नियोजन नवीन फळबागेचे...

जमिनीची निवड, हवामानानुसार फळझाडांची लागवड,पाण्याची उपलब्धता,योग्य आखणी आणि कलमांची निवड तसेच काटेकोर नियोजन केल्यास फळबागेपासून चांगले उत्पादन मिळते. जमिनीच्या प्रकारानुसार फळझाडांच्या लागवडीचा आराखडा तयार करावा.
Fruit Market
Fruit MarketAgrowon

डॉ. आदिनाथ ताकटे

फळबाग लागवड करताना जमिनीची प्रकार, जमिनीची खोली आणि मुरूम किती खोलीवर आहे? जमिनीचा निचरा कसा आहे? याचा अभ्यास करावा. फळबागेसाठी जमिनीची निवड करताना निचरा उत्तम असणे आवश्यक आहे. फळबागेसाठी कमीत कमी एक मीटर खोलीनंतर मुरमाचा थर असणारी जमीन निवडावी. भरपूर सेंद्रिय कर्ब, भुसभुशीत, मध्यम पोताच्या जमिनीचा सामू ६ ते ७.५ पर्यंत असावा. मुक्त चुनखडीचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा कमी असावे. जमिनीचा उतार २ ते ३ टक्क्यांपेक्षा जास्त नसावा. ज्या ठिकाणी फळबाग लावायची आहे, त्या ठिकाणच्या मातीचे परीक्षण करावे. फार खोल असणाऱ्या जमिनी, क्षारयुक्त जमिनी, चोपण जमिनीतून पाण्याचा योग्य निचरा होत नाही. अशा जमिनीत प्रारंभी झाडे वाढल्यासारखी दिसली तरी पुढे वाढीचा वेग मंदावतो, उत्पादन मिळत नाही. ज्या जमिनीत मुक्त चुनखडीचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, अशा जमिनीत फळबागेची वाढ होत नाही.

जमिनीचा प्रकार---फळपिके

हलकी ते मध्यम : अंजीर, पेरू, डाळिंब, कागदी लिंबू, द्राक्षे, पपई, सीताफळ, बोर, करवंद, कवठ, चिंच

मध्यम : चिकू, आंबा, संत्री, मोसंबी, काजू, नारळ.

भारी : केळी

मातीचा नमुना :

१) फळबागेकरिता जमिनीच्या प्रकारानुसार प्रातिनिधिक नमुना घ्यावा.

२) सर्वप्रथम ३ × ३ × ३ फूट खोली किंवा मुरूम लागेपर्यंत खड्डा करून पृष्ठभागापासून प्रत्येक फुटातील प्रतिनिधिक नमुना काढावा. तो वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये भरून तपासणीसाठी पाठवावा.

२) माती परीक्षणाप्रमाणेच पाण्याची तपासणी करणे आवश्यक आहे. विहीर, कूपनलिकेचे पाणी क्षारयुक्त किंवा मचूळ असू नये, ते गोड असावे. माती बरोबरच, पाण्याचेही रासायनिक परिक्षण करून घ्यावे. त्या अनुषंगानेच फळझाडांची निवड करावी.

पाण्याची उपलब्धता ः

१) कोरडवाहू फळपिकांना लागवडीच्या सुरवातीस पहिली तीन ते चार वर्षे समाधानकारक वाढीसाठी पाण्याची आवश्यकता असते.नारळ, सुपारी, केळी, पपई, चिकू मसाला पिके यांना इतर फळझाडांपेक्षा जास्त पाणी लागते.

२) आपल्याकडे १२ महिने पाण्याची सोय असेल तर ज्यांना बाराही महिने पाणी लागते अशा फळझाडांची निवड करावी. आठ महिने पाणी पुरत असेल तर पेरूसारखी फळझाडे लावावीत.पाणी फक्त सहा महिने पुरत असेल तर सीताफळ, रामफळ, आवळा, बोर यांसारख्या कोरडवाहू फळझाडांची लागवड करावी.

आखणी आणि अंतर :

१) जमिनीची आखणी करण्यापूर्वी लागवडीची पद्धत ठरवावी.फळपिके लागवडीच्या चौरस, आयताकृती, त्रिकोणी, षटकोनी, उतार(कंटूर) अशा पद्धती आहेत.

२) चौरस पद्धत ही सर्वात सोपी,आखणीस अडचण नसणारी आणि उभ्या-आडव्या मशागतीस योग्य आहे. आंबा, पेरू, चिकू, संत्रा, मोसंबी इत्यादी फळझाडांची लागवड या पद्धतीने केली जाते. या पद्धतीमध्ये झाडांच्या रांगा काटकोन करून असतात. दोन झाडांतील आणि दोन रोपांतील अंतर सारखेच येत असल्यामुळे झाडे सर्व दिशांनी पाहिल्यास सारख्या अंतरावर दिसतात. या पद्धतीने लागवड

करणे अत्यंत सुलभ असते.

लागवडीचे अंतर :

१) जेथे फळझाडांची लागवड करावयाची आहे,तेथे योग्य त्या अंतरावर चौरस पद्धतीने आखणी करून खड्डे खोदावेत.जमिनीचा मगदूर आणि फळझाडांच्या प्रकारानुसार खड्ड्याचा आकार ठरवावा.

२) खड्डे खोदण्याचे काम उन्हाळ्यातच पूर्ण करावे. हलक्या जमिनीत व मोठया विस्ताराच्या झाडासाठी मोठ्या आकाराचे खड्डे घ्यावेत.दीर्घायुषी झाडे असतील तर १ मी. × १ मी. × १ मी. आकाराचा खड्डा घ्यावा.मध्यम आकाराच्या झाडांना ७५ × ७५ × ७५ सेंमी आणि लहान झाडांना ६० × ६० × ६० सेंमी आकाराचे खड्डा घ्यावा. जमीन डोंगर उताराची असेल तर समपातळी रेषा काढून त्याप्रमाणे लागवड करावी.

३) खड्डा खोदताना वरच्या आणि खालच्या थरातील माती वेगवेगळी टाकावी. खड्डे तीन आठवडे तापू द्यावे, जेणेकरून प्रखर सूर्यप्रकाशामुळे खड्ड्याचे निर्जंतुकीकरण होईल. मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात खड्डे परत भरावे. खड्डे भरताना तळाशी वाळलेला पालापाचोळा १५ सेंमी भरावा. मातीमध्ये २० ते २५ किलो चांगले कुजलेले शेणखत, २ ते ३ किलो गांडूळ खत,२ ते ३ किलो निंबोळी पेंड, २५ ग्रॅम टायकोडर्मा, १५ ग्रॅम स्फुरद विरघळवणारे जिवाणू, २५ ग्रॅम अॅझोटोबॅक्टर हे मिश्रण मिसळून घ्यावे. खड्डा जमिनीच्या वर ५ ते ७ से.मी उंच भरून ठेवावा.

४) पावसाच्या सुरुवातीस जून महिना अगर जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात लागवड करावी. अतिपावसात अगर पावसाच्या शेवटी सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये फळझाड लागवड करू नये.पावसाच्या सुरवातीस लागवड केलेली झाडे चांगली समाधानकारक वाढतात. काही कालावधीकरिता पाण्याचा ताणही सहन करू शकतात.जून-जुलैपर्यंत वेळेवर झाडांची लागवड झाल्यास वाढ जोमाने होते.

लागवडीचे अंतर

अ.न.---फळझाड------लागवडीचे अंतर (मीटर)---हेक्टरी झाडे

१.---आंबा ---१० × १०---१००

२.---चिकू ---१० × १०---१००

३.---चिंच ---१० × १०---१००

४.---जांभूळ ---१० × १०---१००

५.---नारळ ---७.५ × ७.५---१७७

६.---आवळा ---७ × ७---२०४

७.---पेरू ---६ × ६,---२७७

३ × २ ---१६६६

८.---बोर ---६ × ६---२७७

९.---लिंबू /मोसंबी ---६ × ६---२७७

१०.---सीताफळ ---५ × ५---४००

११---डाळिंब ---४.५ × ३---७४०

१२.---अंजीर ---५ × ५ ---४००

४.५ × ३---७४०

कलमांची निवड आणि लागवड :

१) फळबागेकरिता उत्कृष्ट आणि गुणवत्ता माहिती असलेली दर्जेदार आणि खात्रीशीर कलमे रोपे आणावी. कृषी विद्यापीठ किंवा शासकीय रोपवाटिकेमधून रोपे, कलमे आणावीत. शक्य नसल्यास आपल्या माहितीतील शासकीय परवानाधारक रोपवाटिकेतून कलमे /रोपे घ्यावीत.

२) कलमांची निवड करताना ती किती उंच आहेत, यापेक्षा ती योग्य त्या जातीच्या मातृवृक्षापासून केलेली आहेत का याबाबींकडे अधिक लक्ष द्यावे. रोपे घेताना कलम बांधलेली आहेत, जोड पूर्णपणे जुळलेले आहेत याची खात्री करावी. वाढीला जोमदार आणि निरोगी असावीत.

३) प्रथम लागवड करण्यापूर्वी कलमाच्या पिशवीच्या दोन्ही बाजूंवर उभा काप द्यावा. मुळाभोवती असलेला मातीचा गोळा न फुटता पॉलिथिन बॅग काढावी. मोकळा झालेला गोळा दोन्ही हातात धरून खड्ड्याच्या मधोमध ठेवून हलकेच दाबावा. मोकळ्या हाताने माती भरून गोळ्याभोवती माती टाकावी.अगोदर हाताने व नंतर पायांनी दाबावी, हे करताना मातीच्या गोळ्यावर पाय पडणार नाही याची काळजी घ्यावी. आवश्यकता वाटल्यास हलकेसे पाणी द्यावे.आधारासाठी पश्चिम बाजूस ६ इंच अंतरावर ४ ते ५ फूट बांबूची काठी रोवून त्याला कलम बांधावे.

फळबागेचे सरंक्षण :

१) लागवड केल्यानंतर फळझाडांची नवीन वाढ जनावरे खातात. रोपे व कलमे तुडवतात. निवडलेल्या जागेभोवती चिलार, शिकेकाई, करवंद यांसारख्या काटेरी झुडपांचे कुंपण करावे. बागेचे उष्ण वारे, थंडीपासून व वादळापासून संरक्षण करण्यासाठी निलगिरी, शेवरी सारख्या उंच वाढणाऱ्या झाडांची पश्‍चिम व दक्षिण बाजूने २ ते ३ फुटांवर लागवड करावी.

२) काही वेळा वाऱ्याच्या अडथळ्यासाठी लावलेली झाडे बागेतील मुख्य फळझाडांबरोबर पाणी आणि अन्नद्रव्ये घेण्यासाठी स्पर्धा करतात. हे टाळण्यासाठी अडथळ्यांच्या झाडांपासून १० फूट अंतरावर ३ फूट खोल आणि २ फूट रुंद खणून त्यामध्ये कुंपणाला लावलेल्या झाडाची आलेली मुळे छाटून टाकावीत.अशा प्रकारे मुळ्या छाटण्याचे काम प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी करावे.

सघन लागवड :

१) या पद्धतीमध्ये झाडांची छाटणी, विरळणी करणे सोपे जाते. पारंपरिक लागवडीपेक्षा जादा उत्पादन मिळते.

२) सधन लागवड पद्धतीमध्ये फलोत्पादन लवकर मिळते. झाडांचा आकार लहान असल्याने कीड-रोग नियंत्रण व्यवस्थापन, फळांची काढणी सोपी व सहज शक्य होते. कमी क्षेत्रातून जादा उत्पादन, फळांचा दर्जा, प्रत व गुणवत्ता, निर्यात क्षमता वाढविता येते.

संपर्क ः

डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९

(मृद्‌ शास्त्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com