Vineyard Management : वाढत्या तापमानामुळे उद्‍भविणाऱ्या समस्या

गेल्या आठवड्यातील वातावरणाचा विचार करता दिवसाच्या तापमानात सतत वाढ होताना दिसत आहे. त्याच प्रमाणे रात्रीचे तापमानही तितक्याच प्रमाणात वाढत आहे.
Grape Advice
Grape AdviceAgrowon

Vineyard Management : गेल्या आठवड्यातील वातावरणाचा विचार करता दिवसाच्या तापमानात (Temperature) सतत वाढ होताना दिसत आहे. त्याच प्रमाणे रात्रीचे तापमानही तितक्याच प्रमाणात वाढत आहे. अशा वाढत असलेल्या तापमानामध्ये द्राक्ष बागेवर (Vineyard) होणारा परिणाम आणि त्यावरील उपाययोजनांची माहिती घेऊ.

१) द्राक्ष घड मलूल पडणे

सध्या द्राक्ष विभागातील दिवसाचे तापमान वेगाने वाढत आहे. त्यामुळे वेलीची पाने, घड तसेच काड्यामधूनही बाष्पीभवनाच्या प्रक्रियेद्वारे पाणी निघून जाते. याच काळात जमीनही जास्त तापत असल्यामुळे बोदातूनही पाणी तितक्याच प्रमाणात निघून जाते.

या वेळी द्राक्षघडाची पाण्याची गरज फारशी नसली तरी फळकाढणीच्या कालावधीत द्राक्ष बागायतदार पाणी कमी प्रमाणात देतात. वेलीची गरज आणि पूर्तता यामध्ये आवश्यक असलेला समतोल साधता न आल्यास मणी लूज होण्याची (मलूल पडण्याची) समस्या दिसून येते.

मण्याची देठाशी आवश्यक असलेली पकड ही जमिनीचा प्रकार (उदा. हलकी, मध्यम, भारी), बागेतील तापमान व द्राक्ष मण्याची वाढीची अवस्था अशा बऱ्याच गोष्टीवर अवलंबून असते.

Grape Advice
Grape Crop Care : प्रतिकूल हवामानात घ्या द्राक्ष पिकांची काळजी

१) हलक्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. अशा द्राक्ष बागेमध्ये अधिक पाणी द्यावे लागते. वाढत्या तापमानाच्या स्थितीमध्ये बागेला मात्र पाणी किती लागेल, याचा अंदाज शेतकऱ्याला न आल्यास मण्याच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या पाण्याची गरज पूर्ण होत नाही. परिणामी द्राक्ष मणी लूज पडताना दिसून येतात.

२) भारी जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. इथे पाणी थोडेफार जरी जास्त झाले तरी आर्द्रतेचे प्रमाण जास्त वाढेल. त्यानंतर डाऊनी मिल्ड्यूच्या सुप्तावस्थेत असलेल्या बीजाणूसाठी अनुकूल वातावरण तयार होते.

परिणामी, आधी आवाक्यात वाटत असलेल्या डाऊनी मिल्ड्यू रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळेही मणी लूज पडताना दिसून येतात.

Grape Advice
Vineyard Management : कमी तापमानामुळे उद्‍भविणाऱ्या समस्यांवरील उपाययोजना

३) काही परिस्थितीत द्राक्ष बागेतील अन्नद्रव्याच्या बिघडलेल्या संतुलनामुळे मणी लूज पडताना दिसून येतात. यात विशेषतः कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम या अन्नद्रव्यांची कमतरता, या आधी दिलेले पाणी आणि वाढीची अवस्था याचा समतोल ढासळल्यासही मणी लूज पडण्याची समस्या दिसून येते.

यापैकी आपल्या बागेत कोणती परिस्थिती आहे, हे पाहावे. त्यानुसार काही उपाययोजना कराव्या लागतील. मात्र मणी लूज पडण्याची समस्या टाळण्याकरिता पाण्याचा संतुलित वापर अत्यंत महत्त्वाचा असेल.

Grape Advice
vineyard Damage : पावसामुळे द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान

४) ज्या बागेत पाण्याची कमतरता आहे, अशा ठिकाणी बोदावर मल्चिंग करून घ्यावे.

५) वेलीवर ताण कमी करण्यासाठी अॅण्टीस्ट्रेस रसायनाची तीन ते चार मिलि प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी. त्यामुळे बाष्पीभवनाद्वारे उडून जाणारे पानातील पाण्याचे प्रमाण कमी होईल.

६) सध्या बागा फळकाढणीच्या स्थितीत आहे. या वेळी अन्नद्रव्यांच्या वापराचा फारसा उपयोग होत नसला, तरी कॅल्शिअमची फवारणी थोड्याफार प्रमाणात मदत करेल.

२) वेली अचानक सुकणे

बऱ्याच बागेत घडाचा विकास होत असताना किंवा फळकाढणीजवळ आलेल्या अवस्थेत द्राक्ष वेली अचानक सुकताना दिसून येतात. विशेषतः दुसऱ्या ते तिसऱ्या वर्षे वयाच्या वेलीमध्ये ही समस्या जास्त प्रमाणात दिसून येत असल्याची तक्रार बागायतदार करतात.

ज्या बागेत फळछाटणीपासून शिफारशीत सुचविल्याप्रमाणे नियोजन केले गेले असेल किंवा द्राक्ष बागायतदारांनी आपल्या दीर्घकाळाच्या अनुभवानुसार नियोजन केले असेल.

वरीलपैकी नियोजन कोणत्या प्रकारे केले असले, तरी या बागेतील मण्यात पाणी उतरण्याच्या स्थितीपर्यंत बऱ्यापैकी घडाचा आकार, मण्याची जाडी, पानांचा हिरवेपणा व द्राक्ष घडाचा तजेलदारपणाही चांगला होता. याचाच अर्थ आपण केलेले नियोजन किंवा या वेळेपर्यंत वापरलेल्या रसायनांमध्ये कोणतीही अडचण अथवा भेसळ नव्हती.

ज्या वेळी द्राक्षघड किंवा पूर्ण द्राक्षवेल सुकायला लागते, तेव्हा आपण वेलीच्या सुकण्याची चर्चा करतो. हे जरी खरे असले तरी वेलीमध्ये हे बदल अचानक एकाच दिवसात होत नाहीत. आजवर वेलीच्या ज्या शरीरशास्त्रीय हालचालींचा वेग सुरळीत होता, तो गेल्या १० ते १२ दिवसांपूर्वीपासून बिघडला असल्याचे समजून घ्यावे लागेल.

याचाच अर्थ आज जरी वेल अचानक सुकल्यासारखी लक्षणे दिसत असली तरी ही स्थिती बागेतील पंधरा दिवसांपूर्वी कोणत्याही नियोजनात बिघाड झाल्यामुळे तयार झालेली असल्याचे जाणावे.

बऱ्याच वेळा आपण द्राक्ष घडाच्या वाढीच्या शेवटच्या टप्प्यात मण्याचा आकार चांगला मिळावा, त्याला चकाकी यावी व द्राक्ष घड लवकर काढणीस यावा याकरिता वेगवेगळ्या प्रकारची संजीवके किंवा बाजारात उपलब्ध इतर उत्पादने वापरतो.

कदाचित, या उत्पादनामध्ये काही अंशी तणनाशकांचे प्रमाण असते. मात्र आपण सातत्याने देत असलेल्या फवारण्यामुळे त्यांचे वेलीतील प्रमाण वाढते. त्यानंतर आपण फळकाढणी लवकर होण्याच्या दृष्टीने पाणी कमी करतो व वेलीमध्ये अशा रसायनांची तीव्रता जास्त होते.

परिणामी, वेलीच्या खोडामधून कधी पाणी बाहेर येताना दिसेल, तर कधी खोडावर मुळे निघत असल्याचे दिसते, तर कधी काडी दाबल्यास पोचट किंवा पोकळ झाल्यासारखे जाणवेल. यामुळे आपल्याला कधी ही समस्या खोडकिडीमुळे झाली असेही वाटू शकते.

ही समस्या अधिक प्रमाणात झाली असल्यास मुळांद्वारे अन्नद्रव्यांचा पुरवठा अचानक खंडित होतो आणि पाने पिवळी पडून सुकून जातात.

Grape Advice
Grape Advice : द्राक्ष सल्ला : रिकटचे व्यवस्थापन

या बागेमध्ये मुळे जर पूर्णपणे काळी पडून कुजलेली असल्यास फ्युजारियम विल्ट या रोगाचा प्रसारसुद्धा झाला असण्याची शक्यता असते. बागेत जास्त प्रमाणात पाणी झाले असेल आणि मुळांच्या कक्षेत शेणखत व सेंद्रिय आच्छादन केलेले असल्यामुळे पाणी जास्त धरून ठेवले असेल, अशा परिस्थितीत फ्युजारियम बुरशींचा प्रादुर्भावाची (किंवा मूळकुजीची) समस्या जास्त प्रमाणात येऊ शकते.

यासाठी बोर्डो मिश्रण एक टक्का या प्रमाणे आळवणी एक ते दोन वेळा करून घेतल्यास पुढील वेली वाचू शकतील. तसेच ट्रायकोडर्मा मांजरी ट्रायकोशक्ती १० ग्रॅम प्रति एकर या प्रमाणे चार ते पाच ड्रेचिंग करून घ्यावे. बागेतील पाण्यावर नियंत्रण ठेवावे.

काही बागेमध्ये मोजक्या ओळींमध्ये अचानक झाडे सुकण्याची समस्या दिसून येते. ही समस्या सुद्धा नियोजनातील त्रुटीमुळे होते. बऱ्याचदा आपण बागेतील गवत काढण्याकरिता मजुरांची उपलब्धता नसल्यामुळे तणनाशकांचा वापर करतो.

आपल्याकडे जवळपास सर्व द्राक्ष बागा या खुंटावर लावल्या जातात. मण्याच्या आठ ते दहा मि.मी. विकासापासून मण्यात पाणी उतरेपर्यंत आपण जास्त प्रमाणात पाण्याचा वापर करतो. या वेळी खुंट रोपांच्या फुटी बाहेर निघतात. बोदावर तणनाशकांची फवारणी करतेवेळी या फुटींवरसुद्धा फवारणीचे तुषार जाऊ शकतात. त्याचा परिणाम कालांतराने दिसून येतो.

वरील बाबीचे शंका निरसन करण्यासाठी आपण जर तणनाशकांचे अंश तपासण्यासाठी पान, देठ व फुटी या वेळी प्रयोगशाळेत घेऊन गेलो तरी नेमके तणनाशकांचे अवशेष असल्याचे सिद्ध होणार नाही.

कारण लक्षणे दिसण्यापासून आजपर्यंत बराच वेळ निघून गेलेला असेल. हे समजण्याकरिता लक्षणे दिसताच ताजी पाने तपासली, तर काही प्रमाणात तणनाशकांचे त्यातील अंश समजू शकतील.

तणनाशकामुळे झालेल्या समस्येवर उपाययोजना म्हणून आपण बागेत जमिनीत एकतर पाणी जास्त देतो. किंवा नत्राचा वापर करून फुटींच्या वाढीचा जोम पुढे नेऊन ही परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करतो.

मात्र या वेळी पेशी जुन्या झालेल्या असल्यामुळे, तसेच पाणी नियंत्रणात ठेवल्यामुळे मुळांची कार्यक्षमता कमी झालेली असेल. त्यामुळे या उपाययोजना फायद्याच्या ठरणार नाहीत. तेव्हा बागायतदारांनी ही परिस्थिती निर्माणच होणार नाही, अशा प्रकारे रसायनांच्या फवारणीचे नियोजन करावे.

डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८, (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com