रब्बी तेलबिया (Rabbi Oilseed) पिकांमध्ये मोहरी हे एक महत्त्वाचे, कमी खर्चाचे आणि जास्त फायद्याचे पीक आहे. मोहरी हे पीक पूर्वी उत्तर भारतात घेतले जात होते. परंतु आता हे पीक पूर्व पश्चिम आणि दक्षिण भारतात सुद्धा घेतले जाते. भारतात या पिकाच्या एकूण क्षेत्रामध्ये प्रामुख्याने राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, पश्चिम बंगाल, आसाम आणि गुजरात या सात राज्यांचा एकूण ९० % वाटा आहे. मोहरी पिकास प्रतिक्विंटल ५०५० रुपये किमान आधारभूत किंमत असून उत्तर भारतात मागील वर्षी ६००० ते ७५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. महाराष्ट्रातही मोहरी पिकासाठी (Mustard Crop) जिल्हा तसेच तालुक्याच्या ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध आहे. या शिवाय महाराष्ट्रातील हवामान मोहरी पिकासाठी पोषक असून मोहरीला महाराष्ट्रातही लागवडीसाठी चांगला वाव आहे.
महाराष्ट्रातही मोहरीचे पीक फायदेशीर का आहे?
महाराष्ट्रातील रब्बी हंगामात असलेले १० ते ३० अंश सेल्सिअस तापमान या पिकास पोषक आहे. असे तापमान ऑक्टोबर चा शेवटचा आठवडा ते फेब्रुवारी पर्यंत असते.
सध्या बदलत्या वातावरणामध्ये या पिकाला भरपूर वाव आहे. मोहरी हे गहू, हरभरा आणि जवस या पिकामध्ये अंतर किंवा मिश्र पीक म्हणून घेण्यात येते.
हे पीक साधारणतः दोन किंवा तीन ओलीताच्या पाळ्या दिल्यास चांगले उत्पादन देते. त्यामुळे कमी पाण्यात, कमी खर्चात जास्त उत्पादन मिळते.
योग्य वेळी पेरणी केली तर कीड आणि रोगांचा फार कमी प्रादुर्भाव होतो.
या पिकाच्या शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेमध्ये पक्ष्यांपासून संरक्षण करण्याची आवश्यकता नसते.
मोहरी हे पीक मध्यम, खोल जमीन किंवा खारवट जमिनीत ही घेता येते. तणग्रस्त जमिनीत या पिकाचे उत्पादन इतर पिकापेक्षा जास्त मिळते.
पीक परीपक्व होत असताना झाडाची सर्व पाने जमिनीवर गळून पडतात आणि ते जमिनीत कुजल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने प्रती हेक्टरी १२ क्विंटल उत्पादन देण्याची क्षमता असलेले टी. ए. एम. १०८-१ हे वाण विकसित केले आहे. या सर्व कारणांमुळे मोहरी हे परंपरागत घेतल्या जाणाऱ्या गहू, हरभरा, जवस इत्यादी पिकाला पर्यायी पीक म्हणून उपलब्ध होऊ शकते.
सोयाबीन नंतर नेहमीच्या पिकांपेक्षा लागवड खर्च कमी व अधिक उत्पादन मिळत असल्यामुळे मोहरी पिकाची लागवड करता येईल.
पूर्व विदर्भात खरिपात भात पिकाच्या लवकर येणाऱ्या जातींची लागवड करून रब्बीमध्ये मोहरी पिकाची लागवड करणे अधिक फायद्याचे ठरू शकते.
परंपरागत सलग गहू पीक घेण्यापेक्षा गहू पिकामध्ये ९:१ किंवा ६:१ या प्रमाणात आंतरपिक घेणे आर्थिकदृष्ट्या अधिक फायदेशीर ठरू शकते.
------------------
स्त्रोत ः कृषी पत्रिका, ऑक्टोबर २०२२, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.