
डॉ. सचिन मगर, अमोल क्षीरसागर
बऱ्याच ठिकाणी घन पद्धतीने आंबा लागवड (Mango Cultivation) झालेली आहे. बऱ्याच वेळा घन लागवड बागेचे योग्य व्यवस्थापन (Mango Orchard Management) होत नाही. त्यामुळे झाडे जीर्ण होतात, उत्पादनात घट येते. २५ ते ३० वर्ष जुन्या, कमी उत्पादन देणाऱ्या घन पद्धतीने लागवड (५ बाय ५ मी.) असलेल्या केसर आंबा कलमांचे छाटणीद्वारे पुनरुज्जीवन करण्याचे तंत्रज्ञान महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केले आहे.
पुनरुज्जीवन करण्यायोग्य बाग
२० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या कमी उत्पादन देणाऱ्या घन लागवड बागा.
फांद्या एकत्र झाल्यामुळे अपुरा सूर्यप्रकाश व हवा असणाऱ्या बागा.
खोड किडा, पर्णगुच्छ रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या बागा.
अशक्त झाडे व फांद्या वाळण्याचे प्रमाण वाढले आहे अशा बागा.
योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन, पीक संरक्षण उपाययोजना झाले नाही अशा जुन्या बागा.
आंतरमशागत, काढणी करताना अडचण येत आहे अशा जुन्या बागा.
छाटणीची पद्धत
छाटणी केल्यानंतर होणारा खोडकिड्याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी डिसेंबर महिन्यात कलमांची छाटणी करावी.
जमिनीपासून १.५ मीटर उंचीवर छाटणी करावी. कलमाचा जोड असलेल्या भागाच्या वर छाटणी राहील याची दक्षता घ्यावी, अन्यथा पुढील काळात खुंटामधून फुटवे येतील.
छाटणी करावयाची आहे त्या फांद्यांवर योग्य उंचीवर खूण करून घ्यावी. चेन सॉ, धारदार कोयत्याचा वापर करून छाटणी करावी.
छाटणी करताना काप तिरका, आतील बाजूस उतरता असावा. छाटणी करताना फांदी पिचणार नाही याची काळजी घ्यावी.
छाटणीनंतरची काळजी
छाटलेल्या फांद्या गोळा करुन बाग स्वच्छ करावी.
खोडकिडा, नवीन फुटव्यावरील करपा रोगापासून संरक्षण होण्याकरीता छाटणीनंतर लगेच कलमांवर क्लोरपायरिफॉस ५० मिलि, कडुनिंब तेल ५० मिलि, कॉपर ऑक्सिक्लोराइड ४० ग्रॅम अधिक स्टिकर १५ मिलि आणि गेरू ४ किलो यांचे प्रति १० लिटर पाण्यात मिश्रण तयार करावे. या मिश्रणाचा खोडास मुलामा द्यावा. (ॲग्रेस्को शिफारस)
प्रत्येक कलमास १० ते १५ दिवसांच्या अंतराने १५० ते २०० लिटर पाणी द्यावे.
छाटणी केल्यापासून साधारण एक ते दीड महिन्यानंतर फुटवे येण्यास सुरुवात होते.
छाटणी केलेल्या कलमाची वाढ खूप जोमदार असल्याने विरळणी करावी लागते. पाच ते सहा फांद्याचा मजबूत बांधा तयार होईल या पद्धतीने फुटव्यांची चांगली वाढ झाल्यानंतर विरळणी करावी.
पुनरुज्जीवन बागांचे खत व्यवस्थापन आणि पीक संरक्षण
जुन्या बागांच्या पुनरुज्जीवनानंतरचे खत व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. छाटणीनंतर जून महिन्यामध्ये प्रत्येक कलमाच्या विस्ताराच्या थोड्या आतील भागात वर्तुळाकार चर खणून प्रति कलम पाच घमेले शेणखत, एक किलो १५:१५:१५ हे मिश्र खत आणि अर्धा किलो युरिया ही खते द्यावीत. त्यानंतर चर मातीने बुजवावा.
खोडकिडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून किमान सहा महिन्यांपर्यंत कलमांची काळजी घेणे गरजेचे आहे. कलमाची सुकलेली साल खरवडून काढावी, अळ्या काढून मारून टाकाव्यात. चिखलाने छिद्र बंद करावे. १५ दिवसांच्या अंतराने खोडकिडीच्या नियंत्रणासाठी प्रति लिटर पाण्यात २ मिलि क्लोरपायरिफॉस मिसळून संपूर्ण खोडावर फवारणी करावी.
नवीन आलेल्या फुटव्यांची विरळणी केल्यानंतर कार्बेन्डाझिम २ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. यामुळे करपा रोगाचे नियंत्रण होते. (ॲग्रेस्को शिफारस)
पुनरुज्जीवनाचे फायदे
छाटणी केलेल्या कलमांची योग्य
मशागत केली तर दुसऱ्या वर्षी मोहर येऊ लागतो.
कलमाचे आयुष्यमान व उत्पादकता वाढते.
बागेत सूर्यप्रकाश व हवा खेळती राहते त्यामुळे खोडकिडा, फांदीमर यांचा प्रादुर्भाव कमी होतो.
छाटणीनंतर आंतरमशागत, काढणी, फवारणी, खते काम सोपे होते.
बागेत काही देशी आंबा झाडे असतील, तर त्यावर सुधारित जातीचे कलम करता येते.
- डॉ. सचिन मगर ७५८८५१७९६७, अमोल क्षीरसागर ९८२२९९१४९५ (उद्यानविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.