुळे तयार झाल्यानंतर विद्राव्य खतांचा वापर महत्त्वाचा असेल.

बागेतील घडाच्या विकासाची परिस्थिती पाहून खतांचा वापर करावा. मण्यात पाणी उतरेपर्यंत नत्र आणि स्फुरदयुक्त खते देता येतील. उदा. १२-१६-० तर मण्यात पाणी उतरल्यानंतरच्या अवस्थेत स्फुरद आणि पालाशयुक्त खते दहा ते पंधरा दिवस देता येतील. उदा. ०-९-४०, ०-४०-३७, ०-५२-३४ इ. त्यानंतरच्या अवस्थेत फक्त पालाशचा वापर मण्यात गोडी मिळण्याच्या उद्देशाने आवश्यक असेल. उदा. ०-०-५० इ.

दुसऱ्या परिस्थितीतील बागेत पांढरी मुळे कार्यरत आहे आणि रात्रीच्या तापमानात घड झाल्यामुळे मण्याचा आकार वाढत नसल्यास अशा बागेत जास्त उपाययोजना करण्यासारख्या नाहीत. फक्त बागेतील तापमान वाढवण्याच्या दृष्टीने बोद पूर्ण भिजेल, अशा प्रकारे पाणी वाढवावे व पुरेसे पाणी उपलब्ध असल्यास एकदा मोकळे पाणी द्यावे. पाणी देण्यापूर्वी फणपाळी देऊन घेतल्यास बागेत पाणी व्यवस्थितरीत्या मुरेल व वरून झाकलेल्या कॅनॉपीमुळे बागेतील तापमान वाढण्यास मदत होईल.

काडीची परिपक्वता

बऱ्याचशा बागेत एकतर मण्यात पाणी उतरेपर्यंत काडी पूर्ण परिपक्व झालेली दिसून येते तर काही बागेत काडी परिपक्व होत नसल्याचे अडचण बागायतदारांकडून कळते. काडीची परिपक्वता आणि मण्याचा विकास हा एकसारखा व एकाच वेळी चालणे गरजेचे आहे. मण्यात पाणी उतरेपर्यंत जवळपास ८० टक्के मण्याचा विकास होऊन गेलेला असतो. त्यानंतर फारसा विकास होत नाही.

मण्यात पाणी उतरेपर्यंत काडी पूर्ण परिपक्व झालेल्या असल्यास किंवा घडाच्या पुढे दोन ते तीन पेरे परिपक्व झालेले असल्यास घडाचा विकास पाहिजे तितका होत नाही. मण्यामध्ये चांगला गर मिळण्यासाठी मण्यात पाणी उतरेपर्यंत घडाच्या आधी एक ते दोन पेऱ्यापर्यंत काडी परिपक्वता यायला हवी. असे झाल्यास मण्याची ठिसूळता दिसून, त्यात चांगला गर तयार झाला असे म्हणता येईल.

मण्यात गर चांगला असलेल्या द्राक्षघडांची साठवणूक क्षमता चांगली असते. मण्यात चांगला गर तयार होण्यासाठी कॅनोपीचे फार महत्त्व आहे. म्हणजेच त्या घडाच्या विकासात एका काडीवर पानांची संख्या ही तितकीच महत्त्वाची आहे. असे असले तरी काडीची परिपक्वता जर लवकर आलेली असल्यास अपेक्षेप्रमाणे घडाचे वजन व मण्याचा आकार मिळत नाही.

Vineyard Management
Grape Management : मणी तडकण्याच्या समस्येसाठी वेळीच उपाययोजना आवश्यक

जमिनीच्या प्रकारानुसार काडीची वाढ व परिपक्वता मागेपुढे होत असते. साधारणतः भारी जमिनीत मातीच्या कणांची संख्या जास्त असून, पाणी धरून ठेवण्याची क्षमताही जास्त असल्यामुळे काडीची परिपक्वता हलक्या जमिनीच्या तुलनेमध्ये लांबणीवर जात असल्याचे दिसते. असे असले तरी जमिनीमध्ये असलेल्या अडचणीमुळेही अन्नद्रव्ये उचलून घेण्याची क्षमता कमी अधिक होते, त्याचाच परिणाम म्हणून काडीची परिपक्वता कधी लवकर, तर कधी उशिरा होते.

ही परिपक्वता घडाच्या विकासासोबत चालावी, यासाठी ज्या जमिनीत समस्या आहेत. त्या ठिकाणी पाणी उतरेपर्यंत नत्र आणि स्फुरदचा फक्त वापर करावा. पालाशयुक्त खतांचा वापर यावेळी टाळावा. ज्या बागेत काडीची परिपक्वता उशिरा होते, अशा ठिकाणी मण्यात पाणी उतरण्याच्या पंधरा दिवसाआधीपासून स्फुरद आणि पालाशयुक्त खतांचा वापर करता येईल.

Vineyard Management
vineyard Damage : पावसामुळे द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान

द्राक्ष घडाचा सुकवा ः

पाणी उतरत असलेल्या बऱ्याचशा बागेत घड खालून सुकत असल्याची तक्रार बागायतदारांकडून येते. बागेमध्ये घडांची संख्या जर जास्त असेल, व मणी सेटिंगपासून घडाच्या वाढीच्या मुख्य अवस्थेमध्ये जर अन्नद्रव्याचा असमतोल निर्माण झालेला असल्यास घडामध्ये एकतर वॉटरबेरीज दिसून येतील किंवा घड खालून सुकताना दिसेल.

यालाच ममीफिकेशन असेही म्हटले जाते. ही एक विकृती जरी असली तरी बागेतील बऱ्याचशा समस्या किंवा आपल्या व्यवस्थापनातील त्रुटींमुळे सुकवा झाल्याचे पाहावयास मिळते. प्रीब्लुम ते फुलोरा अवस्थेत घडावर आलेल्या डाऊनी मिल्ड्यूच्या प्रादुर्भावामुळे त्या अवस्थेत घड अशक्त झाला होता.

त्यावेळी बुरशीनाशकांची फवारणी करून किंवा वातावरणातील तापमानात वाढ झाल्यामुळे रोग त्यावेळी नियंत्रणात आलेला असेल. मात्र पूर्णपणे रोगाचे बिजाणू नष्ट झालेले नसावेत. यावेळी आपण घडाचा विकास चांगला व्हावा, यासाठी मण्यात पाणी उतरण्याच्या अवस्थेत बागेत पाणी वाढवतो. यामुळे आर्द्रता वाढून बागेतील तापमानही कमी होते. ही परिस्थिती डाऊनीच्या प्रादुर्भावासाठी पोषक बनू शकते.

मण्याच्या वाढीच्या अशाच परिस्थितीत घडाच्या खालील बाजूपासून सुरुवातीस घडाचे देठ तांबड्या रंगाचे होऊन काही दिवसातच सुकायला लागतात. या वेळी बुरशीनाशकांच्या फवारणीची शिफारस शक्यतो केली जात नाही. फक्त जैविक नियंत्रणाचा वापर करता येतो. उदा. ट्रायकोडर्मा, बॅसिलस स्युडोमोनास इ.

दुसऱ्या परिस्थितीत घडांची संख्या वेलीला मिळालेल्या अंतराच्या गुणोत्तरापेक्षा जास्त असल्यामुळे अन्नद्रव्यांची गरज व उपलब्धता यामध्ये समतोल बसत नाही. यालाच सोर्स सिंक संबंध असेही म्हटले जाते. वेलीवर घडांची संख्या जास्त असल्यामुळे उपलब्ध अन्नद्रव्याचा मण्याच्या वाढीसोबत ताळमेळ बसत नाही.

अन्नद्रव्याकरिता मण्यांमध्ये स्पर्धा वाढते. पुरवठा पुरेसा न झाल्यामुळे पूर्ण वेलीवर त्याचा ताण बसतो. परंतू पाने जुनी झालेली असल्यामुळे त्याचे परिमाम पाहिजे तर वेलीवर दिसून येत नाहीत. मात्र मणी विकसित होत असताना यावर त्याचे परिणाम त्वरित दिसून येतात. बऱ्याच वेळा कॅल्शिअम व मॅग्नेशिअमच्या कमतरतेमुळे ही परिस्थिती निर्माण होत असल्याचे बोलले जाते. यासाठी ही दोनच अन्नद्रव्ये जबाबदार आहेत, असे नाही तर इतर अन्नद्रव्येही तितकीच महत्त्वाची असतात.

मण्याची साल लवचिक करण्यासाठी कॅल्शिअमची गरज असते. तर मण्यात चांगला गर तयार होण्यासाठी आणि देठाची पकड मजबूत राहण्यासाठी मॅग्नेशिअमची गरज असते. बरेच बागायतदार ही परिस्थिती निर्माण झाल्यानंतर वेगवेगळ्या खतांचा वापर जमिनीतून किंवा फवारणीतून जास्त प्रमाणात करतात.

मुळात पाणी उतरतेवेळी मण्यातील पेशी जवळपास जुन्या झालेल्या असतील, तेव्हा या वेळी फवारणी व जमिनीतून वापरलेल्या खतांचा फारसा उपयोग होणार नाही. तेव्हा हीच पूर्तता मणी सेटिंग ते मण्यात पाणी उतरण्याच्या १५ दिवसआधी केल्यास अडचणी निर्माण होणार नाहीत.

कमी तापमानाचे परिणाम

ज्या बागेत घडामध्ये पाणी उतरण्याची अवस्था आहे, अशा ठिकाणी या वेळी वातावरणातील चढउतारामुळे हिरव्या द्राक्ष जातींमध्ये पिंक बेरीची समस्या प्रामुख्याने दिसून येईल.

जर दिवसाचे तापमान ३५ अंश सेल्सिअस आणि रात्रीचे तापमानात घट होऊन सहा ते सात अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाल्यास मण्यातील हिरव्या रंगद्रव्यांचा रूपांतर गुलाबी रंगद्रव्यामध्ये होते. अचानक कमी झालेल्या तापमानामुळे वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालींचे संतुलन बिघडते की एका रात्रीतच हे बदल दिसून येतात.

बऱ्याचशा बागेमध्ये काही ठिकाणी घडाच्या वरील बाजूला जास्त गुलाबी रंग दिसेल, तर खालील कॅनॉपीमध्ये असलेल्या घडावर थोड्याफार प्रमाणात गुलाबी रंगाचे मणी दिसतील. द्राक्षवेलीवर काही घड कमी गुलाबी रंगाचे, तर काही घड पूर्ण गुलाबी झाले असले तरी घडातील एक किंवा दोन मणीही गुलाबी झाले असले तरी ते घड निर्यातक्षम राहत नाही.

या वेळी मण्यात पाणी उतरण्याची अवस्था म्हणजे १६ ते १७ मि.मी. आकाराचे मणी असावेत. यानंतर पुन्हा दोन ते तीन मि.मी. आकार सहज वाढेल, मात्र जर पिंक बेरी झाल्यास चांगली प्रत असूनही उपयोगाची नसते.

तापमानात अपेक्षित बदल करून घेणे आपल्या हातात नसले तरी काही उपाययोजना करून ही विकृती टाळता येते. बागेतील दिवसाच्या व रात्रीच्या तापमानातील अंतर कमी करण्याकरिता बागेत पाण्याचा वापर जास्त करून रात्रीच्या तापमानात वाढ करून घेता येईल.

हवामानाचा अंदाज आधीच मिळवता आल्यास बागेत ठिकठिकाणी शेकोटी पेटवून रात्रीचे तापमान वाढवता येईल. घड पेपर झाकल्यास बाहेरील व आतमधील तापमान यातील अंतर कमी करणे सहज शक्य होईल. या विकृतीसाठी कोणताही रासायनिक उपाय अद्याप हाती आलेला नाही. त्यामुळे वर दिलेल्या उपाययोजनांद्वारेच घड गुलाबी होणे टाळता येईल.

डॉ. आर. जी. सोमकुंवर,

९४२२०३२९८८

(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र,

मांजरी, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com